Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

स्वराज्याची पहिली लढाई आणि छत्रपती शिवरायांची कूटनीती

बापरे ! आपल्या शिवरायांचे स्वराज उभे राहायच्या आधीच हा हल्ला. १८ वर्षांचे शिवबा आणि मोजकी फौज, काय करावं ? आपला निभाव लागेल का शत्रूसमोर ?

स्वराज उभारणाच्या लगबगीला सुरुवात झाली होती. नुकतीच तर सुरुवात होती. आत्ताशी कुठे चाकण किल्ला ताब्यात आला होता. शिवराय आपल्या महालात झोपलेले, पहाटे राजे उठले सईबाईंसोबत गप्पा झाल्या, राजांनी स्नान आटोपते केले. दिवस नेहमीसारखाच उत्साही ! माँसाहेबांना भेटून राजे फडावर आले, थोड्यावेळात वर्दी देण्यात आली कि ‘बाजी पासलकर’ आलेत. अचानक बाजी ? कशासाठी बरं ? राजे आले, बाजींना भेटले… बाजींचा चेहरा आज राजांना पाहून फुलला नाही…राजांनी ते हेरले.

राजे : बाजी काय झालं, इतक्या तातडीनं आलात ?
बाजी : माँसाहेबांना भेटायचंय, त्यांना वर्दी द्यावी.
राजे : चला !
माँसाहेब : बाजी ! अचानक येवढ्या तातडीनं निरोप ?
बाजी : माँसाहेब, राजांनी चाकण घेतला याची तक्रार शिरवळ मधून करण्यात आली, हि बातमी जाताच बादशहा अस्वस्थ झाला आहे. शहाजीराजे सुद्धा तिकडे दक्षिणेत असल्यामुळे दरबाराच्या कारवाईला सावरणार कोण ? यामुळे, आदिलशहाने आपला बंदोबस्त करण्यासाठी ‘फत्तेखान’ पाठविला आहे, त्याने वीजपुर सोडलं देखील ! बातमी लागताच ताबडतोब हिकडं आलो बगा.

माँसाहेब काही बोलायच्या आधी राजे हसले, म्हणाले “बाजी, अहो इतकंच ना ! केवढे घाबरलो आम्ही, इतक्या तातडीनं आलात आम्हाला वाटले काय इतका महत्त्वाचा निरोप असावा ! तसं म्हणायचं तर आमच्या अपेक्षापेक्षा हा हल्ला थोडा उशिरानं होत आहे असा म्हणावं लागेल. असूदेत, आम्ही सुद्धा तयार आहोत. १८ वर्षांचे शिवराय… इतक्या सहज इतक्या मोठ्या शत्रूशी दोन हात करायला तयार होतात हे ऐकून बाजी म्हणतात, “राजं, केस पांढरं झाल्यात माझं.. हे सोपं न्हाई. “

शिवराय म्हणतात, “बाजी याची काळजी आम्हाला आहेच पण….माँसाहेब तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही यशस्वी होऊ.”

बाजी म्हणतात, ” राजं, लढाई फक्त पाहण्याचा शौक न्हाई आमचा…या मनगटात अजून बी लय रग हाय !

राजे: चला तर मग बाजी… सज्ज व्हा ! स्वराज्याच्या पहिल्या लढाईची जबाबदारी आजपासून तुमची, सर्वांना गोळा करा !

बापरे ! आपल्या शिवरायांचे स्वराज उभे राहायच्या आधीच हा हल्ला. १८ वर्षांचे शिवबा आणि मोजकी फौज, काय करावं ? आपला निभाव लागेल का शत्रूसमोर ?

जैय्यत तयारी

फत्तेखान चालून येतो आहे. राजे लगेच हालचालींना वेग देऊ लागले. राजांनी बऱ्याच सरदारांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या, हेर कामाला लावले, स्वराज्याचा खजिना सुरक्षित ठिकाणी ठेवला. राजे मग बाजींसोबत गडउतार झाले आणि पुरंदरकडे रवाना झाले. पुरंदर गडावर सारी फौज आणि मातब्बर सरदार गोळा झाले, गड भक्कम, गडावर दारूसाठा मुबलक याचसोबत गडावर अनेक तोफा सज्ज होत्या. शत्रूची भीती वाटण्याच्या ऐवजी स्वराज्याची पहिली लढाई म्हणुन मावळे जरा जास्तच खुशीत आणि स्फूर्तीत होते.

छत्रपती शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याची पहिली लढाई, शिवरायांची कूटनीती, स्वराज, फत्तेखानावर फत्ते, Chatrapati Shivaji Maharaj, shivaji Maharaj Information in marathi, Hindavi Swarajya, Buzz Marathi
(Image Source – pinterest.com)

राजे गडावर येण्याआधीच लढाईसाठी असलेली हि तयारी आणि तत्परता पाहून शिवबा सुखावले. हेरांनी पुढील बातमी आणली, फत्तेखान याने ‘खळत-बेलसर’ येथे आपला मुक्काम बसविला. यानंतर त्याने त्याचा प्रमुख सरदार ‘बाळाजी हैबतराव’ याला काही फौज देऊन शिरवळ येथील आदिलशहाच्या अमिनाच्या ठाण्याकडे रवाना केले आणि मग बाळाजीचे सैन्य सुभानमंगळ गढीवर ठाण मांडून होते. राजांची युक्ती अशी कि आपण जाण्यापेक्षा फत्तेखान पुरंदरवर चाल करून यायला हवा. या दिशेने पाऊले टाकायला सुरुवात झाली.

शेवटी असे ठरले कि सर्वप्रथम आपण गुपचूप जाऊन बाळाजी हैबतराव आणि त्याची फौज उध्वस्त करू, यामुळे फत्तेखान सरळ पुरंदरवर चाल करून येईल. यावर क्षणाचाही विचार न करता ‘कावजी मल्हार’ पुढे सरसावले, म्हणाले, “राजं हे माजावर सोपवा, मला तिथली समदी माहिती हाय!” आणि अशा तऱ्हेने स्वराज्याची पहिली मोठी कामगिरी हक्काने कावजी मल्हार यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्याच रात्री गडाखाली आपली फौज घेऊन कावजी गोळा झाले, शिवरायांचा निरोप घेऊन ते निघाले.. सुभानमंगळगढीच्या दिशेने.

हैदोस

मराठ्यांचा दरारा इतका होता, कि मराठे येत आहेत हे कळल्यावर बाळाजींचे सैन्य लगेच सुभानमंगळ या गढीवर आश्रयाला गेले. मराठे मोठे दणकट, ते ऐकतात व्हय ! उलट त्यांना अजूनच स्फुरण चढले आणि एखादा पिसाळलेला हत्ती जावा तसे मराठे त्या छोट्या गढीवर धावून गेले. गढी जुनी पण साधी होती, मातीचे तट त्या गढीवर होते, खंदकही छोटे…अशा किल्ल्यावर सगळे मराठे तुटून पडले. मावळे आपल्या बाणांनी गनिमांच्या मुंडक्या वेगळ्या करीत होते, तटावर अनेक जण मारा करीत होते, कावजी तर सरळ जाऊन दरवाज्यावर धडक मारीत होते.

घाबरलेले गनीम जे हातात येईल ते गडावरून फेकत होते… पण सारेच बेअसर ! मराठे काही थांबेनात. काही वेळात गड भेदला गेला, हरहर महादेवच्या आक्रोशाने आसमंत घुमवत मराठे संपूर्ण ताकदीनिशी गनिमांवर तुटून पडले. गनिमाला हत्यार काढायलाही मराठ्यांनी वाव दिला नाही इतका आकस्मिक हल्ला मराठ्यांनी केला. कावजीने बाळाजीचा किस्सा साफ केला, गडावरील घरं आगीच्या कुशीत सोपविली…गडावर मराठ्यांचा हैदोस सुरु होता. सुभानमंगळ वरून शत्रूला पराभूत तर केले पण इथेच न थांबता कावजीने तेथून प्रचंड लूट गोळा केली आणि शिवरायांच्या चरणी ठेवली.

फत्तेखानावर फत्ते

राजांनी जसे ठरविले होते, त्याचप्रमाणे फत्तेखान आता पुरंदर गडावर चालून येत होता. गडावर मराठे सज्ज होते. गनिमाचे सैन्य गडाच्या पायथ्याशी आले होते, अनेकजण तटावरून चढून गडात प्रवेश करण्याच्या तैयारीत होते. अशातच मराठे हरहर महादेव म्हणत गडावरून उतरले आणि थेट जाऊन फत्तेखानच्या सैन्यावर तुटून पडले. काही सैन्य गडावरून हल्ल करत होते, तटावरून येणाऱ्या गनिमांवर दगडधोंडे पडत होते. गनिमाला हि लढाई कठीण जाऊ लागली. थोड्याच वेळात बाजी घोड्यावर स्वार झाले, शिवरायांनी थांबविताच ते म्हणाले, राजं म्या हितं निस्ता उभा राहून लढाई पाहू कि काय….जातो अन विजय घेऊनच माघारा येतो. बाजीसुद्धा गडावरून खाली उतरले आणि शरीराने म्हातारे असूनही बाजी गनिमांना सपासप वार करत होते.

फत्तेखानच्या सैन्यात मुसेरखान हा एक शक्तिशाली लढवैय्या होता. तो मात्र मराठ्यांना पुरून उरत होता. तो आटोक्यात येत नाही म्हंटल्यावर मराठ्यांचे भरभक्कम असे गोदाजी मुसेरखानवर धावून गेले, पहिल्याच फटक्यात त्यांनी मुसेरवर भाल्याने वार केला, मुसेरखान पडला. हे दृश्य पाहून स्वतः फत्तेखान पळू लागला, त्याचे बरेचसे सैन्य पुन्हा माघारे जाऊ लागले. हे बाजींनी पहिले, शत्रू पाळतो म्हंटल्यावर बाजींनी थोडे सैन्य सोबत घेतले आणि थेट शत्रूचा पाठलाग करीत त्याच्या मागे पळाले.

मराठे गडाचा पायथा साफ करून गनिमांना यमसदनी धाडून विजयी होऊन आले, सगळे थकले पण बाजींचे वृद्ध शरीर मात्र मोजके मराठे घेऊन सरळ फत्तेखानच्या मागे पळाले, फत्तेखान गेला त्याच्या खळत-बेलसरच्या छावणीत…पाहतो तर बाजींचे सैन्य तिथपर्यंत त्याचा पाठलाग करीत आले होते. अक्खी छावणी मराठ्यांनी बेचिराख करून सोडली.

गडावर जल्लोष उमटत होता, स्वराज्याची पहिली लढाई अशी झाली कि खुद्द शत्रू घाबरून पळाला. अक्खी रात्र उलटली तरी खानाच्या मागे गेलेल्या फौजेचा पत्ता नव्हता. राजे सकाळी उठले, पाहतात तर धुळीचे लोट उठवीत मराठे येत होते. फौज गडावर आली, सारे शांत ! राजे गडबडले…”गोदाजी काय झाले ? आपला विजय झाला ना ?”… गोदाजी म्हणतात “व्हय राजं आपण जिंकलो खरं पण…” .. “पण काय?” राजे विचारतात. गोदाजी हताश होऊन मागल्या पालखीकडे हात दाखवतात… राजे जातात पालखीकडे पाहतात तर काय.. बाजी ! वाईटरीत्या जखमी झालेले बाजी हसतमुखाने राजांना पहात होते. राजांचे डोळे भरले… राजे म्हणाले, “बाजी, अहो असे विजयी चांदणेही नको होते ज्यात तुमच्यासारखा चंद्र गमवावा लागावा.”

बाजी हसत म्हणतात, “राजं असं मरण मला मागून बी मिळायचं न्हाई…..हसा राजे आपण विजयी झालो” आणि बाजींनी शिवरायांच्या हातात प्राण सोडले.
(स्रोत: श्रीमान योगी, रणजित देसाई)

खरंच.. स्वराज्याची पहिली लढाई आणि हे स्वराज्याचे पहिले बलिदान. शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी हसत हसत स्वतःचे प्राण देणारी आणि प्रसंगी शत्रूला यमराज बनून धडकी भागविणारी माणसं होती म्हणून हे स्वराज्य उभे राहिले, म्हणून शिवराय छत्रपती झाले. अशा राजांना आणि अशा मराठ्यांना शतशः वंदन.


Leave A Reply

Your email address will not be published.