‘निशाण-ऐ-पाकिस्तान’ ने सन्मानित केल्या जाणारा पहिला भारतीय पंतप्रधान
असे फारच कमी लोक असतील ज्यांना मोरारजी देसाई हे नाव माहित नसेल. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी उठल्यावर ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीतून पहिल्यांदा जे बिगर काँग्रेसी सरकार या देशात स्थापन झालं, त्या सरकारचं नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणजे मोरारजी देसाई. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसंग्राम सुरु असताना ब्रिटिशांची नोकरी सोडून मोरारजींनी १९३० साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली आणि इथूनच त्यांचा काँग्रेसमधील आणि स्वातंत्रलढ्यातील प्रवास सुरु झाला.
मोरारजी देसाईंनी भूषवलेली महत्वाची पदे
१९३१ – अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य बनले.
१९३७ – पर्यंत गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव राहिले.
१९३७ – तत्कालीन मुंबई प्रांतात बी.जी.खेर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयात महसूल, कृषी, वन आणि सहकार मंत्री या पदांचा कार्यभार स्वीकारला.
१९४६ – राज्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुंबईचे गृह आणि महसूल मंत्री झाले.
१९५२ – मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
१४ नोव्हेंबर १९५६ – केंद्रीय मंत्रीमंडळात वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून सामील.
२२ मार्च १९५८ – केंद्रीय मंत्रीमंडळात अर्थ खात्याचा पदभार स्वीकारला.
१९६७ – इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
मोरारजी देसाईंचा राजकीय प्रवास
काँग्रेसमध्ये असताना एवढी महत्वाची पदं भुषवूणसुद्धा त्यांना पंतप्रधान होता आले नाही किंबहुना होऊ दिले नाही. १९६९ साली काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर २ गट अस्तित्वात आले. एक म्हणजे काँग्रेस-आर (इंदिरा गांधी समर्थकांचा गट) आणि दुसरा म्हणजे काँग्रेस-ओ (सिंडीकेट समर्थकांचा गट). मोरारजींनी सिंडीकेट सोबत जाणे पसंद केले.
१९७५ साली आणीबाणी लादल्यावर जवळपास सर्वच विरोधकांना जेलमध्ये टाकण्यात आले. आणीबाणी उठल्यावर इंदिरा काँग्रेसचा पाडाव करण्यासाठी अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येत जनता पक्षाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष मोरारजींना करण्यात आले. १९७७ च्या लोकसभा निवणुकीत जनता पक्षाचा विजय झाला आणि काँग्रेसमध्ये असल्यापासून पंतप्रधान होण्यासाठी सतत प्रयत्न करणारे मोरारजी देसाई अखेर पंतप्रधान झाले.
पाकिस्तानने मोरारजी देसाईंना ‘निशाण-ऐ-पाकिस्तान’ देण्यामागचे कारण
आणीबाणी नंतर जनता पक्षाच्या रूपाने पहिल्यांदा बिगर काँग्रेसी सरकार या देशात स्थापन झाले ज्याचे नेतृत्व मोरारजी करत होते. मात्र हे सरकार आपला कार्यकाळ काही पूर्ण करू शकले नाही, स्थापन होऊन २ वर्ष होत नाहीत तोच हे सरकार कोसळले आणि मोरारजींना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र या २ वर्षांच्या काळात मोरारजींनी पाकिस्तानसोबत संबंध सुधरवण्यासाठी बरेच प्रयत्न केले.
रेडीफवरील बातमी हा दावा करते की त्यांनी काश्मीरसाठी योजनासुद्धा तयार केली होती. या बातमीनुसार मोरारजींचे मित्र सांगतात की, “मोरारजी झियांसोबत काश्मीरवर करार करण्यापर्यंत पोहचले होते”. झिया त्यांच्या भारत दौऱ्यावर या कराराची घोषणादेखील करणार होते. मात्र त्याआधीच जनता सरकार कोसळले आणि इस्लामाबाद सोबत एक टिकाऊ करार होण्याची महत्वाची संधी सुद्धा गमावली”.
‘निशाण-ऐ-पाकिस्तान’ दिला गेलेली पहिली भारतीय व्यक्ती मोरारजी देसाई
पाकिस्तानसोबत संबंध सुधरवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे १९८६ साली पाकिस्तनाने मोरारजी देसाईंना निशाण-ऐ-पाकिस्तान हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झिया उल हक यांनी मोरारजींना लिहिलेल्या पत्रात असे म्हंटले की, “मी तुम्हाला हा पुरस्कार स्वीकारण्याची विनंती करतो. आपण हा पुरस्कार स्वीकारावा ही पाकिस्तानातील जनतेची इच्छा आहे”.
मोरारजींनी हा पुरस्कार १९९० च्या मे महिन्यात त्यांच्या मुंबई येथील घरी एका खाजगी कार्यक्रमात स्वीकारला. यानंतर जवळपास एक वर्षाने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले. भारतरत्न आणि निशाण-ऐ-पाकिस्तान या दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेली एकमेव व्यक्ती म्हणजे मोरारजी देसाई.
पाकिस्तान कोणाला आणि कशासाठी देतो निशाण-ऐ-पाकिस्तान पुरस्कार
निशाण-ऐ-पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान असून उच्चतम दर्जाच्या देशसेवेसाठी आणि पाकिस्तान राष्ट्राप्रति केलेल्या सेवेसाठी दिला जातो. या पुरस्काराची स्थापना १९ मार्च १९५७ साली करण्यात आली. पाकिस्तानद्वारे दिल्या जाणाऱ्या अन्य पुरस्कारांच्या तुलनेत हा पुरस्कार फार कमी लोकांना दिला जातो. पुरस्कार देण्यासाठी व्यक्तीची निवड योग्यतेचे मूल्यांकन आणि त्या व्यक्तीने राष्ट्र, आंतरराष्ट्रीय समुदाय आणि परराष्ट्र संबंध यासाठी दिलेल्या योगदानाच्या आधारावर केली जाते.
अन्य नागरी पुरस्कारांप्रमाणेच या पुरस्काराची घोषणासुद्धा १४ ऑगस्ट या पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी केली जाते आणि पुरस्कार प्रदान समारोह २३ मार्चला होतो. त्याचप्रमाणे हा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला त्याच्या नावासोबत पुरस्काराचे नाव जोडण्याचा अधिकार असतो.
आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.