फकिराचे शब्द खरे ठरले आणि सगळं सोडून गावी निघालेला हा नेता देशाचा पंतप्रधान झाला
पी.व्ही. नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) यांचा जन्म २८ जून १९२१ साली करीनगरचा. उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात त्यांचे शिक्षण पार पडले. पेशाने शेतकरी आणि वकील असुन सुद्धा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांची राजकीय कारकीर्द अतिशय भारदस्त होती. राज्याच्या राजकारणपासून सुरवात करत केंद्राच्या राजकारणात जाताना नरसिंहरावांनी अनेक महत्वाची पदे भुषवली व आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःची वेगळीच छाप उमटवली.
नरसिंह राव यांनी भुषवलेली महत्वाची पदे
१९६२-६४ – आंध्रप्रदेशचे कायदा आणि माहिती मंत्री
१९६४-६७ – कायदा आणि धर्मादाय मंत्री
१९६७ – आरोग्य आणि वैद्यकीय मंत्री
१९६८-१९७१ – शिक्षण मंत्री
१९७१-७३ – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री
१९७५-७६ – अखिल भारतीय काँग्रेसचे समितीचे सरचिटणीस
१९६८-७४ – आंध्रप्रदेशच्या तेलगु अकादमीचे अध्यक्ष
१९५७-७७ – आंध्रप्रदेशच्या विधानसभेचे सदस्य
१९७७-८४ – लोकसभेचे सदस्य
१९८० – १९८४ – परराष्ट्र व्यवहार मंत्री
१९८४ – रामटेकमधून ८व्या लोकसभेवर निवडून गेले
१९ जुलै १९८४ – ३१ डिसेंबर १९८४ – केंद्रीय गृहमंत्री
३१ डिसेंबर १९८४ – २५ सप्टेंबर १९८५ – संरक्षण मंत्री
२५ सप्टेंबर १९८५ – मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
एवढा तगडा अनुभव आणि कार्यकर्तृत्व असतानाही राजीव गांधींनी १९९१ च्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट नरसिंहरावांना नाकारले. त्यामुळे निराश झालेल्या नरसिंहरावांनी हा आपल्या राजकीय कारकिर्दीचा शेवट आहे असे मानून दिल्ली निवास्थानातील सामानाची आवराआवर करून आंध्रप्रदेशला आपल्या गावी परत जाण्याची तयारी सुरु केली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
२१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे सुरु असलेल्या राजीव गांधीच्या प्रचारसभेत ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम’ या संघटनेच्या लोकांनी
मानवी बॉम्बचा स्फोट घडवून आणला. ज्यात राजीव गांधींसह १८ ते २० जणांचा मृत्यू झाला. १९८७ साली राजीव गांधींनी श्रीलंकेमध्ये भारतीय सैन्य पाठवल्याच्या रागातून या संघटनेने हे कृत्य केले.
राजीव गांधींच्या मृत्यूने अख्खा काँग्रेस पक्षच हादरून गेला. निवडणूक तोंडावर होती त्यातच सोनिया गांधीनी नेतुत्व स्वीकारण्यास नकार दिल्याने अशा परिस्थितीत करायचे तरी काय हा प्रश्न काँग्रेस पक्षासमोर उभा राहिला. काँग्रेसने पक्षांतर्गत नेतृत्व शोधायला सुरवात केली. सोनीया गांधींनी याबद्दल जेव्हा पी.एन.हकसर यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी शंकर दयाळ शर्मा यांचे नाव सुचवले. मात्र शर्मा यांनी वाढते वय आणि खराब तब्येतीचे कारण देऊन सक्रिय राजकारणात येण्यास नकार दिला. पुन्हा शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग, एन.डी.तिवारी अशी अनेक नावं समोर येत होती. पण शेवटी पी.एन. हकसर व इतर काँग्रेस नेत्यांनी पी.व्ही.नरसिंह राव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.
नरसिंह राव जेष्ठ होते, त्यांचा अनुभव दांडगा होता. परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची किंवा टाळण्याची कुवक त्यांच्यात होती. ते एक मुरलेले राजकारणी होते म्हणूनच काँग्रेसने त्यांची निवड केली आणि पी.व्ही.नरसिंह राव अचानकपणे या देशाचे पंतप्रधान झाले. मतांचा उच्चांक निर्माण करून आंध्रातल्या नंद्याळ लोकसभा मतदार संघातून नरसिंह राव लोकसभेवर निवडून गेले आणि त्यांचे असे अचानक पंतप्रधान होण्याचे प्रकरण जगभर गाजले. खरंतर सरकारला आवश्यक तो पाठिंबा नसतानाही आणि त्याचं सरकार अल्पमतात असतानाही नरसिंह राव यांनी बहुमत ‘मॅनेज’ केलं. यातूनच त्यांच्यावर बहुमतासाठी काही संसद सदस्य खरेदी केल्याचा आरोप देखील झाला. पण त्या आरोपातूनही ते निर्दोष सुटले. हे सारंच आश्चर्यचकित करून टाकणारं होतं.
नरसिंह रावांच्या जन्मानंतर त्यांच्या घरी एक फकीर आले होते. तेव्हा ते फकीर नरसिंह रावांच्या वडिलांना म्हणाले होते की “एक दिवस असा येईल जेव्हा तुमचा मुलगा या हिंदुस्थानचा बादशहा होईल”. पण त्या फकिराचे शब्द आपलं राजकारण संपण्याच्या वेळी खरे ठरतील असं खुद्द नरसिंह रावांना सुद्धा वाटलं नसेल.