४ ऑलम्पिक, ४ एशियन गेम्स, ४ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ४ वर्ल्डकप खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू
भारताचा Dhanraj Pillay एक महान हॉकीपटू हॉकी फेडरेशनच्या राजकारणाचा बळी ठरला
भारताने अनेक दिग्गज आणि कौशल्यवान खेळाडू तयार केले, काळाच्या ओघात आणि खेळाच्या माध्यमांमध्ये बदल झाल्यामुळे या खेळाडूंना भारतीय संस्था विसरले असतील परंतु त्यांनी कमावलेल्या नावालौकीकामुळे भारतातील जनता आज देखील त्यांना विसरू शकलेली नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील धनराज पिल्ले (Dhanraj Pillay) हे देखील त्यातीलच एक नाव.
हॉकी फेडरेशनला गेल्या काही दिवसांपासून धनराज पिल्ले यांचा विसर पडला आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही ! परंतु हॉकीच्या या जादूगाराची आठवण भारतीय जनता मात्र नेहमीच काढते. याच हॉकीच्या जादुगराचा जीवन प्रवास आज आपण जाणून घेऊयात….
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत धनराज पिल्ले लहानाचे मोठे झाले. 16 जुलै 1968 ला अत्यंत गरीब परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला. घरात त्यांच्यापेक्षा मोठे अजून तीन भाऊ होते. मोठा होऊन आपली गरिबी दूर करेल म्हणून पालकांनी मोठ्या आशेने या मुलाचं नाव धनराज असं ठेवलं. धनराज पिल्ले यांचे वडील ग्राऊंड्समन म्हणून काम करत असत, म्हणजेच ते मैदानांची काळजी घेत.
वडिलांच्या कामानिमित्त Dhanraj Pillay यांनी भरपूर काळ पुण्यातील खडकी भागात व्यतीत केला. या भागातच हॉकीचे सर्वात चांगली मैदानं देखील आहेत. धनराज जिथे राहत असत तिथे प्रत्येक संध्याकाळी जवळपासच्या भागातील सर्व मुलं येऊन हाॅकी खेळत असत, धनराज देखील या मुलांसोबत हॉकी खेळत आणि तिथेच त्यांनी हॉकीचे सर्व डावपेच शिकले.
तेथे येणाऱ्या अनेक मुलांकडे नवीन चांगल्या हॉकी स्टीक असत. त्यांच्याकडे बघूनच धनराज यांनादेखील नवीन हाॅकी स्टीक घेण्याचा मोह आवरत नसे परंतु घरच्या परिस्थितीमुळे वडील त्यांची नेहमीच समजूत काढत. परंतु ‘तुला एक दिवस भारतासाठी हॉकी खेळायची आहे’ असं म्हणत त्यांची आई त्यांना हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहित करत असे.
मोठ्या बंधूच्या मदतीने धनराज मुंबईमध्ये हॉकीच्या सरावासाठी गेले, त्यावेळी त्यांचे मोठे बंधू रमेश एका क्लबसाठी हॉकी खेळत असत आणि त्यांच्या टीम मध्ये एका सदस्याची गरज होती. Dhanraj Pillay यांनी ती गरज पूर्ण केली आणि त्या टीमचे सदस्य झाले.
1987 च्या संजय गांधी टूर्नामेंट मध्ये धनराज यांनी जबरदस्त कामगिरी केली. त्या काळातील राजेंद्र सर्वात लोकप्रिय खेळाडू होते, परंतु धनराज यांच्या खेळण्याच्या टेक्निकमुळे आणि गतीमुळे सर्व प्रेक्षक राजेंद्र यांना सोडून धनराज यांचे कौतुक करत होते, कारण त्या सामन्यात राजेंद्र यांच्या ताब्यातील चेंडू घेऊन अगदी वेगवान पद्धतीने गोल करत त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली. प्रेक्षकांनी तर खुश होऊन धनराज यांचं नाव ‘तुफान’ असं देखील ठेवलं होतं.
ग्वाल्हेर येथे त्यानंतर काही दिवसांनी हॉकी नॅशनल सामने सुरू होते. याठिकाणी त्यांनी खूपच चांगली खेळी केली आणि एशियन गेम्स मध्ये प्रवेश केला आणि अशाप्रकारे 1989 मध्ये त्यांनी इंटरनॅशनल हॉकी खेळण्यास सुरुवात केली. त्यापुढे धनराज पिल्ले हे नाव संपूर्ण भारताला माहिती झालं. त्यांनी भारतासाठी हॉकी खेळत असताना आपल्या अद्वितीय कौशल्याचं दर्शन घडवलं. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने 1998 मध्ये एशियन गेम्स मध्ये चमकदार कामगिरी केली, त्यानंतर 2003 मध्ये एशिया कप देखील भारताला मिळवून दिला.
Dhanraj Pillay यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये तब्बल 300 पेक्षा जास्त सामने खेळले आणि या सामन्यांमध्ये त्यांनी 170 गोल केले आहेत.
त्यांच्या नंतर भारतीय हॉकी मध्ये असा खेळाडू आजपर्यंत देखील कोणीही पाहिला नाही. धनराज यांनी जे रेकॉर्ड तयार केले ते आजदेखील कुठलाही हॉकीपटू तोडू शकलेला नाही. धनराज पिल्ले यांनी चार ओलंपिक, चार एशियन गेम्स आणि चार वर्ल्डकप खेळलेले आहेत आणि त्यांच्या कौशल्यवान आणि वेगवान खेळामुळेच त्यांना राजीव खेल रत्न आणि पद्मभूषण सारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे.
धनराज यांच्या रागीट स्वभावामुळे त्यांचे नेहमीच मॅनेजमेंट सोबत खटके उडत असत. यामुळेच चांगला खेळ करून देखील त्यांना आणि त्यांच्या सहा खेळाडूंना एशियाड कप नंतर टीमच्या बाहेर ठेवण्यात आलं. धनराज त्यांच्यामते मॅनेजमेंट त्यांना योग्य मोबदला देत नाही आणि खेळाडूंना मिळणारा स्टाईपेंड देखील त्यांना दिला जात नाही.
धनराज हे आज हॉकी मधून रिटायर जरी झालेले असले तरी हॉकी बद्दल त्यांचं प्रेम कमी झालेलं नाही. 2016 मध्ये त्यांनी गरजू हॉकी प्लेयर्सला एक लाख पंचवीस हजार रुपये मदत म्हणून दिले होते. लहान मुलांना हाॅकीचे धडे देण्याचं त्यांच स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मदत देखील मागितली. हॉकी फेडरेशनने मदत करण्यासाठी असमर्थता दाखवली आणि त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
धनराज पिल्ले यांच्या आयुष्यावरती “फाॅरगीव्ह मी अम्मा” हे पुस्तक देखील लिहिण्यात आलेलं आहे. त्यांचं हे जीवन चरित्र संदीप मिश्रा यांनी लिहिलेलं आहे.
धनराज यांना राजकारणात येण्याच्या देखील अनेक संधी उपलब्ध झाल्या परंतु नेहमी त्यांनी, “मी खूपच रागीट माणूस आहे आणि मला राजकारण जमणार नाही” असं सांगत त्या संधींना नकार दिला. धनराज नेहमी म्हणतात की त्यांच्या आईने त्यांना शिकवलं आहे की कितीही मोठा झाला तरी जमिनीवर रहा, कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नकोस आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत कर.
हे हि वाचा –
- क्रिकेट सोडून भज्जी ट्रक ड्रायव्हर बनायला निघाला होता
- १००० रुपये दिले नाही म्हणून त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले