पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेलं Operation Bluestar
ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये असं काय घडलेलं ज्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींना आपला जीव गमवावा लागला
भारताला धोका बाहेरच्या शत्रूंकडून कमी परंतु अंतर्गत शत्रूंकडून अधिक आहे; आपण बरेचदा हे वाक्य ऐकतो आणि वाचतो, कधीतरी नकळत आपणही एखाद्याशी बोलतांना हे वाक्य वापरतो. या वाक्याची अनेक उदाहरणे आपल्या देशात कैक काळापासून घडत आली आहेत परंतु, बरेचदा आपल्यापर्यंत काही गोष्टींचा इतिहास पुरेसा पोहोचत नाही आणि बरेचदा आपण इतिहास अभ्यासण्यासाठी विशेष धडपड करत नाही.
१९८४ साली असा एक किस्सा घडला होता, जाणून घेऊया त्याबद्दल….
तोंडओळख
पंजाब मध्ये बऱ्याच काळापासून अनेक सामाजिक राजकीय तसेच अतिरेकी घटनांनी जोर धरला होता. अखेर १९८४ मध्ये या घटनांचा अंत करण्यासाठी एक ठोस पाऊल उचलले गेले…ते पाऊल चुकीचे होते कि बरोबर, ती वेळ चूक होती कि बरोबर, ती योजना चूक होती कि बरोबर, याचे परिणाम अधिक चांगले कि अधिक वाईट…. असे एकनाअनेक प्रश्न उभे राहिले आणि आजही त्यांची उत्तरे व्यक्तिपरत्वे बदलतात.
अमृतसर पंजाब मधील सुवर्णमंदिरात भारतीय लष्कर व शीख दहशतवादी यांच्यामध्ये दिनांक ३ जून १९८४ ते ६ जून १९८४ पर्यंत मोठा संघर्ष घडला आणि यालाच Operation Bluestar असे म्हणतात. या ऑपरेशन मार्फत शीख आतंकवादी जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्यासह अनेकांना ठार करण्यात आले. परंतु आतंकवाद संपविण्याच्या या मोहिमेत योजनेअभावी अनेक निष्पाप भारतीयांचा बळी गेला आणि हाच अजूनही वादाचा विषय आहे.
जर्नेल सिंह भिंद्रनवालेचा उदय (Rise of Jarnail Singh Bhindranwale)
१९६६ मध्ये पंजाब हे राष्ट्र स्थापन झाले. परंतु राष्ट्रांमध्ये सत्ता, समाज आणि राजकारण मात्र स्थिर नव्हते. पंजाब मधील नद्यांचे पाणी कोणत्या राज्यांना देण्यात यावे व येऊ नये हा वादाचा मुद्दा बनला, पूर्वीपासून सक्रिय असलेल्या अकाली दलाच्या काही वेगळ्या कारवाया सुरु होत्या या सर्व कारणांमुळे पंजाबचा समाज व राजकारण यात फूट पडत जात होती. अखेर याचे रूपांतर स्वतंत्र राष्ट्र खलिस्तानच्या मागणीमध्ये झाले. राज्यात अराजकता माजली होती. याच दरम्यान पंजाबच्या राजकारणात जर्नेल सिंह भिंद्रनवाले (Jarnail Singh Bhindranwale) याचे आगमन झाले. त्याला काँग्रेसनेच पंजाबच्या राजकारणात पाठिंबा देऊन सक्रिय केले.
बघता बघता भिंद्रनवाले राजकारणात जहाल मार्ग वापरू लागले व आपल्या भाषणांनी त्यांनी लोकांचे समर्थन देखील मिळविले. पुढे जाऊन हाच भिंद्रनवाले सशस्त्र मार्ग वापरून अनेक गोष्टींची मागणी करू लागला. निरंकारी शीख लोकांनी त्याचा विरोध केला व या दोघांच्या संघर्षात १३ शीख मारले गेले. हळूहळू भिंद्रनवाले उग्र आतंकवादाकडे वळू लागला. अनेक दहशतवादी कारवाया पुढे Jarnail Singh Bhindranwale याच्या नेतृत्वाखाली सुरु झाल्या. अखेर त्यांनी पंजाब मधील सुवर्णमंदिर व अकाली तख्त वर ताबा मिळविला.
अकाली तख्त मुघलांना हे दाखविण्यासाठी बांधण्यात आले होते कि तुमच्या सुल्तानांच्याही वरती परमेश्वर आहे ज्याच्यावर कोणत्याही काळाचा परिणाम होत नाही म्हणून हे तख्त दिल्लीच्या तख्तापेक्षा उंच केले होते.
सुवर्णमंदिर हे शिखांचे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी ताबा मिळवून भिंद्रनवाले याने या पवित्र स्थळाला दहशतवादी अड्डा आणि शस्त्रांचा साठा करण्याचे गोदाम केले होते. भिंद्रनवालेच्या नेतृत्वाखाली अनेक प्रमुख मंडळींची हत्या करण्यात आली, जातीयवादी व धार्मिक हिंसाचार करण्यात आला आणि विमानाचे अपहरण, पोलिसांची हत्या इत्यादी अनेक गोष्टी घडविण्यात आल्या. या सर्व कारणांमुळे भिंद्रनवाले बद्दल लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नेते मंडळी सुद्धा याला छुपा पाठिंबा देत होते.
ऑपरेशन ब्लूस्टार साठी कारणीभूत घटक (Reason for Operation Blue Star)
भिंद्रनवालेचा वाढता दहशतवाद संपविणे हे Operation Bluestar चे प्रमुख कारण होते. भिंद्रनवाले याच्या नेतृत्वाखाली दहशतवादी कारवायांचे प्रमाण वाढत जात होते. त्याच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाची तो हत्या करीत जात होता. सर्वप्रथम निरंकारी शिखांनी त्याला विरोध केला तेव्हा त्यांचे १३ शीख याने ठार केले, यानंतर याच निरंकारी पंथाचे प्रमुख गुरुबचन सिंह यांची देखील हत्या केली.
हिंद समाचारचे प्रमुख जगत नारायण यांच्या हत्येसाठी भिंद्रनवालेला अटक झाली आणि मग अकाली दलाने सरकारकडे भिंद्रनवालेच्या सुटकेसाठी बोलणी करून देखील सरकार ऐकत नाही म्हटल्यावर गाजिन्दर सिंह, सतनाम सिंह, जसबीर सिंह, तेजन्द्ररपाल सिंह व करम सिंह यांनी आपल्या दलाअंतर्गत इंडियन एयरलाईनच्या एका विमानाचे अपहरण केले व ते विमान लाहोर येथे नेले आणि त्याबदल्यात भिंद्रनवालेच्या सुटकेची मागणी केली. अखेर Jarnail Singh Bhindranwale याला सोडण्यात आले.
यानंतर अकाली दलाकडून अजून २ विमानांचे अपहरण करण्यात आले व ते पाकिस्तानात नेण्यात आले, पाकिस्तानकडून या विमानांना उतरविण्यासाठी विरोध करण्यात आला होता. दोनही वेळेला विमाने अमृतसर येथे उतरविण्यात आली आणि शेवटी दुसऱ्या खेपेला आतंकवादी मुसीबत सिंह याला ठार करण्यात आले.
पंजाब पोलीसचे डीआईजी अवतार सिंह अटवाल हे सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आले होते, दर्शन घेऊन हातात फुलं असतांना सुवर्णमंदिराच्या पायरीवरच त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.
त्यांचे मृत शरीर रस्त्यावर सुमारे २/३ तास पडून होते परंतु एकही पोलीस किंवा नागरिक अथवा शासकीय यंत्रणा तेथे जाऊन प्रेत जमा करीत नव्हती, इतकी भीती भिंद्रनवालेची जनसामान्यांत होती.
यानंतरही अनेक दहशतवादी कारवाया सुरु होत्या, अनेक बंद पुकारण्यात आले. एके दिवशी प्रवासी बस थांबवून त्यामधून हिंदू प्रवाशांना ओळखून त्यांची सर्वांसमोर हत्या केली गेली. असे प्रकार वाढीस लागले. यानंतर काँग्रेसने स्वतःचेच पंजाब मधील राज्यस्तरीय सरकार बरखास्त केले व राष्ट्रपती राजवट पंजाब मध्ये लागू केली. यानंतर भिंद्रनवाले याने अकाली तख्त आणि सुवर्णमंदिरचा ताबा मिळविला आणि अखेर भिंद्रनवाले आणि त्याच्यापासून उगम झालेला दहशतवाद मिटविण्यासाठी ऑप्रेशन ब्लु स्टार सुरु झाले.
काय होतं ऑपरेशन ब्लू स्टार (Operation Bluestar in Marathi)
दहशतवादामुळे पंजाबमधील परिस्थिती बिकट झाली होती. कोणत्याही वेळी अचानक हे आतंकवादी स्वतंत्र खलिस्तानची स्थापना करतील, जाती-धर्मांवरून लोकांना राज्यातून हाकलून दिले जाईल आणि पुन्हा धार्मिक दंगली होतील अशी भीती निर्माण झाली होती. या वेळी प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी. त्यांनी या ऑप्रेशन ब्लु स्टारला संमती दिली.
या ब्लु स्टारचे नेतृत्त्व तत्कालिन मेजर जनरल कुलदीप सिंह बरार यांनी केले. सुवर्णमंदिराच्या आसपासचा भाग दहशतवादी किल्लाच झाला होता. त्यामुळे दिनांक ३ जून १९८४ रोजी सुवर्णमंदिराच्या आजूबाजूला भारतीय सैन्याने पकड मजबूत केली, या मंदिराच्या आसपासच्या इमारतीत असलेल्या दहशतवाद्यांनी हार मानली परंतु ३ ते ५ जून पर्यंत छोट्या मोठ्या चकमकी भिंद्रनवाले आणि भारतीय लष्करात घडत होत्या.
आसपासच्या परिसरात संचारबंदी लागू झाली. बाहेरील परिस्थिती ताब्यात आणल्यानंतर ५ जूनच्या रात्री भारतीय सैन्याने सुवर्णमंदिराच्या आवारात शिरण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांकडे किती व कसा शस्त्रसाठा असेल याची काहीच कल्पना नसल्यामुळे मंदिराच्या दरवाजातूनच आत शिरताच अनेक जवान मारले गेले. दहशतवाद्यांचा प्रतिकार इतका जोरदार होता कि एकाही जवानाला अकाली तख्तापर्यंत जात येत नव्हते आणि धार्मिक स्थळ असल्यामुळे परिसरातील सुवर्णमंदिरावर गोळीबार करता येत नव्हता.
अखेर सैन्याने मोठ्या शौर्याने अनेक दहशतवादी निकामी केले आणि परिसरात प्रवेश केला, अकाली तख्यापर्यंत पोहोचणे शक्य दिसत नव्हते म्हणून सरळ रणगाडा उतरविला गेला आणि हल्ला सुरु झाला. रात्रभर विविध मार्गानी हल्ले करण्यात आले आणि अखेर ५ जून रात्री १ (म्हणजेच ६ जून) वाजता हा हल्ला थांबला, अकाल तख्तावर रणगाडा घेऊन हल्ला केल्यामुळे भिंद्रनवाले ठार झाला आणि त्याच्यासोबत काही प्रमुख दहशतवादी देखील ठार झाले. यानंतर बराच वेळ उरलेल्या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. अखेर या दहशतवादाला चिरडून टाकण्यात आले.
ऑपरेशन ब्लू स्टार चे परिणाम (Consequences of Operation Blue Star)
या घटनेने आतंकवाद नष्ट झाला, अनेक चांगल्या गोष्टी घडल्या परंतु त्यासोबतच अनेक वाईट गोष्टीचा जन्म झाला. शिखांच्या धार्मिक स्थळाची अतिशय दयनीय अवस्था झाली, एका प्रार्थनास्थळावर चक्क गोळीबार व रणगाडा घेऊन हल्ला करून त्याची तोडफोड झाली होती. शीख समाजाच्या भावना अत्यंत दुखावल्या गेल्या. देशभरात अनेक शीख बांधवानी या विरोधात बंड केले. अनेक सैनिकांनी देखील बंड पुकारले.
या व्यतिरिक्त सर्वात मोठा परिणाम म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या ! होय…
Operation Blue Star मुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि समाजात प्रचंड असंतोष पसरला होता, याच असंतोषातून प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची त्यांच्याच २ शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली.
पंजाबमध्ये या काळात सैन्याकडून व शासनाकडून अनेक बंधने लादली गेली. यामध्ये मिडिया वर अनेक बंधने घातली होती. पंजाबमध्ये संचारबंदी सुरु होती, पत्रकारांना राज्याच्या बाहेरच थांबविले जात होते. यामुळे सरकारची फार आलोचना करण्यात आली. शीख अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची हत्या केल्यानंतर देशभरात शीख-विरोधी दंगे सुरु झाले आणि यामध्ये हजारो शीख मारले गेले.
कोणत्याही पत्रकाराला राज्यात येण्याची परवानगी दिली नव्हती, कोणतीही बातमी बाहेर जनतेपर्यंत पोहोचत नव्हती आणि म्हणूनच या ब्लु स्टार मध्ये मेलेल्या माणसांची संख्या सरकारने जाहीर केल्याप्रमाणे भारतीय सेनेचे ८३ जण ठार झाले, सुमारे २०० जखमी झाले आणि ४९२ दहशतवादी या ऑपरेशन मध्ये मारले गेले, असे समजते. स्थानिक लोकांच्या अनधिकृत आकडेवारीत मात्र फार फरक आढळून येतो.