कौशल्या विकासामुळे बघा कशी तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते
कौशल्य विकसित तरुण व तरुणी केवळ रोजगार मिळवण्यासाठीच सक्षम बनणार आहेत असे नाही तर ते स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करून नवीन रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सक्षम बनू शकतील.
“भारत हा तरुणांचा देश आहे. ह्या तरुणांच्या हाताला काम मिळाले तर रोजगार निर्मिती तर होईलच पण त्याचबरोबर भारताचे जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्नही ह्यामुळे साकार होणार आहे. पण जर ह्या तरुणाईला सक्षम व रोजगारक्षम बनवायचे असेल तर गरज आहे विविध कौशल्य आत्मसात करण्याची.” भारत सरकारने हीच गरज ओळखून विविध कौशल्य विकास कार्यक्रम राबविले आहेत. आपल्या देशातील परकीय गुंतवणूक वाढावी व नवीन उद्योगधंदे सुरु व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच ह्या नवीन उद्योगधंद्यांमध्ये काम करण्यासाठी व भारताची औद्योगिक प्रगती करण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आवश्यक आहे.
म्हणूनच सन २०२२ पर्यंत देशात ५० कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातही साडेचार कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ह्या कौशल्य विकास अभियानामुळे राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळेल. ह्यातून रोजगार व स्वयंरोजगार असे दोन्ही उद्देश साध्य होऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पाहिलेलं स्किल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत.
कौशल्य विकसित तरुण मनुष्यबळच महाराष्ट्र व देशाला समर्थ बनवू शकेल. ह्याच विचारातून ह्या कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची निर्मिती केली गेली आहे. ह्यातून तरुण व तरुणी केवळ रोजगार मिळवण्यासाठीच सक्षम बनणार आहेत असे नाही तर ते स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करून नवीन रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सक्षम बनू शकतील.
ह्याच कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत प्रशिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहणाऱ्या व आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावणाऱ्या अनेक तरुण तरुणी आज यशस्वी उद्योजक म्हणून आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ह्यात विशेष उल्लेख करावासा वाटतो तो औरंगाबाद शहरातील सौ. अर्चना लोकेश सोनी ह्या उद्योजक महिलेचा. अल्पशिक्षित असूनसुद्धा कौशल्य विकास अभियानाअंतर्गत आपले प्रशिक्षण पूर्ण करून सौ. अर्चना सोनी ह्यांनी आज स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला आहे.
कौशल्य विकासाबाबत काय म्हणतात अर्चना सोनी ?
स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या ह्या प्रवासाबद्दल बोलतांना त्या म्हणतात कि “माझे शिक्षण 5 वी पर्यंत झाले आहे. लग्न होऊन औरंगाबाद येथे आले. गेल्या 14 वर्षांपासून माझे मिस्टर इथे राहतात आणि ते एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात. पांडुरंग कृपा कन्सल्टन्सी सर्विसेसने घरी येऊन दिलेल्या माहितीनुसार मी ब्युटीपार्लरचा कोर्स केला आणि मला Hair & Beauty Salon मध्ये नोकरी मिळाली आणि तिथे काही महिने नोकरी केल्यानंतर आज मी स्वत:चे ब्युटी पार्लर सुरू करुन माझ्या स्वत:च्या पायावर उभी आहे”. हाती कौशल्य असेल तर स्वतःची प्रगती कशी साधता येते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्चना लोकेश सोनी उद्योजक महिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया या संकल्पनेस अनुसरून महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र ह्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी राबविण्यात येणारे विविध कौशल्य विकास कार्यक्रम व त्यांना मिळत असलेले यश दिवसेंदिवस अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. अर्चना लोकेश सोनी ह्यांच्याशिवाय इतर असे अनेक तरुण व तरुणी आहेत ज्यांनी नवीन कौशल्य शिकून स्वतःला सक्षम बनवले व आज ते आपल्या क्षेत्रात सक्षमपणे उभे आहेत.
ह्याच अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात 213 बॅचेसच्या माध्यमातून 11 हजार 768 प्रशिक्षणार्थींनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या 172 बॅचेसच्या माध्यमातून 4 हजार 816 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यापैकी 88 बॅचेसचे मूल्यमापन करण्यात आले असून सुमारे 2 हजार 577 प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण पूर्ण करुन नोकरी मिळवली आहे तर 137 प्रशिक्षणार्थींनी स्वयंरोजगार सुरू केलेला आहे. ह्या हजारो तरुण व तरुणींप्रमाणेच इतरांनीही ह्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ नक्कीच घ्यायला हवा.
आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.