इकडे भारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमी काव्याच्या जोरावर अनेक पतपातशाह्या नमवल्या आणि भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर आपल्या दर्या-कपार्यांच्या आणि पहाडांच्या प्रदेशात ही पद्धतच योग्य होती. ह्याच गनिमी काव्याला आजच्या काळात लष्करात “गोरीला-वॉर” असे संबोधतात. या गनिमी काव्याचा सपाट व वाळवंटीप्रदेशात उपयोग होणे तसे दुर्मिळच. पण ही किमया साकारली ती इस्त्राईल सारख्या एका छोट्या आखाती देशाने.
गनिमी कावा म्हणजे तरी काय हो…..? शत्रूला चकवा देऊन आपल्या बुध्दीचातुर्यावर लढलेले युध्द म्हणजेच गनिमी कावा.
तेच तंत्र वापरून इस्त्राईलने आपल्या इतिहासातील सर्वात धाडसी मोहीम फत्ते केली व हे बघून अनेक देशांनी आपली बोटे तोंडात घातली. ती मोहीम म्हणजे एन्तबेची मोहीम (Operation Entebbe).
या मोहिमेला ऑपरेशन थंडरबोल्ट (Operation Thunderbolt) असेही नाव देण्यात आलेलं.
२७ जुन १९७६ ह्या दिवशी एअर फ्रांसच्या एका विमानाने इस्त्राईलची राजधानी तेल-अवीव मधुन पॅरिसच्या दिशेने झेप घेतली. या विमानात 139 प्रवासी प्रवास करत होते. ह्या विमानाने एथेन्स शहरात थोडा विसावा घेतल्यानंतर पुन्हा झेप घेतली.
तेवढ्यातचं विमानातील चार प्रवासी उभे राहीले. त्यांच्या हातात पिस्तुले व हँड ग्रेनेडस् होते. त्यांनी प्रवाशांना धमकवायला सुरूवात केली. त्यांच्यातील एका महिलेने ग्रेनेडची पीन काढून विमान उडवून देण्याची धमकी दिली. आता प्रवाशांच्या जीवाला धोका होता. कुणालाच माहीती नव्हतं की ही माणसे कोण आहेत व ही असे का करत आहेत. पण सगळ्यांना एक मात्र कळून चुकलं की आपले विमान हायजॅक झाले आहे. सर्वांच्या मनात भीतीची वादळे जन्म घेत होती.
अपहरणकर्त्यांनी पायलटला विमान लिबिया मधील बेंगाझी शहराकडे नेण्यास सांगितले. बेंगाझी मध्ये इंधन भरून हे विमान परत झेपावले तेही 139 प्रवाशांचा जीव आपल्या पंखात घेऊन. अपहरणकर्त्यांनी पायलटला विमान युगांडातील एन्तबे विमानतळावर उतरवण्यास सांगितले.
युगांडाचा हूकुमशहा इदी आमिन
त्याकाळी म्हणजे 1976 ला युगांडावर हूकूमशहा इदी आमिनची सत्ता होती. अपहरणकर्त्यांनी त्यांची आधीच सहानुभुती मिळवून ठेवली होती व तो सुध्दा त्यांच्या बाजूने होता. त्यामुळेच युगांडामध्ये त्यांना कोणतीच अडचण येणार नव्हती. याचाच फायदा घेऊन तेथे त्यांना अजून चार जण येऊन मिळाले. त्यांनी तेथे यहूदी लोकांना बाजूला काढण्यास सुरूवात केली.
त्याच बरोबर जगभरातील वेगवेगळ्या तुरुंगात असलेल्या फलिस्तानी कैद्यांना सोडून द्या आणि जर तसे नाही केले तर एक एक करूण प्रवाशांना मारण्याची धमकी त्यांनी दिली व जे लोक यहूदी नाहीत त्यांना दुसऱ्या विशेष विमानाने पॅरिसला रवाना करण्यात आले. इस्त्राईल कडून पण लवकर मदत पोहचणे जवळ जवळ अशक्य होते. कारण एन्तबे इस्त्राईल पासुन सुमारे 4000 किलोमीटर एवढ्या अंतरावर होते.
जेव्हा बातमी इस्त्राईलला कळते
ही बातमी तेल- अविव मध्ये कळली खरी पण यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी प्रशासनावर दबाव येत होता. अपहरणग्रस्त प्रवाशांच्या नातेवाईकांनी इकडे मोर्चे काढायला सुरूवात केली. त्यातच अडकलेले काही प्रवासी इस्त्राईलच्या पंतप्रधानांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी कृती अपेक्षित होती.
पण एन्तबे तेथुन 4000 किमी अंतरावर होते आणि तेथे पोहचणे सुध्दा सोपे नव्हते. तोपर्यंत तेल-अविव येथील मुख्यालयातुन अपहरणकर्त्यांशी बोलणी करण्याचे ठरले, जेणेकरून विशेष लष्करी तुकड्यांना रणनिती आखण्यास वेळ मिळू शकेल.
मोहिमेची रणनिती
सोडून दिलेल्या काही प्रवाशांना मोसादच्या एका एजंटने संपर्क साधला व त्यांच्याकडून विमानातील प्रत्येक घटनेबद्दल खडान खडा माहीती काढली व ती माहीती इस्त्राईलला पोहोचवली.
त्यातील एक गंमतीशीर गोष्ट ही की, एन्तबेचे विमानतळा ज्यावर अपहरण केलेले विमान होते, ते विमानतळ सुध्दा एका इस्त्राईलच्या कंपनीनेच बनवले होते.
त्या कंपनीने सरकारला नकाशा पुरवला व रातोरात हूबेहूब एन्तबे सारखे डमी विमानतळ तयार करण्यात आले. त्या डमी विमानतळामुळे सैनिकांना तयारी करण्यास सोपे गेले.
या मोहिमेसाठी सर्वश्रेष्ठ असे 200 कमांडो निवडण्यात आले. त्यांना या मोहिमेसाठी पुरेपुर प्रशिक्षण दिले होते. या मोहीमेत या कंमांडोंच्या तुकडी पुढे अडचण ही होती की जर रात्रीच्या वेळेस कुणाला कळू नये म्हणुन विमानतळावरच्या सर्व लाईट घालवल्या तर ते विमानतळ ओळखण्यास या टीमला अडचणीचे जाणार होते.
त्यातच इकडे इस्त्राईल सरकारने अपहरणकर्त्यांसोबत बोलणी सुरू केली जेणे करून कंमांडोना तयारीसाठी वेळ मिळेल. इस्त्राईल सरकारने हूकूमशहा इदी आमिनशी बोलण्यासाठी माजी सैन्य आधिकारी व आमिनचे मित्र समजले जाणारे बार लेव यांची निवड केली. त्यांनी आमिनशी फोनवरून संपर्क साधन्याचा प्रयत्न केला. पण आमिनने त्यास उत्तर दिले नाही. आता बोलणी व शांततेचे सर्व प्रयत्न फसले होते. आता गरज होती कृतीची. त्यातच इदी आमिन आफ्रीकन देशांच्या एका संघटनेच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी मॉरिशसची राजधानी पोर्ट लुई येथे गेला होता. त्यामुळे इस्त्राईली सैनिकांना अजुन वेळ मिळाला.
पहिला मुद्दा होता की एन्तबेला कशा प्रकारे सैन्य पाठवावं ? एन्तबेला जाण्यासाठी तीन मार्ग होते. पहिला समुद्राच्यावाटे नावेने, दुसरा रस्त्याने युगांडात घुसाने किंवा मग विमानांची मदत घेऊन थेट तेथे जाणे. कमांडोज् कडे खुप वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी विमानाचा वापर करण्याचे ठरवले.
काय होती रणनिती..?
सैन्याने अशी रणनिती तयार केली की आमिन मॉरिशसला गेला होता. त्यामुळे आपली विमाने थेट युगांडात झेपावत युगांडाच्या सैनिकांना आमिन आल्याचा भास घडवून देणे म्हणजे ते प्रतिकार करणार नाहीत. यासाठी चार हर्क्युलस विमाने तयार करण्यात आली.
पहिली तीन विमाने एन्तबेच्या दिशेने पंखात बळभरून निघाली. त्यांच्यामध्ये निवडक 200 सैनिक होते. त्यांनी आमेनच्या सैनिंकांसारखी वर्दी घातली होती.
या विमानांनी फक्त 300 मी. च्या अंतरावरून प्रवास करून लाल समुद्र पार केला, जेणेकरून सौदी आरेबिया, मिस्र, सुडानचे रडार त्यांना पकडू नयेत.
फक्त 6 मिनिटांचा कालावधी
हि मोहीम पार पाडण्यासाठी इस्त्राईलच्या सैनिकांकडे फक्त 6 मिनिटांचा अवधी होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी विमान उतरवून आमिन ज्या काळ्या मर्सिडीज मधून फिरत होता त्याच सारखी हुबेहूब गाडी तयार करून त्यातुन सैनिकांचा ताफा एन्तबे विमानतळाकडे निघाला. त्यांना असे दाखवायचे होते की आमिन परदेशातुन परत येऊन एन्तबे वरील प्रवाशांची भेट घ्यायला विमानतळावर आलाय. पण एन वेळेस हा बेत फसला, आमिनने काही दिवसांपूर्वीच आपली काळी गाडी विकून आता पांढरी मर्सिडीज वापरायला सुरवात केली होती.
बिकट परिस्थिती
या गाड्यांचा ताफा पाहून सुरूवातीला आमिनच्या सैनिकांनी बंदूखा गाड्यांवर रोखल्या पण इस्त्राईली सैनिकांनी क्षणार्धात त्यांना ठार केले. बंदूकांवर लावलेल्या सायलेन्सरमुळे कुणाला त्याची भनक देखील लागली नाही. आमिनच्या सैनिकांना ठार करून इस्रायली सैन्य अतिशय वेगाने विमानतळाकडे झेपावले. विमानतळावर पोहचल्यावर इस्त्राईली सैनिकांनी आमिनच्या सर्व सैनिकांचा अक्षरश: सुपडासाफ केला.
विमानात पोहचल्यानंतर सैनिकांनी बुलहॉर्न वाजवत व हिब्रूतुन प्रवाशांना आपण आल्याची शास्वती दिली. त्यांनी प्रवाशांना हिब्रू मधून दहशतवादी कुठे आहेत, असे विचारले असता. त्यांनी मधल्या हॉल कडे बोट दाखवले. सैनिकांनी सावधपणे मधल्या पोर्शन मध्ये जाऊन अतिरेक्यांना लक्ष केले. त्यांच्या व अपहरणकर्त्यांमध्ये बेछूट गोळीबार झाला.
शेवटी सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात कमांडो यशस्वी झाले. त्यांनी विमानतळावरील सर्व बोईंग विमाने नष्ट केली जेणे करून आमिनचे सैनिक त्यांचा पाठलाग करू शकणार नाहीत. नंतर प्रवाशांना नेण्यासाठी आणलेले विमान देखील दाखल झाले. सर्व प्रवाशांना विमानात भरून तात्काळ तेथुन प्रयाण करण्यात आले. शेवटी जाताना सर्व सैनिकांची गिनती करण्यात आली. या मोहीमेत फक्त एक सैनिक शहीद झाला होता. त्याला विमानात घेऊन सर्व विमाने रात्रीचा प्रवास करून तेल- अविव विमानतळावर उतरले. प्रवासी व सैनिकांसाठी खरचं ती रात्र वैर्याची होती.
ही बातमी कळताच तीकडे इस्त्राईल मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू ओघळत होते आणि सर्वजण त्या 200 बहाद्दर सैनिकांना धन्यवाद देत होते. इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी या निमित्ताने एका उत्सवाचे आयोजन केले होते.
दुर्दैवी प्रवाशांचा आमिनच्या सैनिकांकडून खुन
हे सगळे घडत असताना एक यहूदी महिला प्रवासी डोरा ब्लाॅक ह्या युगांडातील एका इस्पितळात उपचार घेत होत्या. त्यामुळे त्या तिथून सुटू शकल्या नाहीत. युगांडाच्या ऍटर्नी जनरलनी तिथल्या मानवाधिकार मंडळाला दिलेल्या माहितीनुसार डोरा ब्लाॅक यांना त्या मोहीमेनंतर आमिनच्या सैनिकांनी इस्पितळात जाऊन ठार केले .
गनिमी काव्याचे दर्शन
एकुणच या मोहीमेत इस्त्राईलने जणू आधुनिक काळात गनिमी कावा खेळला. एकंदरीत या मोहीमेचे नियोजन खुप पध्दतशीरपणे करण्यात आले होते आणि या मोहीमेत युगांडाचे एकूण 20 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. एकंदरीत ही मोहीम इस्त्राईलच्या इतिहासातील सर्वात धाडसी आणि साहसी मोहीम होती.