मृत्यू पश्चात परिवारासाठी केवळ कर्ज सोडून गेलेले भारताचे एकमेव पंतप्रधान
पंतप्रधानपदी काम करणाऱ्या या व्यक्तीच्या बँक खात्यात आयुष्याच्या अखेरीस एक पैसाही शिल्लक नव्हता. त्यांच्या नावाने ना शेत होतं, ना गावात घर
२७ मे १९६७ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूने देशात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या नेहरू युगाचा अंत झाला. नेहरूंच्या मृत्यूनंतर या देशाची धुरा कोणाच्या हाती जाणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला. नवीन पंतप्रधानाची निवड होईपर्यंत कार्यवाहक पंतप्रधान म्हणून गुलझारीलाल नंदा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी के. कामराज हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व सिंडिकेटचे नेतेही होते. सिंडिकेट हा काँग्रेसमधील बिगर हिंदीभाषी नेत्यांचा एक असा गट होता ज्याची मजबूत पकड काँग्रेस पक्षात होती. कामराजांसमोर पक्षातून अशा नेत्याची निवड करण्याचे आव्हान होते ज्याचे नेतृत्व सगळ्यांना मान्य असेल.
नेहरूंच्या निधनानंतर पंतप्रधान पदासाठी दोन नावं प्रकर्षाने समोर आली. एक म्हणजे मोरारजी देसाई आणि दुसरे म्हणजे लाल बहादूर शास्त्री. काँग्रेस अध्यक्ष के. कामराज आणि त्यांचे सिंडिकेट मोरारजींना पंतप्रधान करण्यास अनुकूल नव्हते, त्यांचे समर्थन शास्त्रींना होते. मात्र निवडणूक न होता सर्वसंमतीने पंतप्रधान निवडला जावा अशीदेखील भूमिका कामराज यांनी घेतली होती.
१ जून १९६४ रोजी के.कामराज यांनी मोरारजींची त्यांच्या घरी भेट घेत, त्यांना या गोष्टीची कल्पना दिली की पंतप्रधान पदासाठी अधिकतर काँग्रेस नेत्यांचे समर्थन शास्त्रींच्या नावाला आहे. त्यामुळे आपण सुद्धा आपले समर्थन शास्त्रींच्या नावाला द्यावे. कारण पंतप्रधान पदासाठी पक्षांतर्गत निवडणूक झाल्यास त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होईल. मोरारजींनी ही गोष्ट मान्य केली आणि नेहरूंच्या नंतर लाल बहादूर शास्त्रींच्या रूपाने दुसरा पंतप्रधान या देशाला मिळाला.
अनवाणी पायांनी पायपीट करत घेतले शालेय शिक्षण
लाल बहादूर शास्त्रींचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून ७ मैलावर असणाऱ्या मुघलसराई ह्या गावात झाला. अवघ्या दीड वर्षांचे असताना शास्त्रींजींनी पितृछत्र गमावले. यानंतर आपल्या तीन मुलांसह त्यांची आई वडिलांच्या घरी स्थायिक झाली.
शास्त्रीचें शालेय शिक्षण त्यांच्या गावात यथातथाच झाले. पण उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ते वाराणसीत काकांच्या घरी राहायला आले. घरील सर्व मंडळी शास्त्रींना ‘नन्हे’ म्हणून हाक मारायची. शाळेत जाण्याकरिता कित्येक मैल ते अनवाणी चालत जायचे. उन्हाळ्याच्या दिवसांत तापलेल्या रस्त्याची देखील त्यांनी कधी पर्वा केली नाही. जणूकाही संघर्ष शास्त्रींच्या पाचवीलाच पुजला होता.
विद्यापीठाने दिलेली ‘शास्त्री’ ही पदवीच बनली नावाचा अविभाज्य भाग
महात्मा गांधींचे ब्रिटिश विरोधी आंदोलन बघून ते अत्यंत प्रभावित झाले आणि म्हणूनच ते वाराणसी येथील काशी विद्यापीठात ते सामील झाले. हे विद्यापीठ ब्रिटिश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आले होते. इथे अनेक विद्वान आणि देशभक्त लोकांच्या सहवासात शास्त्रींनी घालवला. ह्याच विद्यापीठाने त्यांना शास्त्री हि पदवी दिली आणि पुढे जाऊन ‘शास्त्री’ हा त्यांच्या नावाचा भाग झाला.
लहापनापासूनच मनात राष्ट्रसेवेची उर्मी
लहानपणापासूनच शास्त्रीजींना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात रुची निर्माण झाली होती. ब्रिटिशांना पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधींनी कडाडून निंदा केली आणि हे बघून केवळ ११ वर्षांचे शास्त्री अत्यंत प्रभावित झाले. देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी आणि जिद्द तेव्हापासूनच त्यांच्या मनात निर्माण झाली.
लग्नाच्या हुंड्यात एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड
गांधीजींनी जेव्हा देशवासीयांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता शास्त्रीजी या लढ्यात उतरले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही हे एकच एक ध्येय त्यांनी मनी बाळगले होते. गांधीजी आणि त्यांच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्रीजींवर होता. १९२७ मध्ये जेव्हा त्यांचा विवाह ललिता देवी यांच्यासोबत झाला. लग्नाच्या हुंड्यात केवळ एक चरखा व हाताने विणलेले मीटर कापड यापेक्षा अजून काहीच नको होते.
अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व करीत भोगला ७ वर्षांचा तुरुंगवास
१९३० साली महात्मा गांधीनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांतीचे वारे वाहू लागले. लाल बहादूर शास्त्री तर पेटून उठले होते. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले. परिणामी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. एकूण ७ वर्षे त्यांनी ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या ह्या लढ्यात ते अधिकच परिपक्व झाले.
स्वातंत्र्यानंतर देशासाठी आणि पक्षासाठी दिले भरीव योगदान
स्वातंत्र्य संग्रामातील नेत्यांना नम्र आणि तत्वनिष्ठ शास्त्रीजींचे महत्व लक्षात आले होते. म्हणूनच १९४६ साली काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर त्यांना उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर देखील आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत, कार्यक्षमता आणि प्रामाणिकता उत्तर प्रदेशात आदर्शच बनून गेली. १९५१ मध्ये शास्त्रीजी दिल्लीत आले. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे, वाहतूक आणि दळणवळण, वाणिज्य, उद्योग, गृह अशी वेगवेगळी खाती अतिशय चोखपणे सांभाळली. एवढंच नाही तर नेहरूंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून देखील त्यांनी उत्तमपणे काम पाहिले.
आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान काँग्रेस पक्षाशी संबंधित कार्याकडेही त्यांनी अगदी बारकाईने लक्ष दिले. शास्त्रीजींचे पक्षासाठीचे योगदान अतिशय भरीव होते. १९५२, १९५७ आणि १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये शास्त्रीजींनी आपल्या संघटनात्मक कौशल्याची आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारख करत निर्णय घेण्याच्या क्षमतेची चुणूक सर्वांनाच दाखवून दिली.
मृत्यूसमयी शास्त्रीजींच्या नावे ना घर होतं, ना जमीन होती, ना बँकेत एक रुपया
शास्त्रीजींचे चरित्रकार सांगतात, पंतप्रधानपदी काम करणाऱ्या या व्यक्तीच्या बँक खात्यात आयुष्याच्या अखेरीस एक पैसाही शिल्लक नव्हता. त्यांच्या नावाने ना शेत होतं, ना गावात घर. शेवटच्या श्वासापर्यंत ते ‘सर्व्हंट्स ऑफ द पिपल्स सोसायटी’ या संस्थेला आपल्या वेतनाचा काही भाग देत राहिले. शास्त्रीजींनी आपल्या आयुष्यात एक छोटेखानी मोटार खरेदी केली होती, तिही हप्त्यावर. त्या मोटारीचे हप्ते शात्रीजींच्या मृत्यूनंतर त्यांची मुलं ३ वर्षांपर्यंत फेडत होती.
अवघ्या १ हजार रुपये पेंशनवर शास्त्रींच्या पत्नीने सांभाळले कुटुंब
शास्त्रीजींच्या मृत्यूवेळी मुलं शाळेत जाण्याच्या वयाचीच होती. त्यांच्या मुलांना नोकरी करत करतच शिक्षण घ्यावे लागले. त्यांच्या पत्नी ललितादेवींना १ हजार रुपये पेंशन मंजूर करण्यात आली होती. त्यातूनही २१० रुपये घरभाड्यापोटी कापले जायचे आणि उर्वरित पैशातून मोटारीचा हप्ता. तरी ललिता देवी म्हणत की, मला हे पैसे पुरेसे आहेत. आणखी पैशांची मला स्वतःलाच इच्छा नाही. ललितादेवींच्या या वाक्यांवरून शास्त्रीजींनी आपल्या कुटुंबावर कसे संस्कार केले होते याची चांगलीच प्रचिती येते.
आपल्या ३० वर्षांहून अधिकच्या देश सेवेदरम्यान शास्त्रीजी त्यांच्या तत्वनिष्ठेमुळे आणि साफ चारित्र्यामुळे जनमानसांत कमालीचे लोकप्रिय झाले. स्वातंत्र्यसंग्रामात गांधीजींच्या विचारांनी प्रेरीत होऊन उतरलेला एक अतिशय गरीब घरातील मुलगा पुढे जाऊन या देशाचा पंतप्रधान बनला. मात्र सत्तापद मिळाल्यावर आताच्या राजकारण्यांप्रमाणे स्वतःचे खिसे न भरता शास्त्रीजींनी केवळ आणि केवळ देशहितच पाहिले.