सर्वांना नाकारत ‘JLR’च्या कामगारांनी ‘आम्हाला टाटाच हवेत’ असं ठामपणे सांगितलं !
कंपनी विकताना ती कोणाला विकावी हे ठरवताना कामगारांचे मत घेतलेली ही इतिहासातील पहिलीच घटना असावी
कितीही गोडधोड शब्दांची माळ गुंफली तरी ती अपुरीच पडते कारण टाटांचं कर्तृत्वच एवढं अफाट आहे. प्रचंड ध्येयवादी, तत्वनिष्ठ आणि उद्योगाबरोबरच देशाची भरभराट करण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या टाटा समूहाची पायाभरणी जमशेदजी टाटा या अवलीयाने केली. आज मिठापासून पिठापर्यंत, व्हीलपासून स्टीलपर्यंत, हार्डवेयरपासून सॉफ्टवेयरपर्यंत जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये टाटा समूहाचं अढळ स्थान आहे आणि याचं एकमेव कारण जमशेदजी यांची कार्यपद्धती आणि मूल्यनिष्ठ कारभार.
ज्यावेळी एखादा कर्मचारी टाटा समूहात काम करण्यास सुरवात करतो. त्यावेळी त्याला एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे ‘आपण कुठल्या ना कुठल्या रुपाने प्रत्येक भारतीयाशी जोडले गेलेले आहोत, व्यवसायाबरोबरच देशहीत आणि नफ्यातून समाजसेवा’ हे टाटा समूहाचे केंद्रीय मूल्य आहे. Jamsetji Tata जेवढे शिक्षणाप्रती, समाजाप्रती आणि देशाप्रती सजग होते तेवढेच ते आपल्या कामगारांप्रती सजग होते. कामगारांना ते आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणूक देत.
कामकाजाच्या ज्या पद्धतीला ‘प्रोफेशन कल्चर’ म्हटले जाते, ते त्याकाळी बिलकुल नव्हते. कारखान्यांमध्ये कामगारांच्या गैरहजेरीचे प्रमाण १० ते २० टक्के होते. जमशेदजींनी ही समस्या सोडवण्यासाठी प्रोव्हिडंट फंड, दुर्घटना विमा, पेंशन फंड यागोष्टी सुरु केल्या. कामगारांना काम करताना उष्णतेचा सामना करावा लागू नये यासाठी पहिल्यांदा मिलमध्ये व्हेंटीलेशनची व्यवस्था करण्यात आली. यांपैकी काही सुधारणा तर इंग्लंडमध्ये ‘Factory Act’ लागू होण्याआधीच जमशेदजींनी हिंदुस्तानात अंमलात आणल्या.
पहिल्यांदा कामगारांचा चांगल्या कामासाठी सन्मान केला जाऊ लागला. त्यांना बक्षीस म्हणून सोन्याचांदीची घड्याळं, मेडल्स दिले जाऊ लागले, कपड्यांचेही वाटप सुरु झाले, मजुरांसाठी दवाखाना आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली. प्रबंधकांना ट्रेनिंगसाठी फंड दिला जाऊ लागला. Jamsetji Tata असे पहिले उद्योगपती होते ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या राहण्याची देखील सोय केली. त्यांच्या या आदर्श अशा कारभारामुळे टाटा हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले.
जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे, जिथे प्रयत्न आहे तिथे यश आहे आणि जिथे देशाचा नावलौकिक वाढवण्याचा ध्येयवाद आहे तिथे टाटा आहेत.
जमशेदजी टाटांनी जी मूल्य आणि सामाजिक बांधिलकी जपली, जो ध्येयवाद बाळगला, ती मूल्य, बांधिलकी आणि ध्येयवाद जोपासण्याचे काम जमशेदजींच्या उत्तराधिकाऱ्यांनीही चोखपणे बजावले. एक देशभक्त, जाणता आणि लोकप्रिय उद्योगसमूह म्हणून टाटा समूह संपूर्ण जगामध्ये नावारुपास आला.
‘जॅग्वार आणि लँडरोव्हर’चे अधिग्रहण
मुंबईत एका कॉटन मिलपासून सुरु झालेला टाटा समूहाचा व्यवसाय पुढे बराच वाढला. हळूहळू सर्वच क्षेत्रात टाटा समूहाने प्रवेश केला आणि आपले अढळ स्थान निर्माण केले. मग यातून वाहन निर्मिती क्षेत्र सुटले असते तर नवलच. Tata Group सुरवातीला मालवाहू गाड्यांची निर्मिती करायचा. नंतर त्यांनी प्रवासी वाहनांच्याही निर्मितीला सुरवात केली.
जॅग्वार आणि लँडरोव्हर हे आलिशान लक्झरी गाड्यांचे अत्यंत प्रतिष्ठित, मोठे आणि गाजलेले ब्रँड्स. या गाड्या बाळगणे आजही श्रीमंतीचं लक्षणं मानलं जाते. हे दोन्ही मूळचे तसे ब्रिटिश ब्रँड्स. इंग्लंड आणि युरोपात या ब्रँड्सचा गाड्या चांगल्याच लोकप्रिय होत्या. त्यांचा वेगळाच असा दबदबा होता. कालांतराने या कंपन्यांची मालकी फोर्ड मोटार्स या अमेरिकन कंपनीकडे आली.
वाहनांच्या उद्योगधंद्यात फोर्ड मोटार्स हे एक प्रतिष्ठित नाव. फोर्डच्या स्वतःच्या गाड्या आणि ब्रँड्स असल्याने त्यांनी Jaguar Land Rover या ब्रँड्सना फारसे उत्तेजन दिले नाही किंवा त्यांच्या गाड्या आक्रमकपणे विकल्या नाही. कालांतराने त्यांनीही हे ब्रँड्स विकायला काढले.
तिरंगी सामना
टाटा समूहाचे त्यावेळीचे अध्यक्ष RatanTata यांनी हे दोन ब्रँड्स खरेदी करण्यात रस दाखवला. मात्र त्यांची स्पर्धा होती ती महिंद्रा अँड महिंद्रा या भारतीय कंपनीसोबतच. या शर्यतीत अजून एक स्पर्धक होते, ते म्हणजे फोर्ड कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅकीस नासीर. नासीर बराच काळ उच्च पदावर राहिल्यामुळे जागतिक पातळीवर कोणत्या गाड्या पसंद केल्या जातात, का पसंद केल्या जातात, बाजपेठेची स्थिती याची त्यांना खडानखडा माहिती होती.
कामगारांची Tata ना पसंती
जॅग्वार आणि लँडरोव्हर हे प्रतिष्ठित ब्रँड्स कोणाला विकले जाणार याकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. कारण तिघेही हे दोन्ही ब्रँड्स खरेदी करण्यास उत्सुक होते. मात्र इथे अजून एक मेख होती, ती म्हणजे या दोन कंपन्यांतील कामगार संघटना. ही संघटना एवढी मजबूत होती की कंपनी विकताना, ती कोणाला विकावी हे ठरवताना कामगारांचे मत घेणे अपरिहार्य होते आणि सगळा डाव नेमका इथेच फिरला.
टाटांची प्रतिष्ठा, उच्च व्यावसायिक मूल्ये, कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक या गोष्टींचा लौकिक एवढा होता की ‘आम्ही टाटांसोबतच कंफर्टेबल राहू’ असे कामगार संघटनेकडून सांगण्यात आले.
याचा अर्थ स्पष्ट होता की मालक म्हणून आम्हाला Tata च हवे आहेत असे कामगारांनी सरळसरळ सांगून टाकले. कामगारांच्या या निर्णयामुळे महिंद्रा व नासीर आपोआपच स्पर्धेतून बाहेर झाले आणि जॅग्वार व लँडरोव्हर हे दोन्ही ब्रँड्स टाटा समूहाच्या छत्रछायेखाली आले.
जमशेदजींपासून ते रतन टाटांपर्यंत प्रत्येकाने जोपासलेली उच्च व्यवसायिक मूल्य, तत्वनिष्ठता, सामाजिक भान या गोष्टींचेच हे फळ होते असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही!