भारतात राहून इंग्रजांविरुद्ध लढला, सफरचंदची शेती शिकवली…..कोण आहे का अमेरिकन पठ्या ?
स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेऊन ६ वर्ष तुरुंगात काढली, एवढंच काय तर एका भारतीय मुलीशी विवाह देखील केला
कोट्यावधी भारतीयांनी एकत्र संघर्ष करत इंग्रजांना देशाबाहेर पिटाळून लावल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहितेय. मात्र एक अमेरिकी भारताच्या बाजूने इंग्रजांविरुद्ध लढल्याचं आपल्यापैकी किती जणांना माहितेय ? तो बहाद्दर फक्त भारताच्या बाजूने लढला नाही, तर सफरचंदाची शेती कशी करायची हे ही आपल्याला शिकवून गेला. चला तर मग, जराही वेळ न दवडता जाणून घेऊया या पठ्ठ्याबद्दल…
पूर्वायुष्य
अमेरिकेतील नावाजलेल्या कुटुंबात जन्मलेले आणि ‘स्टॉकस् अँड पॅरिश’ कंपनीचे वारस सॅम्युल इवांस स्टॉकस् आपल्या ऐशआरामी जीवनाचा त्याग करुन १९०४ साली भारतात आले. आपला मुलगा सहजच फिरण्यासाठ सहलीला चाललाय असा समज वडलांचा झाल्याने त्यांनीही सॅम्युल यांना रोखले नाही. पण त्यांना तरी कुठे माहित होतं की, ही सहल सॅम्युल यांचं रुपांतर एका भारतीयामध्ये करेल म्हणून.
शिमला येथे रुग्ण सेवा आणि भारतीय संस्कृतीचा अंगीकार
सॅम्युल यांनी भारतात येऊन हिमालाच्या कुशीत वसलेल्या शिमला येथे कोड बाधित रुग्णांची सेवाशुश्रुषा करण्यास सूरवात केली. भारतात काम करत असताना त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की अजूनही भारतीय लोक त्यांना बाहेरचे समजतात.
भारतीयांनी आपल्यालाही आपलंस करावं म्हणून सॅम्युल यांनी भारतीयांसारखाच पेहराव करायला सूरवात केली. एवढंच नाही तर पहाडी बोलीभाषा शिकून त्याच भाषेत इतरांशी संवाद साधू लागले. त्यांची ही युक्ती चांगलीच काम करुन गेली. भारतीयांनी हळूहळू त्यांस आपलंस करण्यास सुरुवात केली. लोकांना या गोष्टीची जाणीव झाली की सॅम्युल त्यांच्याच सेवेसाठी इथे राहत आहेत.
सफरचंदाची कल्पना
१९१२ साली सॅम्युल बेंजामिन इग्निशियस या राजपूत- ख्रिश्चन वंशाच्या मुलीच्या प्रेमात पडले. पुढे तिच्याशी त्यांनी विवाह देखील केला.
सॅम्युल यांना १९१६ साली अमेरिकेत उगवल्या जाणाऱ्या एका सफरचंदाच्या प्रजातीची माहिती मिळाली. ती माहिती पाहून त्यांच्या मनात विचार आला की हिमालयाच्या वातावरणात व मातीत या सफरचंदाच्या प्रजातीचे उत्पादन होऊ शकते.
म्हणूनच त्यांनी पहाडी लोकांना याबद्दल जागरूक केले, जेणेकरुन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटावा. फक्त एवढ्यावरचं सॅम्युल थांबले नाहीत. त्यांनी आपल्या संपर्कामार्फत दिल्ली बाजारपेठेचे रस्तेही पहाडी लोकांसाठी खुले करुन दिले.
इंग्रजांविरुद्ध संघर्ष
सॅम्युल यांचे कार्य फक्त रुग्णांची सेवा आणि सफरचंदाच्या उत्पादनापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी भारतीयांप्रमाणेच इंग्रजांविरोधातही संघर्ष केला. भारतीय लोकांना जबरदस्ती सैन्यामध्ये भरती करण्याला त्यांनी कडाडून विरोध केला. अनेकदा इंग्रज सरकारला पत्र लिहून याबाबत सूचनाही दिली. पहाडी लोकांच्या मानसन्मानासाठी इंग्रजांशी खुली टक्कर घेण्यास सॅम्युल सदैव तयार असायचे.
सॅम्युल यांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितले की, ते पहाडी लोकांना जबरदस्ती शिपाई बनवू शकत नाही आणि इंग्रज अधिकाऱ्यांचे सामान उचलण्यास जबरदस्ती करु शकत नाही.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात मजदुरांविषयी बोलताना ‘त्यांच्यावर अन्याय होतोय’ असं नाही, तर ‘आमच्यावर अन्याय होतोय’ असं बोलायचे.
त्यांच्या या कृतीवरून एकचं गोष्ट स्पष्ट व्हायची, ती म्हणजे ते स्वतःला पूर्णपणे भारतीय मानायचे. त्यांच्या या संघर्षामुळे इंग्रज सरकारने पहाडी लोकांना जबरदस्ती सैन्यात भरती करणे बंंद केले.
राष्ट्रीय आंदोलनात सहभाग आणि ६ वर्षांचा तुरुंगवास
१९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांडातील भारतीयांविरोधातील हिंसा पाहून सॅम्युल संतापाने पेटून उठले आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीय आंदोलनात भाग घेण्याचा निर्णय घेतला. ते पंजाब प्रांतात बरेच सक्रिय झाले आणि पुढे जाऊन पंजाब प्रदेश काँग्रेसचे सदस्यदेखील बनले.
१९२१ साली इतर काँग्रेस सदस्यांप्रमाणेच सॅम्युल यांनीही ‘प्रिन्स ऑफ वेल्स’च्या भारत भेटीचा विरोध केला. त्यांच्या या कृतीमुळे इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरत त्यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवास घडवला.
धर्मपरिवर्तन आणि ‘सॅम्युल चे सत्यानंद’
आपल्या ७ मुलांपैकी सर्वात लहान मुलाच्या मृत्यूनंतर सॅम्युल यांनी धर्म परिवर्तन केले. ते सॅम्युल स्टॉकस् वरुन सत्यानंद झाले. त्यांच्या पत्नीनेही त्यांचे अनुसरण करत हिंदू धर्म स्वीकारला आणि त्या प्रियदेवी नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. सॅम्युल यांनी आपल्या सर्व मुलांचे पालनपोषण भारतीयांप्रमाणे केले.
ते म्हणायचे, “मी एका भारतीयाशी लग्न केले आहे. मी देखील भारतात राहतो आहे. त्यामुळे माझ्या मुलांची ओळखही भारतीयच असावी ना की अँग्लो इंडियन”.
१४ मे १९४६ रोजी आजापणामुळे सॅम्युल यांचा मृत्यू झाला. शिमल्यातील कोटघर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सॅम्युल यांच्या योगदानाबद्दल बरेच लोक अनभिज्ञ आहेत. मात्र आजही हिमाचलमधील लोकांच्या हृदयात सॅम्युल यांचे एक वेगळेच स्थान आहे!