छत्रपती शंभूराजांनी लढलेल्या १० महत्वाच्या लढाया
शौर्य या शब्दाची एका वाक्यात व्याख्या करायची झाली तर मी म्हणेन शौर्य म्हणजे संभाजीराजे (shambhu raje).
छत्रपती शिवरायांचे थोरले पुत्र संभाजी यांनी अनेक पराक्रम केले, अनेक वेळी स्वतःची योग्यता सिद्ध केली आणि शिवरायांप्रमाणेच स्वतःचे नाव स्वतःच्या कार्याने इतिहासात अजरामर केले. शंभूराजांनी अनेक लढाया लढल्या, अनेक शुत्रूंना सळो की पळो करून सोडले. शंभुराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेणे तसे फार मोठे काम आहे पण आज आपण शंभूराजांनी लढलेल्या १० लढायांचा थोडक्यात आढावा घेऊया.
जंजिरा मोहीम
पहिली लढाई अतिशय महत्वाची आहे आणि इतिहासात शंभुराजांची हिम्मत आणि जिद्द दर्शविणारी सुद्धा. ही लढाई म्हणजे जंजिरा मोहीम. जंजीर्यावर अंमल होता सिद्दीचा आणि या सिद्दीची सर्वात मोठी शक्ति होती किल्ले जंजिरा. सिद्दीने जंजिर्यालगतचा बराच प्रदेश ताब्यात ठेवला होता. याव्यतरिक्त सिद्दी मराठ्यांच्या मुलूखात देखील उपद्रव माजवत होता आणि त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. कोकण किनारपट्टीलगतच्या मुलूखात सिद्दी धुडगूस घालीत होता म्हणून शेवटी शंभुराजांनी किल्ले जंजिरा मोहीम सुमारे 1682 च्या सुमारास हाती घेतली.
सुरूवातीला मराठा आरमाराने गलबते पाण्यात सोडून सर्व बाजूंनी सर्व शक्तिनिशी जंजिऱ्यावर मारा केला परंतु हा प्रयत्न असफल गेला, कारण किल्ले जंजिरा अभेद्य किल्ला होता. असे प्रयत्न करून किल्ला ताब्यात येत नाही म्हंटल्यावर शंभूराजांनी सागरात जंजिर्यापर्यंत सेतु उभारून पोहोचण्याचे ठरविले आणि आदेशानुसार सेतूचे बांधकामही सुरू झाले.
भलेमोठे लाकडी ओंडके, दगड-धोंडे, माती वगैरे वापरुन हा सेतु बनविण्यात आला, सेतु बांधून पूर्ण होत नाही तोच सिद्दीच्या मदतीला मुघल पुढे आले आणि मुद्दाम हसन अली खान याला कल्याण-भिवंडी येथे धुडगूस घालण्यास धाडले आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शंभुराजांनी ही मोहीम आणि हा वेढा आपले विश्वासू सरदार रघुनाथ प्रभू महाडकर यांच्या हाती सुपूर्द करून हसन अली खानच्या मागावर जाणे योजिले.
तारापूरची लढाई
दुसर्या लढाईमध्ये नजर टाकूया तारापुरच्या लढाई वर. गोष्ट आहे सुमारे १६८३ च्या आसपासची. ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ या वाक्याप्रमाणे औरंगजेबाने इंग्रज, फ्रेंच, डच, इत्यादींना शंभूराजाना विरोध करण्याचे आदेश पत्रव्यवहाराने दिले. यापुढे पोर्तुगीजाने मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजि यांना अटक केली. हे समजताच स्वतः शंभूराजे सुमारे १००० घोडदळ व २००० सैन्य घेऊन आले आणि तारापूरच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि बाहेरील शहर बेचिराख केले.
तारापूर मधील वाखारींच्या अधिकार्यांनी मराठी फौजेवर हल्ला केला आणि सोबतच गोव्याकडुन मदत मागविली. पोर्तुगीज येत आहेत म्हणून मराठ्यांनी त्यांची रसदच अडविली त्यामुळे, पोर्तुगीज जेरीस आले आणि अखेर त्यांनी मराठ्यांचे वकील येसाजी यांची सुटका केली. पुढे पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी शंभूराजांनी आपली मोहीम गोव्याकडे वळविली आणि त्यामुळे तारापूर ताब्यात येता येता राहिले.
चौलची लढाई
आता आपण पाहूया चौलची लढाई. सुमारे १६८२ च्या सुमारास शंभूराजांनी डिचोली येथे दारूगोळ्याचा कारखाना सुरु केला होता. यामुळे गोवेकर पोर्तुगीझ नाराज झाला आणि त्यांनी कोकणात रयतेची छळवणूक सुरु केली. याच काळात मराठ्यांची सिद्दीशी चकमक सुरूच होती आणि त्यातच पोर्तुगीझांनी चौल नजीकच्या किनाऱ्याजवळ सिद्दीच्या सैन्याला आणि गलबतांना आश्रय देऊ केला.
Related Posts
हि खबर जशी शंभुराजांना लागली तसे शंभूराजांनी आपले सैन्य घेऊन मोहीम चौल कडे वळविली. राजांच्या सैन्यांनी चौलचे ठाणे गाठले आणि या ठाण्याबाहेर तट उभारण्याचे काम सुरु केले. पोर्तुगीझांनी मराठ्यांवर हल्ले सुरु केले आणि मग मराठ्यांनी सुद्धा जोरदार प्रतिउत्तर दिले आणि शेवटी चौलचे ठाणे ताब्यात घेतलेच आणि तट बांधून पूर्ण केला आणि विजय मिळविला.
पुणे प्रांतातील लढाई
चौथी लढाई पाहूया पुणे प्रांतातील. साधारण १६८५ च्या सुमारास; मराठी सैन्याची सुमारे १०,००० सैनिकांची तुकडी पुणे-सुपे या प्रांतात मुघलांच्या छावण्यांवर छापा टाकीत होते. या त्रासाला कंटाळून मराठ्यांना प्रतिकार करण्यासाठी रौदंदाझ खान या मुघल सरदाराची नेमणूक झाली. इतके असूनही मराठे मुघलांवर छापे टाकून दर दिवसा एक तरी मुघल छावणी उध्वस्त करीत होते. या सततच्या हल्ल्यानी वैतागून शेवटी रौदंदाझ खान, बरामंद खान आणि अझीम खान अशी तिहेरी जोडी आपल्या फौजेसहित एकवटली आणि मराठ्यांवर प्रतिहल्ला केला.
हि परिस्थिती सांभाळण्यासाठी शंभूराजे स्वतः काही सैन्य घेऊन मदतीला धावले. शंभूराजे येणार हे समजताच मुघल सैन्य माघार घेऊन मराठा सैन्याला परांडा किल्ल्यापर्यंत घेऊन आले आणि त्याच वेळी परांडा किल्ल्यानजीक असलेले ताज्या दमाचे १०,००० घोडेस्वार मराठ्यांवर तुटून पडले आणि नाईलाजाने मराठ्यांना माघार घ्यावी लागली.
शिर्केंविरुद्धची लढाई
पाचवी लढाई अत्यंत महत्वाची आहे. या लढाईतील संघर्षच पुढे शंभुराजांना जेरबंद करण्यात कारणीभूत झाला. शंभूराजांचे विश्वासू मित्र कवी कलश यांच्या हातात शंभूराजांनी विश्वासाने स्वराज्याची अनेक कामकाजें सोपविली होती. स्वराज्याचा कारभार कवी कलशांच्या हाती जाणे हे अनेकांना खटकत होते आणि यांतच शिर्के देखील होते. शिर्के घराणे म्हणजेच महाराणी येसूबाईंचे घराणे होय. येसूबाईंचे बंधू गणोजी राजे शिर्के यांना आपले वतन हवे होते. शिर्क्यांच्या या मागणीला कवी कलशांचा विरोध होता.
शेवटी हि नाराजी लढाईत रूपांतरित झाली आणि १६८८ च्या सुमारास गणोजी शिर्के पन्हाळगडाच्या परिसरात कवी कलशांवर चालून गेले त्यामुळे कवींचा नाईलाज झाला आणि त्यांना विशाळगडाकडे धाव घ्यावी लागली. यानंतर शिर्क्यांनी विशाळगडालादेखील वेढा दिला. आपले परममित्र कवी कलश संकटात आहेत हे समजताच दस्तुरखुद्द शंभूराजे स्वतः त्यांच्या मदतीला विशाळगडाकडे धावले. शंभूराजे विशाळगडाकडे प्रस्थान करताहेत हे समजल्यावर गणोजीनी आपले सैन्य संगमेश्वरी वळविले. शंभूराजांनी कवी कलशांना सोबत घेऊन शिर्क्यांची पाळणारी फौज गाठली आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना चांगलीच अद्दल घडविली.