शरद पवारांचा दौरा झाला की त्या भागातल्या जमिनींचे भाव वाढतात. खरंय का ?
शरद पवार आणि भूखंड हे समीकरण तयार झालंच कसं ? WhatsApp युनिव्हर्सिटीतल्या अजून एका प्रश्नाचं उत्तर
महाराष्ट्रातल्या अनेकांचा आवडीचा विषय म्हणजे ‘शरदचंद्र पवारांची संपत्ती’ (Sharad Pawar Property). लवासा असं नाव जरी घेतलं तरी काही लोकांच्या मनात फोटो येतो तो शरद पवारांचा. एखादी मोठी इमारत दिसली कि शरद पवार, एखादा मोठा भूखंड दिसला कि शरद पवार, एखादा मोठा मॉल दिसला कि शरद पवार, अश्याप्रकारे शरद पवार आणि भूखंड हे गणितापलीकडचं समीकरण तयार झालं आहे. देशातील सगळ्यात श्रीमंत राजकारणी नंतर पवारांविषयी सगळ्यात जास्त चर्चिला जाणारा विषय तो हाच.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी असे कित्येक किस्से WhatsApp युनिव्हर्सिटी वरून प्रसारित होत असतात. एवढंच काय तर ५ ऑगस्टला गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची घोषणा केली तेव्हा महाराष्ट्रात ३७० हटवण्याची चर्चा कमी आणि पवार साहेबांची माणसं काश्मीर मध्ये जमीन घ्यायला गेल्याची मजेशीर चर्चा अधिक रंगली होती. २०१९ म्हणजेच महाराष्ट्राच्या विधानसभेचा मुहूर्त त्यामुळे पवारांच्या अश्या विविध प्रवादांना तसा अधिकचा जोरच आला आहे.
पण शरद पवार आणि भूखंड हे समीकरण तयार झालंच कसं ?
तर त्याच झालं असं, शरदराव गेल्या ५० वर्षांपासून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आहेत आणि त्यातला बराचसा काळ हा त्यांनी सत्तेत काढला हे आपल्याला माहीतच आहे. तुम्ही पवारांचा स्वभाव पाहिलात तर ते कधीही शांत बसलेले नाहीत. अख्खा महाराष्ट्र त्यांनी कित्येकदा उभा – आडवा पालथा घातला आहे. त्या त्या भागात जाऊन लोकांना भेटून चाललेल्या सामाजिक आणि आर्थिक बदल ते कायमच जाणून घेत आले आहेत.
एखाद्या ठिकाणाला भेट द्यायची असल्यास हेलिकॉप्टर पेक्षा गाडीने प्रवास करत तो भाग धुंडाळाने ही शरदरावांची सवय, आणि मग प्रवासात त्या त्या भागात फिरून कुठे कोणत्या उद्योगाला वाव आहे हे ते समझून घेतात. त्यानंतर काही दिवसात तिथे हालचाल वाढते, अनेक लोकांच्या येरझाऱ्या वाढू लागतात, जमिनीचे मोजमाप चालू होते. या सगळ्या प्राथमिक चाचपणीनंतर थोड्याच कालावधीमध्ये एखादा उद्योग चालू होतो असाच काही इतिहास आहे. अश्या प्रकारे शरद पवारांनी सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात अनेक उद्योग आणि पर्यटनस्थळे चालू करण्यास प्रोत्साहन दिले आहे.
अनेकदा झालेल्या या गोष्टीमुळे लोकांच्या मनात वेगळेच विचारचक्र चालू झाले आणि मग शरद पवारांचा दौरा झाला कि इथे त्यांनी जमिनी घेतल्यात आणि नक्कीच कोणतातरी मोठा प्रकल्प किंवा उद्योग येणारच अशी लोकांची समजूत होऊ लागली. मग यातून रिकामी राजकीय डोकी वेगळ्याच अफवा पसरवू लागतात आणि त्या भागातल्या जमिनींचे भाव वाढू लागतात. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या या पवरचक्रामुळे “शरद पवार आणि भूखंड” हे गणितापलीकडचे समीकरणच तयार झालं आहे. पुढच्या सरत्या वर्षात हे समीकरण फक्त जमिनीपुरते न राहता मोठ्या बिल्डिंग, मॉल आणि रस्त्यासोबत सुद्धा जोडले गेले.
या समीकरणाबाबत शरद पवार काय म्हणतात ?
पवारांच्या मते भूखंड आणि माझ्याबद्दल अगणित गैरसमज अनेक रिकाम्या डोक्यानी पसरवली पण यातल्या एकाही प्रकरणात तथ्य सापडले नाही, मात्र याबाबतीत प्रवाद तसेच आहेत. काहीजणानी जाणून बुजून त्याची वात तेवत ठेवली आहे आणि राजकीय स्वार्थसाठीच या कांड्या पेटवत ठेवल्या असाव्यात. पवार याबाबत पुढे म्हणतात, अश्या अफवांचे चटके मी खूप सोसले आहेत, अनेक आरोप करूनही कोणाला काहीही सिद्ध करता आलेले नाही तरी आरोपांच्या कांड्या ते पेटवत ठेवत आहेत. यावर माझं एकच म्हणणं आहे “देव त्यांचं भलं करो”..!