मिस्टर डिपेंडेबल (Mr Dependable), द वॉल (The Wall) ही विशेषणे कुणासाठी वापरायचो आपण ? अर्थात ! द वन अँड ओन्ली राहुल द्रविड (Rahul Dravid). तुम्ही जर गूगल वर “The wall of India” ह्या नावाने सर्च केले तर तुम्हाला राहुल द्रविड ह्या खेळाडू बद्दल माहिती दिसेल. ह्या विविध नावांनी ओळखल्या जाणार्या राहुल द्रविडचे टोपण नाव “जॅमी” होते, हे सुद्धा द्रविड फॅन्सना माहिती असेलच. त्याचे टोपण नाव जॅमी होते कारण त्याचे वडील एका जॅम बनविणाऱ्या कंपनीत कामाला होते म्हणे आणि योगायोग असा कि ह्याच जॅमीने स्थानिक शालेय स्पर्धा “जॅमी कप टूर्नामेंट” आपल्या संघाला जिंकवून दिला व त्या सामन्यात हा जॅमी “मॅन ऑफ द मॅच” ठरला.
पुढे ह्याच जॅमीने आपल्या कामगिरीच्या जोरावर मिस्टर डिपेंडेबल, मिस्टर कुल आणि द वॉल अश्या अनेक उपाध्या मिळवल्या आणि हि सगळी नावे त्याला प्रेक्षकांनी दिली होती मित्रांनो !
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली ह्यांना भारतीय संघाचे त्रिमूर्ती म्हटले जायचे. कधीकधी मला असेही वाटते कि सचिनच्या महानतेची चर्चा करताना आपण राहुल द्रविड ह्या महान खेळाडूस दुर्लक्षित करतो कारण त्याची महानता त्याने क्रिकेटच्या मैदानावर तसेच मैदनाबाहेरही वेळोवेळी सिद्ध केली आहे.

तुम्हाला ती झिम्बाब्वे सोबतची मॅच आठवते का जेव्हा भारतीय संघाची अवस्था ५ बाद ८८ अशी झालेली होती. सगळे दिग्गज फलंदाज त्यादिवशी फक्त मैदानावर हजेरी लावण्यास आले होते कि काय असे खेळत होते. भारत झिम्बाब्वेसोबत मॅच हरतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण राहुल संकटमोचक बनून आला आणि शानदार ७१ धावा त्याने केल्या आणि भारताची धावसंख्या ८८/५ वरून २८८/६ पर्यंत पोहोचवली. मोहम्मद कैफ त्यावेळी अगदीच नवखा होता आणि त्याला एका खंबीर साथीची आणि अनुभवी सहकार्याची गरज होती आणि राहुल द्रविडपेक्षा जास्त चांगली साथ कैफला क्वचितच मिळाली असती. त्या मॅचमध्ये कैफने बनवलेल्या एक एक रन्सचे कौतुक राहुल द्रविड करत होता व कैफसारख्या नवीन खेळाडूस प्रोत्साहित करत होता. महान खेळाडूची हिच तर खासियत असते.
द्रविडची कारकीर्द आणि त्याचे योगदान ह्याबद्दल बोलायला गेलो तर संपूर्ण दिवस पुरायचा नाही, पण मला त्याची ती अजून एक विशेष इनिंग आठवते ज्यामुळे आपण पाकिस्तानला धूळ चारली होती. त्या सामन्यात पाकिस्तानने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये २२४ धावा केल्या होत्या. आता वेळ होती भारतीय फलंदाजीची. क्रिकेटप्रेमींना कल्पना असेलच कि पाकिस्तानी तेजगती गोलंदाजीची धार तेंव्हा फारच तेज असायची. शोएब अख्तर १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी करायचा आणि केवळ शोएबच नव्हे तर पाकिस्तानचे इतर फास्टर्स भेदक गोलंदाजी करत असत.
त्या सामन्यातील भारताच्या पहिल्या इनिंगमधल्या पहिल्याच बॉलवर शोएब अख्तरने सेहवागला वापस पाठवले. सेहवाग शून्यावर बाद झाला. शून्य रनवर एक विकेट हि परिस्थती दडपण आणणारी असते पण द्रविडला दडपण वगैरे शब्द माहीतच नाहीत कारण तो कुठल्याही परिस्थितीत शांतपणेच खेळायचा तसाच तो त्याही दिवशी खेळला.
सेहवाग 0 धावांवर बाद झाला आणि दुर्दैव असे कि त्यादिवशी सचिनसुद्धा अवघी १ धाव करून बाद झाला. तुम्हाला वाटलं असेल आता सचिन गेला म्हटल्यावर सगळंच संपले आणि पाकिस्तानलाही आपण सामना जिंकणार असल्याचा साक्षात्कार झालाच असावा पण त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार होते कारण त्या सामन्यात द्रविडने अशी काही फलंदाजी केली कि पाकिस्तानी बॉलर्सनी अक्षरशः पाणी मागितले असेल. एकट्या द्रविडने त्या सामन्यात तब्बल २७० धावा केल्या ज्यामुळे सामन्याचा निकालच फिरला व त्या कसोटी सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता.

लोक म्हणतात द्रविड टेस्ट प्लेयर आहे तो जलदगतीने धावा बनवूच शकत नाही, त्यांनी कदाचित त्याची न्यूझीलँड विरुद्धची तुफान खेळी पहिली नसावी ज्यात त्याने केवळ २२ बॉल्समध्ये ५० रन्स फाटकावले होते. ५० रन्स केवळ २२ चेंडूत म्हणजे स्ट्राईक रेट होता २०० पेक्षा जास्त. आता २०० पेक्षाही जास्त स्ट्राईक रेटने धाव करणाऱ्याला जर तुम्ही संथ खेळतो असे म्हणत असाल तर आमचे काहीच म्हणणे नाही.
द्रविडची खासियत हि कि तो दांडपट्टा घुमविल्याप्रमाणे बॅट घुमवत नाही तर तो प्रत्येक शॉट तंत्रशुद्ध पद्धतीने मारतो. कोणता बॉल कसा खेळायचा हे त्याला इतक पक्कं ठाऊक असे कि गोलंदाज गोलंदाजी करूनकरून जेरीस येत असे पण द्रविडची विकेट मिळवणे त्याला जमतच नसे. क्रिकेट एक्सपर्टस जगातील सर्वोत्तम तंत्रशुद्ध फलंदाजाच्या यादीत द्रविडला फार वरचे स्थान बहाल करतात, यातंच सगळं आलं.
एकदा सचिन १९४ धावांवर खेळत असताना राहुल द्रविडने डाव घोषित केला म्हणून सचिन फॅन्सनी द्रविडवर टीकेची झोड उठविली होती पण त्यावेळी एक कर्णधार म्हणून त्याला संघहितासाठी जो निर्णय घेणे आवश्यक वाटले तो त्याने घेतला आणि संघ व देश ह्यापेक्षा जास्त महत्वाचे काहीच नसते हे त्याने वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. त्यामुळे त्याने घेतलेल्या ह्या निर्णयावर शंका घेणे योग्य कि अयोग्य हे तुम्हीच ठरवा.
