क्रिकेट सोडून भज्जी ट्रक ड्रायव्हर बनायला निघाला होता
सौरव गांगुलीने त्या दिवशी Harbhajan Singh ला थांबवलं नसतं तर आपला भज्जी आज ट्रक ड्रायव्हर असता
भारतीयांना असलेलं क्रिकेटचं वेड संपूर्ण जगाला ज्ञात आहे. अनेकदा भारताच्या क्रिकेट टीमची मॅच चालू असली कि लोक हातातलं काम सोडून मॅच बघायला बसतात. भारतीय संघाला अगदी पूर्वीपासूनच उत्कृष्ट खेळाडूंचा वारसा लाभला आहे. ह्यात कपिल देव पासून आताच्या महेंद्रसिंग धोनी पर्यंत सगळ्यांची नावं येतात. जितके चांगले बॅट्समन देशाने भारतीय संघाला दिले तितकेच उत्तम बॉलर्स सुद्धा दिले. ह्यात झहीर खान, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह ह्या सारख्या अनेकांची नावं येतात. पण ह्यात आवर्जून एक नाव घेतलं गेलं पाहिजे आणि ते म्हणजे हरभजन सिंग ह्याचं.
भारताचा नामवंत स्पिनर हरभजनला आपण सगळे The Indian Turbinator नावानं ओळखतो. अनेकदा कठीण काळात एकट्या भज्जीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने सामने जिंकले आहेत. आपल्या लाडक्या भज्जीचा जन्म ३ जुलै १९८० ला जलंदर मध्ये झालेला. हरभजनची मैदानावरची आक्रमकता आपण सगळेच ओळखून आहोत. भज्जी जेवढा आक्रमक आणि रागीट दिसतो तो तेवढाच मजेदार आणि सारखी कुणाची ना कुणाची नक्कल करणारा माणूस आहे.
हरभजनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंतचा प्रवास चांगलाच खडतर होता. मध्यमवर्गीय परिवारातून असून सुद्धा भज्जीला त्याच्या क्रिकेटच्या वेडापायी वडलांनी क्रिकेट अकादमीत शिकायला पाठवलं. पण घरच्यांपासून पहिल्यांदाच दूर राहायला गेलेल्या भज्जीचं तिथे काही मन लागेना. एक दिवस त्याने आपापली बॅग उचलली आणि घरची ट्रेन पकडायला स्टेशनवर गेला. योगायोगाने त्याचे कोच देखील स्टेशनवर होते. त्यांनी भज्जीला काही दिवस थांब म्हणून सांगितलं. पण त्यानंतर हरभजन क्रिकेटमध्ये एवढा रंगला कि घरच्यांची आठवण येणंच बंद झालं.
Harbhajan Singh सुरवातीला एक बॅट्समन म्हणून ट्रेनिंग घेत होता पण एक दिवस प्रशिक्षकांनी भज्जीला बॉलिंग करताना बघितलं आणि त्या दिवसापासून सगळंच बदललं. हरभजनच्या कोचने त्याच्या बॉलिंगमध्ये काहीतरी वेगळं हेरलं होतं, त्यांनी हरभजनला बॉलिंगचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. पुढे जाऊन हरभजन एक धडाकेबाज बॉलर म्हणून नावारूपास आला हे आपण सगळ्यांनीच बघितलं आहे.
हरभजनला क्रिकेट संघात स्थान मिळालं खरं पण अनिल कुंबळे सारखा प्रभावी स्पिनर संघात असल्यामुळे भज्जीला खेळायची संधीच मिळत नव्हती. अचानक वडलांच्या झालेल्या निधनामुळे घरची जबाबदारी भज्जी वर येऊन पडलेली. त्याने आपल्या दोन बहिणींचे लग्न लावून दिले. ह्या काळात हरभजन चांगलाच दडपणाखाली आलेला. क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही म्हणून तो सगळं सोडून कॅनडाला जाण्याचा विचार करू लागला. कॅनडात ट्रक चालवून घरचा आर्थिक गाडा हाकण्याचं त्याने ठरवलं होतं. परंतु ह्या परिस्थितीतून त्याला सौरव गांगुलीने सावरलं आणि भारतीय संघात स्थान मिळवून दिलं.
२००१ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या टेस्टमॅच मध्ये हरभजनचं करिअरंच बदललं. ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन भारतीय गोलंदाजांवर चांगलेच तुटून पडले होते. कॅप्टन गांगुलीलाही काय करावे काळात नव्हते. शेवटी त्याने भज्जीला बॉलिंग करायला बोलावलं. हरभजनने ह्या मिळालेल्या संधीचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग ऑर्डरचं कंबरडंच मोडलं. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ३ मुख्य फलंदाजांची विकेट घेतली. एवढंच नव्हे तर ३ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये Harbhajan Singh ने तब्बल ३२ विकेट्स घेतल्या.
आणि त्या दिवशी हरभजनला संपूर्ण देशाने ‘भज्जी’ म्हणत अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्या दिवसानंतर हा भज्जी थांबला नाही.
हरभजन सिंगने आपल्या करिअरमध्ये १०३ टेस्ट मॅच, २३६ वन-डे आणि २८ टी-२० मॅच खेळल्या आणि ह्या तीनही प्रकारात मिळून त्याने तब्बल ७११ विकेट्स घेतल्या आहेत. २००३ साली हरभजनला खेळातील सर्वोत्कृष्ट समजला जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. क्रिकेट ह्या खेळाला दिलेल्या योगदानाबद्दल २००९ साली भारत सरकारने भज्जीला पदमश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं.