स्वराज्याकडे वाकडी नजर ठेवणाऱ्यांच्या “हृदयात धडकी भरवणारा पद्मदुर्ग”
रायगडच्या मुरूड तालुक्यातील दुर्ग राजपुरी खाडीच्या मुखाजवळ एका बेटावर छत्रपती शिवरायांनी किल्ले पद्मदुर्ग उभारला. किल्ल्याच्या मुख्य दारासमोर मोठा बुरुज आहे ज्याचा वरचा भाग कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहे म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेल्या या मध्ययुगीन जलदुर्गाला पद्मदुर्ग किंवा कासा या नावाने ओळखतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आजही सुस्थितीत उभा आहे.
जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाले होते आणि त्यामुळेच किनारपट्टीवर सिध्दीने दरारा निर्माण केला होता. शिवरायांनी त्याला वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे ओळखले आणि विविध गोष्टीवर विचार मंथन चालू केले. सिद्धी च्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणता आले तर समुद्रावरील हालचालींना जरब बसवता येईल या उद्देशाने मग शिवाजी महाराजांनी मुरूडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधण्याचा निर्णय घेतला. आणि गवंडी, लोहार, पाथरवट, सुतार अश्या विविध कारागिरांची रवानगी बेटावर करण्यात आली.
महाराजांचा हा निर्णय समझाल्यावर मात्र सिद्दीची झोपच उडाली कारणही तसेच होते, या किल्याच्या बाधंकामनानंतर सिद्दीच्या समुद्रातील अनेक हालचालींवर मर्यादा येणार हे स्पष्टच होते, यामुळे सिध्दीने आरमार घेऊन चढाईची तयारीपण केली मात्र दर्यासारंग दौलतखानची नेमणूक करून याचा बंदोबस्त सुद्धा शिवरायांनी केला होता. रसद पुरविण्याचे काम महाराजांनी सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर दिले होते नंतर या कामात हयगय झाल्याचे समजताच खरमरीत पत्र लिहून कान उघडणी सुद्धा केली होती.
स्वराज्यातील प्रत्येक घटकाने रात्र दिवस एक करून एका हाताने किल्ल्याचे बांधकाम चालू ठेवले तर दुसऱ्या हाताने सिद्धीला धडक लढत सुद्धा दिली. अश्या विविध संकटनावर मत करत आणि अथक प्रयत्नानंतर ‘किल्ले पद्मदुर्ग’ ची उभारणी पूर्ण करून पद्मदुर्ग चे पहिले हवालदार म्हणून सुभानजी मोहिते यांची निवड शिवरायांनी केली.
यानंतर जंजिऱ्याला ताब्यात घेण्याच्या उद्देशाने मोरोपंत पिंगळेच्या नेतृत्वाखाली मोहीम आखण्यात आली, जंजिऱ्यावर तोफांचा मारा करण्यात आला पण अपेक्षित परिणाम साधला नाही. मग जंजिऱ्याला शिडी लावण्याची धाडसी योजना आखण्यात आली, लाय पाटलाने हे धाडसी आव्हान स्वीकारले. रात्री आपल्या सहकाऱ्यांसोबत लाय पाटील पद्मदुर्ग मधून बाहेर पडले आणि अंधाराचा फायदा घेत जिंजिऱ्याला दोरखंडाच्या शिड्या लावल्या धारक-याची वाट पाहत राहिला पण पाहत झाली तरी सैन्य आले नाही पाहून त्याने पद्मदुर्ग गाठला. हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी लय पाटलांना पालखीचा मान दिला पण त्याने नम्रपणे पालखी नाकारली.
मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट असे पद्मदुर्ग किल्ल्याचे दोन भाग आहेत. पडकोट भाग आता बऱ्यापैकी ढासळला आहे पण मुख्य किल्ल्याची मात्र तटबंदी अजूनही उत्तम आहे. मुख्य दारासमोरील बुरुजावरील भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहे, म्हणून किल्ल्याला पद्मदुर्ग असे बोलले जाते.
ठिकठिकाणी कोरलेली कमळं, लपवलेलं प्रवेशद्वार बरोबरच पद्मदुर्ग किल्याच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे कि तटबंदीच्या दोन दगडांमधे चुना वापरला आहे आणि तो इतका जबरदस्त आहे कि साडेतीनशे वर्षाच्या लाटांच्या तडाख्याने तटबंदीचा दगड झिजून गेला आहे पण दोन दगडांमधील चुना अजूनही अगदी मजबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे अशी अनेक वैशिष्ट्य आपल्याला चकित करून टाकतात. किल्ल्यावरील पडकोटातील “चौकोनी विहीर”, शिवकालीन तोफा, विविध वास्तूंचे अवशेष पाहून किल्ल्याकडे गेल्यावर मधील खडकावर वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला दिसतो.
पायऱ्या चढून पद्मदुर्गाच्या महाद्वारामधे प्रवेश करावा लागतो, त्यानंतर आतल्या बाजूस पहारेकर्यासाठी केलेल्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी आपल्याला पायर्यांचा वापर करावा लागतो. जाताना मधील भागात नव्या जुन्या विविध वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. काही काळापुरते भारत सरकारने कस्टम ऑफिसचे एक कार्यालयहि चालू केले होते नंतर ते स्थलांतरित करण्यात आले. चारही बाजूने खरे पाणी असताना किल्य्याच्या आतमध्ये गोड्या पाण्यासाठी चार टाकी केल्या आहेत. तसेच किल्ल्याच्या तटबंदीवरुन सामराजगड आणि जंजिराहि पाहायला मिळतो.
किल्ले पद्मदुर्ग ला भेट देण्यासाठी अलिबाग-रेवदंडा-मुरूड या मार्गाचा आपण वापर करू शकता, किंवा मुंबई-पणजी महामार्गाचा वापर करून तुम्ही मुरुडला पोचू शकता. यानंतर मुरूड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आपल्याला मिळेल, विविध ठिकाणी दिशादर्शक फलक पण आहेत त्यामुळे तुम्हाला किल्यावर जाण्यासाठी फारसा त्रास होणार नाही.