६० वर्षं होऊन गेली तरीही ‘मुघल ए आझम सारखा सिनेमा पुन्हा होणे नाही’ असं लोक का म्हणतात ?
सिनेमा तयार व्हायच्या या १४ वर्षांच्या काळात कलाकारांचे लग्न होऊन घटस्फोट सुद्धा झाले. एवढेच नव्हे तर दिग्दर्शक के असिफ आणि दिलीपकुमार या जवळच्या मित्रांमध्ये एवढा दुरावा आला कि त्यांनी एकमेकांसोबत बोलणं सुद्धा बंद केलं होतं.
चित्रपट ही भारतीयांना भुरळ घालणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट आहे. कित्येक कलाकृती या मराठी, इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू, बंगाली, कन्नड, मल्याळम आदी प्रादेशिक भाषा तसेच मूकपटांत अजरामर ठरलेल्या आहेत. आधुनिक काळात सिनेमा कळून घेण्यास सबटायटल्सने सुलभता आणली असली तरीही सबटायटल्स नव्हते त्या काळातही भारतीय लोकांनी चित्रपट समजून घेत त्यांना डोक्यावर उचलून घेतले, त्यांना प्रेम दिले. सिनेमांना तसेच त्या सिनेमाच्या दिग्दर्शकांनासुध्दा तेवढेच प्रेम लोकांनी दिले. आज आपण अशाच एका सिनेमाबद्दल इथे बोलणार आहोत.
मुघल-ए-आझम. हा चित्रपट म्हणजे “या सम हाच” या उक्तीचा तंतोतंत प्रत्यय आणून देणारी कलाकृती. भारतीय सिनेमाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला हा चित्रपट असंही याचं वर्णन केल्यास अतिशयोक्ती ठरू नये. हा सिनेमा बनायला तब्बल १४ वर्षांचा कालावधी दिग्दर्शक के.असीफ यांना लागला. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी मुघल-ए-आझम (१९६०), फूल (१९४५) अशा दोनच कलाकृती दिग्दर्शीत केल्या.
के. असीफ हे अत्यंत स्पष्ट व दूरदर्शी दृष्टीकोन असलेले दिग्दर्शक होते. त्यांच्या कामासाठी ते जीवापाड मेहनत करत असत. एके काळी लोकांनी त्यांना वेडा म्हणूनही हिणवण्यास सुरूवात केली होती. पण, याचा परिणाम के.असीफ यांनी आपल्या कार्यावर कधीही होऊ दिला नाही. त्यांच्यातील अढळ आत्मविश्वास अन ध्येय्यवादी वृत्तीचे कौतुक करणे हे खरोखर शब्दांच्या पलिकडले म्हणावे लागेल. आजच्या काळात असा दिग्दर्शक मिळणे दुर्मीळच ठरेल.
के.असीफ मुघल-ए-आझम हा चित्रपट त्यांचे मित्र सिराज अली हकीम यांना घेऊन करत होते. आपल्याला कदाचित कल्पना नसेल पण या सिनेमासाठी आधी वेगळ्या कलाकारांची निवड केली गेली होती. त्यांच्यासोबत चित्रीकरणही सुरू झाले होते. पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला ही के.असीफ यांची प्रथमतः निवड नव्हती. चंद्राबाबू, संप्रू आणि नर्गिस यांना सगळ्यात आधी या सिनेमात घेण्याचे निश्चित केले होते. १९४४ सालीच या सिनेमावर काम सुरू झाले होते. १९४६ साली या चित्रपटाचे चित्रीकरण बॉम्बे टॉकीज येथे सुरू झाले. परंतु, १९४७ साली भारताची फाळणी झाली तेव्हा के.असीफ यांचे मित्र सिराज अली हे पाकिस्तानात निघून गेले. अन, हा सिनेमा थांबवण्यात आला.
के. असीफ यांनी १९५२ साली मुघल-ए-आझमची नव्या निर्मात्यासह निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यांच्या सिनेमासाठी त्यांना कोणत्याच प्रकारची कमतरता ठेवायची नव्हती. देश परदेशांतील विविध भागांतून त्यांनी तंत्रज्ञांना पाचारण केले होते. कपड्यांवरील एम्ब्रॉयडरी वर्कसाठी त्यांनी सुरत येथून माणसांना पाचारण केले होते. कलाकारांच्या आभूषणांच्या निर्मितीकरीता हैद्राबाद येथून सोनारांना ते घेऊन आले होते. अन, कलावंताची बुटे, चपला आग्र्याहून आणल्या होत्या.
सिनेमात वापरण्यात आलेल्या हत्यांरांसाठी त्यांनी राजस्थान येथून लोहारांची आयातच केली होती. यावरूनच त्यांच्यातील परखड, जिद्दी, मुत्सद्दी दिग्दर्शकाचा अंदाज आपल्या सगळ्यांनाच येईल. सिनेमातील छोट्यांतील छोट्या गोष्टींवरही ते कठोर मेहनत घेत असल्याचे सिनेमा पाहताना प्रत्येकालाच जाणवते. हेच कारण आहे की के.आसीफ अन मुघल-ए-आझम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला आहे.
मुघल-ए-आझम हा सिनेमा भव्यदिव्य सेट्स, झगमगती वेशभूषा अन मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतासाठीही लोकांच्या स्मरणात आहे. या सिनेमाचे संगीत नौशाद यांनीच द्यावे यासाठी के.असीफ यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. जब प्यार किया तो डरना क्या हे गाणे शकील यांनी लिहीले होते. नौशाद यांनी अनेकदा ते रद्द केले. तेव्हा शकील यांनी तब्बल १०५ वेळा पुन्हा पुन्हा ते लिहून काढले होते. नौशाद यांनी तेव्हा कुठे या गीताच्या शब्दांना पसंती दिली होती. त्याकाळातील संगीत तांत्रिकदृष्ट्या प्रगत नसल्याने रिव्हर ब्रेटींग साऊंड देण्याची सोय नव्हती. यामुळे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी हे गाणे स्टुडिओत न गाता स्टुडिओच्या बाथरूममध्ये गायले होते.
मुघल-ए-आझम सिनेमा बद्दल प्रत्येक गोष्ट औत्सुक्याची ठरली होती. ह्या सिनेमाला आपल्या आवाजाने गुलाम अली साहेबांनी मोठा स्वरसाज चढवला होता. त्याकाळात गाणे गाण्यासाठी गुलाम अली साहेबांनी तब्बल पंचवीस हजार इतके मानधन घेतले होते. जे की त्याकाळात सगळ्यात जास्त मानले गेले. याचे कारण त्याकाळात सुरावटींचे बादशाह असलेले गायक मोहम्मद रफी हे देखील गाण्याची फी तीनशे ते चारशे रूपये घेत होते. हीच गोष्ट गानकोकीळा लता मंगेशकर यांचीही होती. या चित्रपटात आणखीन एक अभूतपूर्व अशी गोष्ट आहे. जी जाणून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मुघल-ए-आझम सिनेमातील काही प्रसंगांसाठी चक्क भारतीय सैन्यदलाचे हत्ती-घोडे यांचा वापर केले गेला होता. के असीफ यांची ही अफाट विचारशक्ती व प्रतिभा कोणालाही तोंडात बोटं घालायला लावणारी नव्हे काय ?
या चित्रपटांतील एक अत्यंत रंजक गोष्ट तर अजून सांगायची बाकीच आहे. या सिनेमातील काही प्रसंगाकरिता पाकिस्तानातील काचेच्या महालाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. अशा अवघड परिस्थितीतही या सिनेमाचे चित्रीकरण पार पडले. चारही बाजूने काच असल्याने कॅमेरा, लाईट्स, इतर सर्वच गोष्टींचे परावर्तन होत होते. यामुळे चित्रीकरणात बाधा येत होती. तेव्हा के.असीफ आणि त्यांच्या मुख्य कॅमेरामनने ही परिस्थितीही अगदी लीलया हाताळली.
“प्यार किया तो डरना क्या” हे गाणे चित्रीत करण्यासाठीच तेव्हा दहा लाख रूपये खर्ची केले गेले होते. त्याकाळात तर दहा लाखात अवघा सिनेमा तयार होत असे. त्यावेळी हे गाणे टेक्नीकलरमध्ये चित्रीत करण्यात आले होते. तेव्हा के. असीफ यांची त्यावेळी पूर्ण सिनेमाच टेक्नीकलरमध्ये पुर्नचित्रीत करण्यात यावा अशी इच्छा होती. मात्र, त्यामुळे सिनेमा वितरकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली असती. अन, म्हणूनच हा चित्रपट अर्धा कृष्णधवल, अर्धा रंगीत असा प्रदर्शित झाला. अन तो दिवस होता, ५ ऑगस्ट १९६०. अन, पुढे अनपेक्षित असे काही घडले.
सिनेमाचा पहिला खेळ पाहून अनेक लोकांनी के.असीफ यांना वेड्यात काढायला सुरूवात केली. मुघल-ए-आझम वर फ्लॉपचा शिक्का त्यांनी मारायला सुरूवात केली. तरीही १४ वर्षाची मेहनत व सिनेमावर दिग्दर्शक के.असीफ यांना पूर्ण विश्वास होता. अन, तसेच घडलेही. भविष्यात लोकांना मुघल-ए-आझम पसंत पडायला लागला. हळूहळू सिनेमाची लोकप्रियता इतकी वाढली की सिनेमाचे तिकीट घेण्यासाठी लोकांच्या दोन-तीन दिवस रांगा लागल्या.
केवळ भारतातच या सिनेमाची जादू होती असे नाही. मुघल-ए-आझमची मोहिनी हळूहळू सगळ्या सार्क देशांवर होऊ लागली. पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका येथूनही प्रेक्षकांनी सिनेमा पाहायला गर्दी करायला सुरूवात केली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचायला सुरूवात केली. तत्कालीन सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून मुघल-ए-आझमची ख्याती झाली होती. ह्या विक्रमाला तब्बल पुढची पंधरा वर्षे कोणीही मोडू शकले नव्हते. ही कहाणी होती मुघल-ए-आझमची.
उत्तर प्रदेशातील इटावा येथे के.असीफ यांचा जन्म झाला होता. असीफ यांनी आपल्या आयुष्यात केवळ आठवीपर्यंतच शिक्षण घेतले. असीफ यांच्या धमन्यांमधूनच जिद्दच वाहत असायची. त्याचीच परिणीती मुघल-ए-आझमचा इतिहास वाचून येते. त्यांचा स्वतःवर असलेला विश्वास पाहून त्यांना पाहणारा कोणीही भांबावून गेला नाही तरच नवल.