IPL मध्ये एवढा पैसा येतो कुठून? नेमकं बिझनेस मॉडेल काय आहे?
क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, ह्या खेळांने भारतीयांना वेड लावले आहे. क्रिकेटच्या बाबतीत कोणतरी बोललं आहे ‘इंग्रजांनी चुकून एका भारतीय खेळाचा शोध लावला तो म्हणजे क्रिकेट’. असा हा खेळ भारताच्या गल्लीबोळात सर्रास खेळला जातो. पण गेल्या अनेक वर्षांपासून यात क्रांती घडवणारा प्रकार म्हणजे इंडियन प्रीमियर लीग IPL. व्यवसायिक लोकांच्या दृष्टिकोनातून पैशाच्या पाऊस आणि सर्वसामान्य लोकांना मनोरंजनाचा एक चांगला पर्याय असा दुहेरी उपयोग असणारा हा उपक्रम. पण अनेकांना प्रश्न पडतो की यातून नेमका पैसा कसा मिळवला जातो? तर त्याच उत्तर तुम्हाला या लेखात मिळणार आहे.
IPL ची सुरवात
तत्कालीन राजकारणी आणि क्रिकेट समन्वक ललित मोदी (सध्या भाऊ परदेशात फरार आहेत) यांची ही कल्पना. याचा मूळ आधार युरोपात होणाऱ्या फुटबॉलच्या मॅचेस. युरोपातील तुफान लोकप्रिय असणाऱ्या या स्पर्धेला EFL म्हणून ओळखतात. आपल्या ललित भाऊंनी EFL वरून IPL ही आयडिया आणली आणि आपल्याकडे पण तुफान लोकप्रिय झाली अगदी पहिल्या वर्षांपासून. IPL मध्ये झालेल्या ओलढालीने अख्खा जगाचं लक्ष वेधलं, खेळाडूंना पहिल्यांदाच एवढा पैसा हातात येऊ लागला आणि मुख्य म्हणजे आपली BCCI मालामाल झाली. मग हा पैसा मिळतो कसा ते पाहू…
मीडिया हक्क
IPL च्या खेळात सगळ्यात जास्त पैसे मिळतात ते मीडिया हक्क विकून. मीडिया हक्क म्हणजे खेळाचे थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क. जवळपास 60 ते 70 टक्के कमाई ही या विक्रीतून होते. 2008 ते 2017 या काळात सोनी वहिनीने तब्बल 8200 कोटीं रुपयांना मीडिया हक्क विकत घेतले होते म्हणजे दर वर्षाला 820 कोटी रुपयाचे उत्पन्न BCCI ला मिळत होते. तर 2018 ते 2022 या वर्षातील हक्क स्टार चॅनलने विक्रमी 16347 कोटी म्हणजे दरवर्षी 3269 कोटी रुपये एव्हढ्याला विकत घेतले आहेत. यातून तुमच्या लक्षात आले असेल की मीडिया हक्कांच्या विक्रीमधून मिळणारा पैसा वाढत चालला आहे. आता यातील थोडे पैसे आपल्याला ठेवून BCCI बाकीचे टीम मध्ये वाटते.
यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढी मोठी बोली लावून मग चॅनेल वाले कसे पैसे कमवतात ?? तर हक्क एकाच चॅनेलला मिळत असल्याने त्यांच्या जाहिरातींचा भाव वाढतो आणि जसजसा हा खेळ रंगत जाईल तसेतसे दर वाढत जातात. IPL च्या अनेक फायनल मॅचेसना चॅनेलवाले तुफान पैसे मिळवतात.
ब्रँड स्पॉन्सरशिप
पुढचा नंबर आहे तो ‘ब्रँड स्पॉन्सरशिप’चा. कोणत्याही टीमच्या जर्सी कडे नीट पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की विविध कंपन्यांचे लोगो त्यावर आहेत. त्या जर्सीच्या माध्यमातून कंपन्या आपला ब्रँड कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवतात आणि या बदल्यात ते टीमला अफाट पैसा देतात. या सगळ्याला म्हणतात ब्रँड स्पॉन्सरशिप. मुकेश अंबानी सारखे उद्योगपती आपल्याच विविध कंपन्यांचे जाहिरात करण्यासाठी या टीमचा उपयोग करतात मग तो जर्सी वरील लोगो असो किंवा खेळाडूंना घेऊन केलेली विडिओ, अडिओ जाहिरात असो. त्यामुळे मीडिया हक्क नंतर सगळ्यात जास्त पैसे मिळतात ते ब्रँड स्पॉन्सरशिप या मार्गातून.
टायटल स्पॉन्सर
IPL चालू होण्याआधी त्याचं जोरदार प्रोमोशन चालू होत, त्यावेळी तुम्ही IPL च्या लोगो वर अजून एका कंपनीचा लोगो असल्याचं पाहिलं असेलच. तो असतो अख्या स्पर्धेचा टायटल स्पॉन्सर. म्हणजे जेव्हा IPL चालू झाले तेव्हा याचा टायटल स्पॉन्सर होता DLF आणि आता तब्बल 2199 कोटी रुपये भरून याचा टायटल स्पॉन्सर विवो झाला आहे. तर टायटल स्पॉन्सर मधून मिळणारी कमाई हो तिसरी क्रमांकावर येते.
तिकीट विक्री, उत्पादने
अख्या स्पर्धेत सामने विविध ठिकाणी ठेवले जातात. या सगळ्या सामन्यामधून तुफान तिकीट विक्री होते. या तिकीट विक्री मधून येणारा पैसा हा सुद्धा एक मार्गच आहे. सोबत टीम विविध उत्पादने करणाऱ्या कंपनी सोबत हातमिळवणी करून टीशर्ट, टोपी, बॅट अशी विविध उत्पादने तयार करते आणि याच्या विक्री मधून सुद्धा पैसे मिळवले जातात. काही टीम तर एक वेगळीच ट्रिक वापरात आहेत. एखादा खेळाडू कमी पैशात खरेदी करायचा आणि पुढच्या वर्षाच्या बोलीत त्याला अधिकच्या किंमतीत विकायचा आणि फायदा करायचा. अनेकांनी वाटतं ही टीम अस का करते ? तर यातून होणार तुफान फायदा हे त्याचं उत्तर.
जाहिराती
यानंतर विजेता आणि उपविजेता संघाला सुद्धा पैशाच्या स्वरूपात बक्षीस असते, यातील ठराविक रक्कम ही प्रत्येक खेळाडूला देने संघावर बंधनकारक असते बाकीची रक्कम संघ मालकाला मिळते. पण आपण नीट पाहिल्यास ही बक्षीस म्हणून मिळणारी रक्कम तशी तुटपुंजी आहे पण एखादा संघ सतत चांगले प्रदर्शन करत असेल तर त्याची ब्रँड रक्कम वाढते आणि मग त्या ब्रँड मुळे जाहिरातीचे दार वाढून संघ अधिक पैसा कमवतात. उदाहरण घ्याचं झालं तर चेन्नई आणि मुंबई या दोन संघाचं ब्रँड व्हॅल्यू जबरदस्त आहे त्यामुळे त्यांच्या सोबत जाहिरात करायला अधिक व्यवसायिक इच्छुक असतात.
आता तुम्हाला समजलं असेल की IPL मध्ये संघ, खेळाडू तसेच इतर अनेक लोक पैसे कसे कमवतात. पैसे नेमके कुठून कुठे जातात आणि मग त्याचे भागीदार कोणकोण. पण हा सगळं नफा नाही त्यामुळे या खेळात खर्च सुद्धा तितकाच आहे.
आता आपण पाहू खर्च कुठे कुठे आहे….
सगळ्यात महत्वाचे म्हणजे, कोणत्याही संघांनी सगळ्या मार्गानी मिळून जो काही पैसा मिळवला आहे त्यातील 20% हा BCCI ला द्यावा लागतो. हा नियम बंधनकारक असल्याने प्रत्येकाला देने भाग आहे. यानंतर सगळ्यात मोठा खर्च आहे तो खेळाडू खरेदीचा. संघाना चांगले खेळाडू खरेदी करण्यासाठी अफाट पैसा लावावा लागतो. यासोबत त्या खेळाडूंची राहण्याची सोय, खाणे पिणे तसेच त्यांच्यासाठी सपोर्ट स्टाफ ची सुविधा असा भरगच्च खर्च इथे आहे. खेळाडू सेलिब्रिटी असल्याने त्यांची सुविधा ही चांगल्या हॉटेल मध्येच होते तर त्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा अनेक महागातल्या उपाययोजना कराव्या लागतात.
आपल्या संघाची क्रेझ निर्माण करण्यासाठी त्यांना जाहिरातींचा खर्च सुद्धा करावा लागतो. आणि विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोचून आपला चाहता वर्ग निर्माण करावा लागतो. अनेकांनी आपली गाणी सुद्धा तयार केली आहेत, त्यामध्ये मोठे स्टार घेऊन लोकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला जातो. IPL मध्ये सामने वेगवेगळ्या ठिकाणी असतात त्यामुळे येण्या-जाण्याचा सुद्धा मोठा खर्च संघाला करावा लागतो. सगळ्यात शेवटी हा सगळं मॅनेज करण्यासाठी लागणारा मॅनेजमेंट आणि ऑपरेशन स्टाफ. साधारणपणे 130 ते 160 कोटी असा खर्च प्रति संघाचा होतो आता वाढणाऱ्या सुविधा मुळे यात वाढ होऊ शकते.
आता कमाई आणि खर्च दोन्हीचा ताळमेळ लावला तर IPL मधील संघानं सध्या तरी 20 ते 50 कोटी पर्यंत नफा होत आहे पण ज्या युरोपिअन EFL च्या धर्तीवर हा खेळ चालू झाला त्याच्या तुलनेत हा नफा तुटपुंजा आहे. efl मध्ये संघ सरासरी 500 ते 600 कोटींचा नफा कमवतात त्यामुळे IPL ला अजून बरेच टप्पे गाठायचे आहेत. पण या सगळ्यात मालामाल झालीय आपली BCCI…