निव्वळ एका टॉसने राष्ट्रपतींची सोन्याने मढलेली बग्गी भारताला मिळाली ?
फाळणीच्या वेळी भारत – पाक मधील एक महत्वाचा प्रश्न कॉईन टॉस करून सोडवला होता
असा एकही प्रश्न शोधून सापडायचा नाही जो भारत पाकिस्तानमध्ये मार्गी लागला असेल. अहो जास्त कशाला विचार करता, काश्मीरचंच उदाहरण घ्या ना. अगदी १९४७ पासून काश्मीरवरून या दोन देशांमध्ये जे द्वंद सुरू आहे, ते आजतागायत थांबलेलं नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेपासून ते विविध जागतिक संघटनांच्या व्यासपीठावर हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला. मात्र त्यावर तोडगा अद्यापही नाहीच.
भारत – पाकिस्तान संबंध नेहमी एवढे तणावाचे राहिले आहेत की समस्या सोडवणं तर सोडाच चर्चेलाही सुरवात होईल की नाही याचीच पंचायत असते. मात्र इतिहासामध्ये यालाही एक अपवाद आहे. एकमेकांचं तोंडही न पाहू इच्छिणाऱ्या या दोन देशांमधील एक महत्वाचा प्रश्न हा निव्वळ एका टॉसने सोडवला. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत निव्वळ एका टॉसने या कट्टर वैरी देशांमधील समस्या पाहता पाहता सोडवली. आता तुमची उत्कंठा नक्कीच शिगेला पोहचली असणार की भारत पाकिस्तानमधील ती कोणती गोष्ट होती जिचा निकाल निव्वळ एका टॉसने लावला.
आपल्यापैकी बऱ्याच जणांनी राष्ट्रपतींना एका खास बग्गीमधून फिरताना पाहिलं असेल. हो-हो तिच बग्गी जिला रुबाबदार घोडे खेचत असतात. ज्यात बसून राष्ट्रपती शपथविधी किंवा इतर महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतात.
भारताच्या फाळणी वेळी भारत पाकिस्तानमध्ये सर्व गोष्टींचे वाटप सुरू होते. त्यामध्ये या बग्गीचाही समावेश होता. स्वातंत्र्यापूर्वी भारताचे व्हॉईसरॉय ती बग्गी वापरायचे. आता भारताच्या व्हॉईसरॉयची बग्गी म्हटल्यावर ती होतीही तशीच रुबाबदार. त्यामुळे दोन्ही देश तिच्यावर हक्क सांगू लागले. आता बग्गी एक आणि मागणारे दोन, त्यात एकही मागे हटायला तयार होईना. शेवटी करायचं काय, हा पेच सर्वांसमोर उभा राहिला.
यावर एक अतिशय साधा सरळ सोपा उपाय काढण्यात आला. अधिक सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा उपाय नशिबावर अवलंबून होता. यासाठी व्हायसरॉयच्या तत्कालीन अंगरक्षक तुकडीतून हिंदू कमांडंट आणि मुस्लिम डेप्युटी कमांडंट यांच्यात एक टॉस करण्यात आला. भारताने टॉस जिंकला आणि ही रॉयल बग्गी भारतात राष्ट्रपतींच्या सेवेसाठी हजर झाली.
या बग्गीची खासियत म्हणजे अशी की, ही बग्गी सोन्याने मढलेली आहे. बग्गीच्या दोन्ही बाजूला सोन्यात कोरलेले भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोकचक्र आहे. एवढंच नव्हे तर ही बग्गी खेचणारे घोडे, हे काही साधेसुधे घोडे नसून ऑस्ट्रेलियन ब्रीडचे जातीवंत घोडे असतात.
१९८४ पर्यंत या बग्गीचा वापर राष्ट्रपतींमार्फत केला जात होता. मात्र इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सुरक्षेच्या कारणास्तव या बग्गीचा वापर बंद करण्यात आला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१४ साली या बग्गीचा वापरास पुन्हा सुरवात करून बंद पडलेल्या परंपरेस पुन्हा चालना दिली आणि हीच परंपरा पुढे नेण्याचे काम सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदही करत आहेत.
Wah