भुजिया विकून २१ हजार करोडचं साम्राज्य उभं केलं
फक्त १०० रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून, भुजिया विकून तब्ब्ल २१ हजार करोडची कंपनी कशी काय उभी राहते ?
छोटा उद्योग सुरु करून, अनेक अडचणींवर मात करत, कसे लोकांनी संकटाना समोरे जाऊन यशाची शिडी चढली, अश्या प्रेरणादायी कथा ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. अशीच काहीशी गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, हि गोष्ट आहे भारतात सर्वात जास्त प्रसिद्ध असणाऱ्या ‘हल्दीराम मिठाईवाले’ यांची…
फक्त १०० रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून, भुजिया विकून तब्ब्ल २१ हजार करोडची कंपनी कशी काय उभी राहते ? हल्दीराम सोबत नक्की काय घडले ? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
पवित्रा कुमार यांच्या Bhujia Barons या पुस्तकांमधील हल्दीरामच्या यशाचे आणि या कंपनीचा आंतरराष्ट्रीय ब्रँड बनण्यापर्यंतची सर्व कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गंगाभीषण अगरवाल (Gangabhishn Agarwal) यांना घरी प्रेमाने ‘हल्दीराम’ म्हटले जायचे. त्यांचा जन्म बिकानेर मध्ये एका मारवाडी कुटुंबामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे बिकानेरमधल्या भुजिया बाजारामध्ये एक लहान दुकान होते. हल्दीरामच्या वडिलांचे भुजियाचे दुकान होते. ते विकत असलेली भुजिया त्यांच्या बहिणीकडून शिकले होते. हि भुजिया फक्त बेसनापासून बनवलेली जाड भुजिया होती.
हल्दीरामने भुजियामध्ये दोन साधारण बदल केले. त्यांनी भुजियामध्ये मटकीचे प्रमाण वाढवले, जेणेकरून भुजिया खायला जास्त चवदार लागेल आणि लोकांचे या चवीकडे जास्त आकर्षण वाढेल. त्यानंतर त्यांनी भुजियामध्ये दुसरा बदल केला जेणेकरून भुजिया बारीक, कुरकुरीत आणि खुसखुशीत लागेल. हल्दीरामने केलेला हा बदल लोकांना खूप आवडला. ह्या बदलानंतर लोक इतर दुकानांमध्ये जाण्यापेक्षा त्यांच्याच दुकानातून भुजिया खरेदी करायला जावू लागले.
परंतु, १९४४ आणि १९४५ हे वर्ष हल्दीरामसाठी खूप अडचणीचे गेले. हल्दीराम यांची पत्नी चंपा आणि त्यांच्या परिवारात खूप वाद होऊ लागले. पत्नी चंपाने ते घर सोडून दुसरीकडे जावूया अशी अपेक्षा मांडली. हल्दीरामने खूप समजले पण त्यांच्या बायकोने त्यांचं काही ऐकले नाही, अखेर ते दोघे त्यांच्या मुलाबाळांसोबत घर सोडून निघून गेले. हल्दीरामने त्याच्या मर्जीने घर सोडल्यामुळे त्याला एक रुपयादेखील दिला गेला नाही. हल्दीराम यांना त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेतून बेदखल करण्यात आले. अशावेळी त्यांच्याकडे राहायला घर नव्हते, दुकान नव्हते. परंतु, हार न मानता त्यांनी काम शोधायला सुरुवात केली.
एकदा हल्दीराम बिकानेरमध्ये काम शोधात फिरत होते, अचानक त्यांना कुणीतरी आवाज दिला आणि तो आवाज देणारा त्यांचा लहानपणीच मित्र अल्लाबेली होता. एकेकाळी हल्दीरामने अल्लाबेलीला काहीतरी नवीन करायचे होते म्हणून २०० रुपयाची मदत केली होती आणि हि गोष्ट अल्लाबेलीच्या लक्षात होती. हल्दीरामने त्याच्या अडचणींबद्दल सांगितले तेव्हा अल्लबेलीने त्याच्याकडे असलेले केवळ १०० रुपये हल्दीरामला दिले. याच १०० रुपयांपासून त्यांचा २१ हजार करोड रुपयांचे साम्राज्य उभं करण्याचा प्रवास सुरु झाला.
प्रथम त्यांनी एक घर भाड्यावर घेतेले आणि आपल्या पत्नीसोबत आता पुढे काय करायचे यावर ते चर्चा करू लागले. हल्दीराम यांच्या लक्षात आले कि, त्यांच्या पत्नीला खूप चविष्ट अशी मुगाची डाळ बनवता येते आणि हि डाळ रस्त्यावर, लोकांच्या घराघरात जाऊन विकत येईल. हि कल्पना डोक्यात ठेऊन त्यांनी पत्नीसोबत मुगाची डाळ बनवून घराघरात विकायला सुरुवात केली. भुजिया प्रमाणेच त्यांची मूगडाळ सुद्धा अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. मुगाची डाळ विकून त्यांनी इतका पैसा जमा केला कि, आता ते आरामात त्यांचे एक दुकान उघडू शकत होते.
हल्दीरामने बिकानेमधल्या चिंतामणी कॉम्प्लेक्समध्ये त्याचे पहिले दुकान चालू केले. मुगाच्या डाळीसोबतच त्यांनी भुजियादेखील विकायला सुरुवात केली. हल्दीरामला भुजिया विकून खूप नफा मिळाला. हल्दीराम यांच्या मनात व्यवसाय वाढवायची कल्पना अजिबात नव्हती पण एकदा, हल्दीराम कोलकाता येते त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. जाताना हल्दीराम आपली भुजियासुद्धा सोबत घेऊन गेले. हल्दीरामची भुजिया लग्नातील मंडळींना इतकी आवडली कि त्यांनी कोलकाता येथे दुकान सुरु करावे असे सांगितले. हल्दीरामने हि कल्पना त्याच्या बायकोच्या व मुलांच्या समोर मांडली आणि सर्वांनी या कल्पनेला मंजुरी दिली आणि या क्षणापासून हल्दीराम ह्या ब्रँडचा विस्तार व्हायला सुरवात झाली.
कोलकाता येथे हल्दीरामचा भुजियाचा व्यवसाय हल्दीरामचा मुलगा रामेश्वर व रामेश्वरच्या मुलांनी मिळून चालवला. कोलकाता येथे हल्दीरामचा व्यवसाय हल्दीराम भुजियावाला किंवा हल्दीराम प्रभुजी या नावाने ओळखला जाऊ लागला. त्यानंतर हल्दीरामचा दुसरा मुलगा मुलचंद याने त्याच्या मुलांसोबत व नातूंसोबत मिळून नागपूर, बिकानेर आणि दिल्लीमध्ये व्यवसाय चालू केला. यानंतर हल्दीरामचा तिसरा मुलगा सतीदास याने त्याच्या मुलांसोबत व नातूंसोबत मिळून कोलकाता येथेच त्यांचा व्यवसाय वाढवला आणि तो व्यवसाय “हल्दीराम अँड सन्स” या ब्रँडच्या नावाने विकसित झाला.
काही काळानंतर “हल्दीराम अँड सन्स” हा ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा विकसित होऊ लागला. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हल्दीरामच्या अनेक प्रकारचे उत्पादन विकल्या जावू लागले. ह्यात महत्वाची बाब म्हणजे “हल्दीराम अँड सन्स” हा एकमेव असा भारतीय ब्रँड बनला आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सर्व लोक खूप सहजपणे ओळखतात.
हल्दीरामने भुजियासोबतच अनेक नवीन प्रोडक्ट आणले यात अनेक प्रकारचे स्वीट्स, स्नॅक्स, सिरप्स, रेडी टू कुक मसाला इत्यादींचा समावेश होतो. या व्यतिरिक्त हल्दीरामचे अनेक ठिकाणी रेस्ट्रॉरंटस देखील उभे केले गेले. आज बघितले असता हल्दीरामचे मार्केट कॅपिटल तब्बल २१ हजार करोड एवढे आहे. 2019 साली कंपनीचा रेव्हेन्यू जवळपास ५ हजार करोड एवढा होता.
अनेक विदेशी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करून भारतात स्नॅक्स विकायचा प्रयत्न केला पण मार्केटमध्ये हल्दीरामच्या ब्रॅण्डने असा काही पाय रोवला आहे, ज्याला उखडून काढणे खूप कठीण आहे. पेप्सीसारख्या मोठ्या कंपनीने हल्दीराम कंपनीला विकत घेण्याचाही प्रयत्न केला पण त्यांच्याही हाती अपयशच आले.