जागतिक नकाशावर महाराष्ट्राचा डंका वाजवणारे पाहिले राजघराणे
चाणक्याच्या अर्थशास्त्राच्या जोरावर चंद्रगुप्त राजा झाला आणि मौर्य साम्राज्य आकारास आले. भारतवर्षातील एक सुजलसुफलाम साम्राज्यापैकी एक म्हणून त्याने बिरुद मिरवले पण पुढे कालावधीनंतर नेतृत्वहीन झालेल्या मौर्य साम्राज्याच्या ह्रास झाला आणि अनेक छोटे मोठे नवीन राज्य उदयास आलीत. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात शुंग आणि कनवांचे वर्चस्व तयार झाले तर इकडे मध्य भारतातील महाराष्ट्र भागात सातवाहन घराण्याचा उगम झाला. सातवाहनांनी महाराष्ट्राला राजकिय स्थैर्य, उत्कृष्ट प्रशासन, धार्मिक सहिष्णुता आणि व्यापारास चालना दिल्याने सुस्थिर शासन निर्माण केले. यामुळे महाराष्ट्रात कला, स्थापत्य आणि साहित्यामध्ये मोठी भरभराट झाली.
सातवाहनांच्या तब्बल 30 राजांनी इ स पू 230 ते इ स 230 असे एकूण 460 वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. जागतिक नकाशावर महाराष्ट्रास दर्शवणारे आणि महत्व प्राप्त करून देणारे हेच महाराष्ट्रातील पाहिले राजघराणे.
सातवाहनांचे मूळ
इ स ते इ स पू असा कालखंड असलेल्या या राजघराण्याच्या मुळाबाबत फार नोंदी नाहीत आणि जे सगळीकडे घडत आले आहे तसच तज्ञांमध्ये याबाबद्दल एकमत नाही. काही इतिहासकारांच्या मते सातवाहन हे मूळचे आंध्र प्रदेशातील आहेत तर महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे डॉ मिराशींच्या मते सातवाहन मूळ विदर्भ मधील आहेत. तर उपलब्ध ऐतिहासिक साधनानुसार सातवाहनांचे मूळ स्थान महाराष्ट्र असून पैठण ही त्यांची राजधानी होती.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, पैठण, कऱ्हाड, नाशिक, भोकरदन येथील विविध पुरातत्वीय उत्खनणाचा उपयोग सातवाहन कालखंडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी होतो. अनेक ठिकाणी त्या कालखंडातील नाणे सापडले आहेत याचाही उपयोग विविध माहिती मिळवण्यासाठी झाला आहे. गुणढ्याची बृहतकथा, राजा हाल याचा गाथा सप्तपदी इ साहित्यातून व परकीय प्रवाशांच्या प्रवासवर्णनावरून सातवाहन राज्यविषयी अधिक माहिती मिळालेली आहे.
सातवाहन राजवंशातील प्रमुख राजे
सिमुक
सिमुक हा सातवाहन राज्याचा संस्थापक राजा आहे, राजा सुशर्मा याला ठार करून त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याने विदर्भ आणि विदीशा जिंकून दक्षिणपथपती असे बिरुद धारण केले.
सातकर्णी प्रथम
राजा सिमुक नंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण गादीवर आला आणि त्याने 18 वर्षे राज्य केले. त्यांनतर सिमुक पुत्र प्रथम सातकर्णी राज्यावर आला. पराक्रमी आणि मुत्सद्दी अशी त्याची ओळख होती याचबरोबर वैदिक धर्मचा कट्टर पुरस्कर्ता. त्याने आपल्या हयातीत दोन अश्वमेध यज्ञ आणि एक राजसुर्य यज्ञ केल्याचे पुरावे आहेत. त्याचा पराक्रम इतका मोठा होता की पुढील सर्व राज्यांनी आपल्या नावात सातवाहन न लावता सातकर्णी असा केला. यानंतर एक शतकानंतर सातवाहनांच्या वाढत्या सत्तेला पायबंद बसला आणि राज्य दुर्बल बनले.
गौतमीपुत्र सातकर्णी
मेलेल्या अवस्थेत गेलेल्या सातवाहन राज्याला पुन्हा आपल्या पराक्रमाने प्रस्थपित करणारा गौतमीपुत्र सातकर्णी. त्याने शक, पल्लव, यवन तसेच राजा नहपान यांना पराभवाचे पाणी पाजून आपला दरारा निर्माण केला. त्याच्या या पराक्रमाबद्दल त्याच्या आईने त्याला ‘त्रिसमुद्रतोय-पितवहन’ अशी उपमा दिली, याचा अर्थ ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहे. आपल्या आईबद्दल असलेल्या आदरामुळे त्याने स्वतःच्या नावपूर्वी आईच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला आहे.
यज्ञश्री सातकर्णी
सातवाहन राज्याचा शेवटचा राजा. शक राजाला पाणी पाजून त्याने आपले साम्राज्य वाढवले. त्याच्या नंतर झालेल्या राजाचा मात्र शकांची आक्रमणे, आणि सततची युद्धे यासमोर टिकाव लागला नाही आणि सातवाहन राज्याचा ह्रास झाला.
सातवाहनांच्या तब्बल 30 राजांनी इ स पू 230 ते इ स 230 असे एकूण 460 वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. जागतिक नकाशावर महाराष्ट्रास दर्शवणारे आणि महत्व प्राप्त करून देणारे हेच महाराष्ट्रातील पाहिले राजघराणे.