भ्रष्टाचाराने भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेले हे 10 वार.
भ्रष्टाचार (corruption) हा शब्द लहान मुलालाही आता ठाऊक झाला असेल. भ्रष्टाचार हा काही आजचा प्रश्न नाही, ना तो फक्त आपल्या भारत देशापुरता मर्यादित प्रश्न आहे. संपूर्ण जगाला या भ्रष्टाचार नावच्या अजगराने विळखा घातलाय. एखाद्या देशात भ्रष्टाचार जितका जास्त तितका तो देश कमकुवत व अविकसित.अनुचित मार्गाने पैसे मिळवण्यासाठी आधिकारी,नेते व असे व्यक्ति ज्यांचा हातात अधिकार आहेत ते आपल्या अधिकारांचा गैरवापर करून स्वतःचे हित साधतात पण त्याचवेळी ते आपल्या देशाची देशातील जनतेची फसवणूक करत असतात.
न्यायव्यवस्थेतील काही कमजोरींचा कच्चा दुव्यांचा फायदा घेवून ते सहीसलामत निसटतात व आणखीन एक नवा घोटाळा करतात. तर आज आपण अशाच 10 महाघोटाळे व त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत. या 10 भ्रष्टाचाराचा प्रकरणांची नावे बहुतेक करून प्रत्येकाने कधी न कधी ऐकली असतीलच. भ्रष्टाचाराने (corruption) भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेले हे 10 वार.
१०. कोळसा खानवाटप घोटाळा
झालेल्या प्रत्येक घोटाळ्यांचा अंतिम परिणाम आपल्यावरच म्हणजे सर्वसामान्यानं वरच होतो हे आपण नेहमीच पाहतो आणि असाच एक घोटाळा जो आपल्या जगण्याशी अतिशय निगडीत आहे तो म्हणजे कोळसा खानवाटप घोटाळा. आपल्या जगण्याशी च हा घोटाळा निगडीत आहे कारण कोळश्या पासून वीजनिर्मिती होते जी की आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. भारतात सर्वात जास्त वीजनिर्मिती ही औष्णिक विद्युत केंद्रात निर्माण होते म्हणजेच कोळसा हा या वीजनिर्मितीचा प्रमुख स्त्रोत.
2012 साली घडलेल्या या घोटळ्याप्रकरणी सरकारवर असा आरोप केला गेलाय की सरकारने अनुचित प्रकारे आपल्या मर्जीतील खाजगी कंपन्यांना कोळसा खाणीचे वाटप केले. या घोटाळ्याची किम्मत प्रचंड म्हणजे सुमारे १ लाख ८६ हजार करोड रुपये. १,८६,००० लाख करोड ही रक्कम किती मोठी आहे याची कल्पना आपल्याला आलीच असेल. आणि इतका मोठा भ्रष्टाचार करणार्यांनी सरळ सरळ भारतीय अर्थव्यवस्था व भारतात राहणार्या प्रत्येकाला संकटात लोटण्याचे काम केले आहे.
९. २००८ चा २जी स्पेक्ट्रम घोटाळा
दूरसंचार क्षेत्रातील ह्या घोटाळ्याने आधीच मंदीच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला अजूनच संकटात लोटले. बेरोजगारी,महागाई यामुळे आधीच त्रस्त झालेल्या आपल्या भारत देशास एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराने पार हदरवून टाकले. या घोटाळ्यातील रक्कम होती १,७६,००० लाख कोटी रुपये. मित्रांनो घोटाळ्याची प्रचंड रक्कम पाहून तुम्हाला असे वाटत नाही का की भारताला शत्रूची गरजच नाही. हे भ्रष्ट लोक व त्यांनी निर्माण केलेली ही भ्रष्ट व्यवस्था ही बाहेरील शत्रूपेक्षा अनेक पटींनी घातक आहे.
ह्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ए राजा या तत्कालीन दूरसंचार मंत्र्यास आरोपी ठरवले गेले व याच बरोबर कनीमोळी व अनेक राजकीय नेत्यांवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले व या प्रकरणी त्यांना कैद देखील झाली.
१,७६,००० हजार लाख कोटी रूपयांचा हा घोटाळा एखाद्या छोट्या देशाचा अर्थव्यवस्थेपेक्षा ही कदाचित मोठा असू शकेल. नाही का !
८. २०१२ वक्फ बोर्ड जमीन घोटाळा
वक्फ ही मुस्लिम समुदायाच्या कल्याणासाठी व विशेषतः गरीब मुस्लिमांसाठी उभारलेली संस्था. मार्च २०१२ साली कर्नाटक राज्य अल्पसंख्यक आयोगाचे तत्कालिन अध्यक्ष अन्वर माणिप्पडी यांनी तत्कालीन मंत्री कर्नाटक सरकार यांना एक अहवाल सादर केला ज्यात म्हंटले आहे की २७ हजार एकर जमीन जी वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली होती त्या जमिनीस वक्फ बोर्ड व अन्य राजकीय नेत्यांनी अतिशय कमी किमतीत सरकारी अधिकारी व धनाढ्यांना वाटली.
या जमिनीची एकूण किंमत बाजारभावानुसार १,५०,००० लाख करोड रुपये होती. विचार करा एवढा मोठा घोटाळा की रक्कम लिहिताना माझाच गोंधळ उडतोय.
७. २०१० कॉमनवेल्थ घोटाळा
भारतीय क्रीडाविश्वाची प्रतिमा डागळणारा हा घोटाळा ज्याला कॉमनवेल्थ घोटाळा या नावाने ओळखले जाते. खरेतर आपल्याला आपल्या देशाला स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याची एक सुंदर संधी कॉमनवेल्थ गेम्स मुळे मिळाली होती व यासाठी तत्कालीन सरकारने ७० हाजार करोड रुपयाचा निधी विशेषरित्या गठित केला होता. पण प्रत्यक्षात ७० हजार कोटीचा अर्धी रक्कम सुद्धा यासाठी खर्च केलेली नव्हती.
असं म्हंटलं जात की यात केंद्रीय सतर्कता आयोग देखील सहभागी होते. यात प्रामुख्याने उपकरणांच्या खरेदीत घोटाळा केल्याचा तत्कालीन कॉमनवेल्थ गेम
आयोजकांवर आरोप केला गेला होता.
६. २००२ तेलगी घोटाळा अर्थात स्टॅम्प पेपर घोटाळा
नकली स्टॅम्प पेपर ची छपाई करण्यात तरबेज असलेला अब्दुल करीम तेलगी ज्याने आपळे जाळे जवळजवळ १२ राज्यांत पसरवले होते. तो नकली स्टॅम्प पेपर छापून त्याची विक्री बँक व तत्सम संस्थांना करायचा आणि अर्थात त्याला सरकार व प्रशासनातील व्यक्तींची साथ होती. कारण त्याशिवाय एवढा मोठा घोटाळा करणे अशक्य च.
या घोटाळ्याचे एकूण मूल्य सुमारे २०,००० करोड असल्याचे सांगण्यात येते.
५. सत्यम घोटाळा
कॉर्पोरेट क्षेत्रातील कदाचित सर्वात मोठा घोटाळा म्हणून सत्यम घोटाळा ओळखला जातो. या कंपनीचे अध्यक्ष रामलिंग राजू हेच या घोटाळ्याचे प्रमुख आरोपी होते आणि या प्रकरणात त्यांना तुरुंगवास व आर्थिक दंड सुद्धा ठोठावल्या गेला होता. रामलिंग राजू यांनी अनेक वर्ष कंपनीचा ताळेबंदामध्ये हेरफेरी करून नफा व इतर आकडा फुगवून सादर केला होता ज्यामुळे सत्यम कंपनीचा सर्वसामान्य गुंतवणूकदा रांचे मोठे नुकसान झाले होते. अर्थात प्रत्येक घोटाळ्यात नुकसान हे सामान्य माणसांचेच होते त्यामुळे हा घोटाळा त्याला अपवाद कसा असेल.
काही कालावधीनंतर टेक महिंद्रा या माहिती तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनीने सत्यमचे अधिग्रहण केले व सत्यम मध्ये काम करत असलेल्या कर्मचार्यांचा डोक्यावर लटकत असलेली टांगती तलवार नाहीशी झाली. कारण असे झाले नसते तर हजारो कर्मचार्यांचे भवितव्य अनिश्चित बनले असते.
४. ८०-९० च्या दशकातील बोफोर्स घोटाळा
पैशांचा घोटाळा हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करतो हे तर आपण जाणतोच पण जेंव्हा बाब देशाच्या सुरक्षिततेशी निगडीत असते तेंव्हा या घोटाळ्याचे स्वरूप आणखीन च गंभीर होते. असाच एक घोटाळा जो ८०-९० च्या दशकात झाला जो बोफोर्स घोटाळा या नावाने ओळखला जातो.
यात खुद्द तत्कालीन पंतप्रधानांचे नाव आले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचावर असा आरोप होता की त्यांनी स्वीडनची शस्त्रनिर्मिती करणारी कंपनी एबी बोफोर्स कडून या शस्त्रास्त्र सौदयासाठी लाच घेतली होती.हा शस्त्रसौदा 155mm फील्ड होवित्झरची पूर्तता करण्या संदर्भात होता. या सौदयातील करारा अंतर्गत 410 फील्ड होवित्झर तोफा भारताला पुरवण्याचे ठरले होते.
हा शस्त्र सौदा स्वीडनमधील त्याकाळचा सर्वात मोठा सौदा होता जो स्वीडन व स्वीडनस्थित एबी बोफोर्स ला कुठल्याही परिस्थितीत गमवायचा नव्हता. या घोटाळ्याची रक्कम 100-200 करोड असल्याचे म्हंटले जाते. असे म्हंटले जाते की हा सौदा कोंग्रेस ला सुद्धा खूप महाग पडला कारण पुढील निवडणुकीत कॉंग्रेस चा याच मुद्द्यामुळे पराभव झाला.
3.चारा घोटाळा
लालू प्रसाद यादव व चारा घोटाळा ही दोन नावे मी माझा लहानपणापासून ऐकत आलो. 1990 दरम्यान झालेला हा घोटाळा बिहार मधील सर्वाधिक चर्चित घोटाळा म्हणून ओळखला जातो. बिहारमधील पशुपालन,चारा व चिकित्सा यातील हा घोटाळा होता ज्यामुळे लालू यादव यांना तुरुंगवासही भोगावा लागला व नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. या घोटाळ्यातील रक्कम सुमारे ९०० करोड असल्याचे म्हंटले जाते.
२. १९९० ते १९९१ हवाला कांड
हा घोटाळा १८ मिलियन डॉलर चा असल्याचे बोलले जाते ज्यात तत्कालीन दिग्गज व अग्रगण्य नेत्यांवर हवाला दलालांकडून लाच घेतल्याचा आरोप होता. यात तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण आडवाणी यांचे नावही होते.
१. १९९२ चा हर्षद मेहता व केतन पारेख स्टॉक मार्केट घोटाळा
या घोटाळ्याचा सर्वात वाईट परिणाम झाला तो सर्वसामान्य गुंतवणूकदारांवर. आपल्या मेहनतीची कमाई शेअर बाजारात गुंतवून चांगल्या परताव्याची अपेक्षा करणार्या सर्वसामान्य व्यक्तीस हा जबरदस्त धक्का होता. या घोटाळ्यातील रक्कम सुमारे ५००० करोड असल्याचे सांगण्यात येते.
मित्रांनो थोडक्यात पाहू या १० महाघोटाळ्यातील रक्कम.
१. कोळसा खाणवाटप घोटाळा: सन २०१२ रक्कम १,८६,००० लाख करोड रुपये.
२. २जी स्पेक्ट्रम घोटाळा: सन २००८ रक्कम १,७६,००० लाख करोड रुपये.
३. वक्फ जमीन घोटाळा: सन २०१२ रक्कम १,५०,००० लाख करोड रुपये.
४. मनवेल्थ गेम्स घोटाळा: सन २०१० रक्कम ७०,००० हजार करोड रुपये.
५. २००२ स्टॅम्प पेपर घोटाळा: सन २००२ रक्कम २०,००० करोड रुपये.
६. सत्यम घोटाळा: सन २००९ रक्कम १४,००० हजार करोड रुपये.
७. बोफोर्स घोटाळा: सन ८०-९० : रक्कम १००-२०० करोड रुपये.
८. चारा घोटाळा: सन १९९० रक्कम ९०० करोड रुपये.
९. हवाला कांड : सन १९९०-१९९१ : रक्कम १८ मिलियन डॉलर.
१०. स्टॉक मार्केट घोटाळा: सन १९९२: रक्कम ५००० करोड रुपये.
आम्ही मुद्दामच ह्या दहा घोटाळ्यांची नावे व त्यातील रक्कम याचा लेखाजोखा पुन्हा एकदा संक्षिप्त स्वरुपात तुमचा समोर मांडला, हेतु हाच की तुम्ही या सर्व रकमेची एकूण बेरीज मांडून अंदाज घ्यावा की भ्रष्टाचारामुळे देशाचा अर्थव्यवस्थेवर किती घातक परिणाम होऊ शकतो. ही भ्रष्टाचाररूपी कीड नष्ट करणे आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो !