अमेरिकेच्या नाकावर टिच्चून एका मराठी माणसाने भारताचा पहिला सुपरकम्प्युटर बनवला
राजीव गांधी यांनी अमेरिकेकडे Super Computerची मागणी केली, परंतु अंतराळ, आण्विक, संरक्षण ह्या कामासाठी आमचा Super Computer वापरता येणार नाही असं त्यांनी सांगितलं.
माहिती तंत्रज्ञान सारखा किचकट विषय थोरामोठ्यांनीच हाताळायचा; अत्यंत गुंतागुंतीचा असणारा हा विषय भारतासारख्या देशाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे ही तमाम लोकांची, अगदी भारतीयांची देखील धारणा ! त्यातही आपण वऱ्हाडतले असू तर मग आपण स्वतःला अगदीच नगण्य समजायला लागतो..
परंतु हा आपला समज सपशेल खोटा ठरवला डॉ. विजय भटकर यांनी…. भारतासाठी पहिला सुपर कॉम्पुटर (Super Computer) बनवून त्यांनी जगाला थक्क करून सोडलं. खऱ्या अर्थाने सामान्य घरात जन्म घेतलेल्या भटकरांनी भारताची नवी ओळख जगाला करून दिली.
महाराष्ट्र राज्यातील अकोला येथील ‘मुरांबा’ ह्या जेमतेम २००/३०० च्या आसपास वस्ती असलेल्या गावात विजय भटकारांचा जन्म झाला. छोट्याश्या घरात, छोट्याश्या गावात जन्माला आलेल्या ह्या मुलाची स्वप्नं मात्र मोठाली होती. धडपड करत, अकोला, नागपूर, दिल्ली असं जमेल तसं शिक्षण घेत त्यांनी डॉक्टरेट मिळवली.
शिक्षणाच्या ह्या वाटेवर Vijay Pandurang Bhatkar यांनी अनेकानेक पुस्तके वाचली. “जो पुस्तकाला मित्र बनवतो, त्याला इतर कोणत्याही मित्राची गरज भासत नाही” हे तंतोतंत खरं ठरवत त्यांनी भारतासाठी पहिला वहिला सुपर कॉम्पुटर बनवला ! कुठल्याही देशाच्या मदतीशिवाय, संपूर्ण स्वदेशी असा हा “परम” उदयास आला. जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली… भारत केवळ स्वयंपूर्णच नाही तर रशिया, सिंगापूरसारख्या “प्रगत” देशांचा निर्यातदार देखील झाला…
अमेरिका बलाढ्य देश आहे, तेव्हाही होता. तत्कालीन पंतप्रधान, राजीव गांधी यांनी अमेरिकेकडे महासंगणकाची (Super Computer) मागणी केली होती. राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी नकार दिला नाही…. परंतु अंतराळ, आण्विक, संरक्षण अथवा इतर प्रगत संशोधनासाठी तो वापरण्याची मुभा नसेल तर केवळ हवामानासंबंधीच्या कामातच तो वापरावा, अश्या अटीवर देण्याची तयारी दर्शवली.
अर्थात केवळ ‘हवापण्याच्या गप्पा’ मारण्यासाठी महासंगणकाची तितकीशी गरज नव्हती. भारत हा आज विकसनशील असला तरी पुढील वर्षांत तो एक महाशक्ती म्हणून उदयास येऊ शकतो ही जाणीव अमेरिकेसह अनेक प्रगत राष्ट्रांना होती. ह्या भीतीपोटी कुठल्याच राष्ट्राने भारताला महासंगणक दिला नाही. ह्या नकारानेच भारताला संधी दिली आणि ह्या संधीचं सोनं केलं – Dr. Vijay Bhatkar यांनी!
त्यावेळी ते इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे संचालक म्हणून त्रिवेंद्रम येथे कार्यभार सांभाळत होते. केंद्र सरकारकडून जेव्हा त्यांना ह्याविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी त्वरित होकार कळवला. त्यांच्यातील सकारामक्ता व आत्मविश्वास एवढा पराकोटीचा होता की “सुपर कॉम्पुटर” बघितलेला देखील नसताना, त्याविषयीची माहिती नसताना त्यांनी ह्या विषयाला हात घातला.
एवढंच नव्हे, अमेरिकेने मागितलेल्या किमतीच्या अर्ध्या किमतीत व त्यांना तयार करायला लागलेल्या वेळेच्या अर्ध्या वेळेत डॉ. भटकरांनी “परम ८०००” तयार केला !! अमेरिकेच्या “वॉल स्ट्रीट जनरल” च्या फ्रंट पेजवर बातमी आली – इंडिया डिड इट !!
प्रगत देशांना आपल्या देशाच्या संस्कृतीची, धर्माची अध्यात्मिक ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद काय आणि इथल्या बुद्धिमत्तेची, स्वयंसिद्धतेची वैज्ञानिक ओळख करून देणारे डॉ. भटकर काय – भारताची अशी बलस्थानं असताना भारतीयांना अशक्य असं काही नाही!!
“Param 8000”, “Param 10000” ही महासंगणके दर सेकंदाला कितीतरी अब्ज गणितं सोडवू शकतात ! अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अश्या अनेक क्षेत्रात आपली महत्वाची भूमिका बजावतात ! विकसनशील देशांतील एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका व जपान सोडता फक्त भारतात आहे. स्वित्झर्लंडच्या एका प्रदर्शनात “परम” ला खरी ओळख व प्रसिद्धी मिळाली, बॅचमार्क मिळाला…
काही माणसं केवळ बुद्धिमत्तेच्या, शिक्षणाच्या किंवा त्यांच्या कार्यक्षेत्राच्या अनुषंगानेच नव्हे तर “माणूस” म्हणूनही मोठी असतात ! परम वर काम करणाऱ्या सर्वच सहकाऱ्यांच्या योगदानाचं मोल जाणून डॉ. भटकरांनी ‘परम’चा कॉपीराईट स्वतःकडे ठेवला नाही.
अश्या ह्या माणूसपणाचं भान राखून जगणाऱ्या डॉ. भटकरांचं “परमेश्वर” श्रद्धास्थान आहे !! एक शास्त्रज्ञ आणि आस्तिक ! जगाच्या दृष्टीनं विरुद्ध असणारं हे समीकरण आहे. परंतु डॉ. भटकर हे नेहमी स्वतःच्या मूल्यांवर जगत आले आहेत.
ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून २० लाख लोकांना शिक्षण देणारे Dr. Vijay Bhatkar ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत सारखे पौराणिक ग्रंथ ह्या सुपर कॉम्पुटरवर आणून ठेवतात ! आळंदीला भक्तिभावाने जाणारे डॉ. भटकर आळंदीत मल्टिमीडिया प्रोजेक्ट स्थापन करतात. तद्वतच १६ प्रमुख भाषा संगणकावर आणतात, दूरदर्शनचं प्रसारण रंगीत करून टाकतात !
अश्या ह्या असामान्य व्यक्तीवर अनेकानेक पुरस्कारांची उधळण न झाली तर नवलच ! संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयावर डॉ. भटकरांचे कित्येक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. त्यांना महाराष्ट्रभूषण, प्रियदर्शिनी पुरस्कार, पद्मश्री यांसारखे देशातील तसेच विदेशातील कित्येक सन्मान मिळाले आहेत. एवढेच नव्हे तर भारतात डॉ भटकरांना Father of Supercomputer in India म्हणून ओळखल्या जाते.
विज्ञानाचे कट्टर समर्थक, संशोधक, लेखक, प्राध्यापक त्याचप्रमाणे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदे भूषवत असलेले डॉ. भटकर हे निस्सीम ईश्वरभक्त आहेत… विज्ञानाचा आध्यात्माशी असलेला हा सुंदर मिलाफच म्हणावा लागेल !