सावरकरांच्या लिखाणाला घाबरून त्यांच्या ‘ह्या’ पुस्तकावर ब्रिटिशांनी छपाई आधीच बंदी आणलेली
ब्रिटिशांमध्ये सावरकरांच्या लिखाणाची एवढी दहशत होती कि त्यांच्या एका पुस्तकावर छपाई आधीच बंदी आणलेली आणि हि बंदी केवळ भारतात नसून इतर अनेक देशांमध्ये सुद्धा होती
भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा कोणता असे आज विचारले तर सहज कोणीही जाणकार आपल्याला सांगेल कि सामान्यतः १८५७ मध्ये जे बंड झाले त्यालाच भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध मानले जाते. परंतु हे चित्र ब्रिटिशांच्या काळात मात्र वेगळं होतं. ब्रिटिशांनी हे स्वातंत्र्ययुद्ध नसून केवळ बंड असल्याचे नमूद केले. खरेतर १० मे १८५७ रोजी मेरठ येथील छोट्याश्या लष्करी छावणीपासून हे बंड सुरु झाले आणि पाहता पाहता याचा आक्रोश भारतभर पसरला. या युद्धाच्या ९० वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे युद्ध जवळपास वर्षभर सुरु होते आणि यात शेवटी इंग्रजांचा विजय झाला. म्हणूनच हे केवळ एक बंड होते असा ब्रिटिशांनी दावा केला.
सावरकरांच्या धान्यात हि बाब आली. त्यांनी जाणले कि या आधी स्वातंत्र्यासाठी सुरुवात झालीच नव्हती, खऱ्या अर्थाने १८५७ नंतरच अनेक ठिकाणी जनता पुढे आली, स्वातंत्र्यासाठी भांडू लागली, उठाव झाले आणि लोक जागे झाले व स्वातंत्र्यसंग्राम सुरु झाला. परंतु ब्रिटिशांनी केलेले १८५७ चे वर्णन मात्र त्यांना पटत नव्हते. त्यांनी याबाबत सखोल अभ्यास केला आणि स्वतः या १८५७ च्या उठावावर एक पुस्तक लिहिले.
या पुस्तकाचे नाव होते “१८५७ चे स्वातंत्र्यसमर”. आज हे पुस्तक सहज कुठेही उपलब्ध आहे, असे असले तरी याचा इतिहास फार रंजक आहे, हे पुस्तक भारतात एके काळी छापण्यास सुद्धा परवानगी नव्हती.
छपाईची कहाणी
सावरकरांनी या विषयावर एक पुस्तक लिहिण्याचे ठरविले यासाठी त्यांनी इंडियन ऑफिस ग्रंथालयात बराच काळ वाचन केले, संशोधन केले. ग्रंथालयात सावरकरांनी अनेक देशांतील क्रांतीची पुस्तके वाचली, अनेक पुस्तकांचे अभिप्राय वाचले, अनेक गुप्त कागदपत्रे त्यांनी अभ्यासली तसेच लष्करी कागदपत्रे, पार्लिमेंटमधील काही महत्त्वाची कागदपत्रे सावरकरांना अभ्यासता आली.
त्यांना वाटत होते कि ज्या प्रमाणे इतर देशांतील स्वातंत्र्ययुद्धांवर पुस्तके प्रसिद्ध आहेत तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर सुद्धा पुस्तक असावे आणि त्या पुस्तकातून लोकांना भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाबद्दल माहिती मिळावी, या क्रांतीयुद्धामागील विचार लोकांपर्यंत पोहोचवावा आणि त्यापासून प्रेरणा घेऊन जनतेने स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करावा हे सावरकरांच्या मनात होते.
अखेर १८ महिने अविरत अभ्यास करून सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्यांचे पुस्तक पूर्ण होईपर्यंत ब्रिटिशांना या गोष्टीची खबर लागली आणि सावरकरांना त्या ग्रंथालयात येण्याची परवानगी रद्द करण्यात आली. परंतु त्यांच्या एका मित्राने त्यांना पुढील संशोधनात सहकार्य केले व अखेर सावरकरांनी मूलतः हे पुस्तक मराठी मध्ये लिहून पूर्ण केले. आता पुढील प्रक्रिया होती या पुस्तकाची छपाई.
सावरकरांनी हे पुस्तक भारतामध्ये छपाईसाठी दिले. परंतु तोपर्यंत सावरकरांनी हे लिखाण केले आहे अशी माहिती ब्रिटिशांना मिळाली होती. त्यामुळे ब्रिटिश भारतात अनेक ठिकाणी हे पुस्तक छपाईसाठी आले आहे का याची चौकशी करीत होते. ब्रिटिशांच्या या धाकामुळे अनेकांनी हे पुस्तक छापण्यास नकार दिला. सावरकरांच्या ओळखीतील काही लोकांनी सुद्धा या पुस्तकाची छपाई भारतात शक्य नाही असे स्पष्ट सांगितले.
अखेर छपाई झाली आणि….
भारतात या पुस्तकाची छपाई शक्य नसल्यामुळे भारतातून सावरकरांची मूळ प्रत पुन्हा त्यांच्याकडे सोपविण्यात आली. हे पुस्तक सावरकरांच्या एका मित्राने जो पॅरिस मध्ये राहत होता; त्याने जर्मनी मधून हे पुस्तक छापून काढण्याचा प्रयत्न केला परंतु तिकडेही हे छापण्यास नकार मिळाला.
या पुस्तकातून सावरकरांनी ब्रिटिश सरकारविरोधात अनेक विधाने केली आहेत आणि याच गोष्टीची ब्रिटिशांना भीती होती आणि म्हणूनच त्यांनी हे पुस्तक म्हणजे राजद्रोह आहे आणि हे अतिशय भडकावणारे पुस्तक आहे अशी वावटळ उठविली. याचमुळे अनेक ठिकाणी या पुस्तकाच्या छपाईला तीव्र नकार देण्यात आला.
कितीही नकार आला तरी सावरकरांना मात्र हे पुस्तक छापून आणायचेच होते. अखेर लंडन मध्ये अभिनव भारतचे एक सदस्य होते फडके, त्यांनी आपल्या अजून एका परिचयाच्या अय्यर यांचेकडून या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करविले. हे भाषांतरित पुस्तक छापून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, यासाठी लागणारा सर्व पैसा अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांनी स्वतः उभा केला. अखेर हॉलंड मधून या पुस्तकाची छपाई यशस्वी झाली. अनेकांच्या प्रयत्नांना यश आले. परंतु इथेच हा संघर्ष थांबत नाही.
हे पुस्तक छापून आले असले तरी ते भारतात पोहोचणे महत्त्वाचे होते. यासाठी एक युक्ती काढण्यात आली, छापून आलेल्या पुस्तकांवर जे पहिले कव्हर असते त्यावर दुसऱ्याच पुस्तकांचे नाव लिहिले गेले आणि अशा पद्धतीने सावरकरांचे हे पुस्तक भारतात गुप्तरित्या आले. परंतु यावरही सरकारने कडी नजर ठेवली होती. सरकारने या पुस्तकावरच बंदी घातली. इतके होऊनही या पुस्तकाची छपाई थांबली नाही. लाला हरदयाळ, भगतसिंग यांनीही या पुस्तकाची छपाई करवून आणली. ‘इंडियन नॅशनल आर्मी’च्या अनेक सदस्यांकडून या पुस्तकाची छपाई करण्यात आली.
इतर देशांनी घेतली सावरकरांच्या पुस्तकाची दखल
एवढेच नव्हे तर पुस्तकाचे कव्हर बदलवून जपान, चीन या देशांमध्ये सुद्धा हे पुस्तक धाडण्यात आलं. मादाम कामा आणि एम टी पी आचार्य ह्यांनी या पुस्तकाचे फ्रेंच भाषेत भाषांतर केले व इ. पिरी ऑन ह्या फ्रेंच क्रांतिकारकाने पुस्तकाची प्रस्तावना लिहिली. हि प्रस्तावना एका फ्रेंच मासिकात छापून आली आणि फ्रेंच सरकारने ह्या मासिकावरच बंदी घातली. युरोपियन इतिहासतज्ञांनी आवर्जून सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक वाचून काढलं.
फक्त भारतात नव्हे तर इतर देशातील लोक सुद्धा एकमेकांना “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” हे पुस्तक भेट म्हणून देऊ लागले. सावरकरांनी लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे जणू देशभक्तीची गीता ठरली.
या पुस्तकातून आपला संदेश जनतेपर्यंत जावा हा ध्यास आणि तो ध्यास पूर्ण होण्यासाठी केलेली कठोर मेहनत. आपली एक छोटीशी गोष्ट सुद्धा फार मोठी क्रांती घडवून आणू शकते हे सावरकरांना माहित होते म्हणूनच छोट्यात छोट्या कामात सुद्धा ते अतिशय मन लावून स्वतःला झोकून देत होते व ते काम पूर्ण करीतच होते.
आज हे पुस्तक आपल्याला सहज उपलब्ध आहे, अगदी मागितले तर तुमच्या घरी सुद्धा हे पुस्तक आज पोहोचविले जाईल परंतु हे पुस्तक जनसामान्यांत पोहोचावे आणि त्यातून भारताच्या या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल लोकांना ज्ञात व्हावे आणि त्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध आवाज करावा यासाठी सावरकर आणि त्यांचे मित्र तसेच विविध संघटनांचे सदस्य यांनी फार खडतर प्रवास केला आहे हे आपण विसरता कामा नये.