संसदेत वाजपेयींनी चेष्टा केली म्हणून मनमोहन सिंग अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते
मनमोहन सिंग हे म्हणजे एक धीरगंभीर व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्यावर वाजपेयींनी केलेल्या गंमतीमुळे ते चांगलेच नाराज झाले. पण हि गंमत नेमकी काय होती ?
राजकारण म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात. नेता लोकांची आपसांत होणारे वाद, एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप, हेवे-दावे, भ्रष्टाचार, पक्षबदल या सगळया सावळ्या गोंधळात सामान्य माणसाचे प्रश्न पूर्णच झाकोळले जातात… त्यामुळे नको ते राजकारण, असाच सूर बहुतेक जणांचा असतो.
आता अश्या या खोट्या, मतलबी दुनियेत काहीतरी चांगलं करावं ह्या स्वच्छ हेतूने वावरायचं असेल तर हिंमत, चिकाटी, जिद्द ही हवीच !! या सगळया सद्गुणांबरोबर खुसखुशीत, प्रासंगिक विनोद करण्याची खुबी जर एखाद्याकडे असेल तर दुग्धशर्करा योगच !!
अशा अनेक गुणांनी युक्त असं व्यक्तिमत्व म्हणजे श्री. अटलबिहारी वाजपेयी ! भाजपचे खंदे प्रचारक, गुणी नेता, मिश्किल व उत्तम वक्ता !! भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी पक्षाची बाजू अधिक बळकट केली, सामान्य कार्यकर्त्यांची चिंता वाहिली, अनेक भरीव-भक्कम निर्णय घेऊन या देशात चांगले बदल होत असल्याचा संदेश जगाला दिला.
परंतु कुणी कितीही चांगलं असलं तरी त्याच्यावरही आरोप केल्या जातातच. वाजपेयींवरही आरोप झाले.. मातब्बर राजकारण्यांसारखे त्यांनी ते पचवले, परतवून लावले, उलटपक्षी आरोपही केले. राजकारण म्हटलं की हे सगळं ओघाने आलंच ! परंतु पंतप्रधानपदावर राहायचं म्हणजे काटेरी मुकुट घालण्यासारखं ! त्यांनी तो मुकुट घातला आणि लीलया पेलला देखील !
आपल्या नर्म विनोदशैलीची पेरणी ते सर्वत्र करत राहिले. एखाद्या पंतप्रधानाच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध ! त्यांचं मंद स्मित, त्यांचा हजरजबाबीपणा, भाषण करताना मधेच काही सेकंद पॉज घेत राहण्याची त्यांची ती ढब…. ही त्यांची खास वैशिष्ट्ये ठरली . अनेक मित्र त्यांनी कमावले. स्वपक्षातीलच नव्हे तर इतर पक्षातील किंवा त्यांचे कट्टर विरोधक असलेले नेते वैयक्तिक पातळीवर त्यांचे मित्र होते हे विशेष !

१९९१ मध्ये काँग्रेस सत्तेत होती. पी. व्ही. नरसिंहराव त्यावेळचे पंतप्रधान होते. वित्तमंत्री होते मनमोहन सिंग….. संसदेत त्यांनी बजेट सादर केलं. आता बजेट सादर झाल्यावर ते सगळ्यांनी स्वीकारणं, त्याच्यावर टीका न होणं ही अशक्य कोटीतली गोष्ट ! विरोधी पक्षनेते म्हणून वाजपेयींनी या अर्थसंकल्पाचा खरपूस समाचार घेतला, चौफेर टीका केली, अगदी खिल्लीही उडवल्या गेली. हे सगळं त्यांनी केलं परंतु आपल्या मिश्किल स्वभावाला अनुसरूनच ! मिर्झा गालिब यांचा एक शेर त्यांनी पेश केला –
आह को चाहीये, एक उम्र असर होने तक
कौन जीना चाहता है, तेरी जुल्फ के सर होने तक ।
याचा शब्दशः अर्थ असा – ‘प्रिय व्यक्तीच्या हृदयापर्यंत माझ्या संवेदना पोहोचायला पूर्ण आयुष्य लागेल. कोण किती जगणार हे कुणालाच माहीत नाही.. तुला तर तुझे केस सावरायलाच इतका वेळ लागतो..
मनमोहन सिंग हे “सरदार” असल्याने त्यांचे केस लांब होते. हा शेर आपल्यावर असल्याचा व आपल्या लांब केसांवर टिप्पणी केली गेली असल्याचा त्यांचा समज झाला.
एकतर बजेट सारखा गहन विषय, मनमोहन सिंग हे म्हणजे एक धीरगंभीर व्यक्तिमत्त्व ! सगळं संसद असं लांब चेहऱ्याने बसलेलं बघून वाजपेयींनी हा हलकाफुलका विनोद केला होता..… परंतु त्यांचा हा विनोद मनमोहनसिंग यांना काही रुचला नाही. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडे त्यांनी वाजपेयींची तक्रार केली आणि आपला राजीनामा द्यायची तयारी त्यांनी केली. हे वाजपेयीना समजताच ते स्वतः त्यांना भेटले. त्यांची समजूत काढली !
मनमोहनसिंग यांच्या बुद्धिमत्तेबद्दल वाजपेयी यांना नितांत आदर होता. मनमोहनसिंग यांची नाराजी दूर झाली. एवढंच नव्हे तर ते वाजपेयी यांचे चांगले मित्र बनले ! वाजपेयींच्या अखेरच्या दिवसांत त्यांना नियमित भेटायला येणाऱ्यांपैकी ते एक होते !
विरोधी पक्षाच्या केवळ धोरणांवर आक्षेप असणाऱ्या या निर्मळ माणसाच्या मनात कुणाही बद्दल व्यक्तिगत राग, आकस कधीच नव्हता….. म्हणूनच त्यांच्यावर टीका करणारेही त्यांचा आदर करत, त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करत…

२००६ मध्ये उत्तर प्रदेश मधील लखनौ येथे प्रचार सभेत बोलताना ते अचानक म्हणाले, “मित्रांनो, मी जर फक्त सदरा घातला आणि पायजमा नाही घातला तर मी कसा दिसेन ?” अचानक आलेल्या या गुगलीने सर्वच गोंधळले. वाजपेयींच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. गर्दीतून एक आवाज आला “वाईट दिसाल !”
त्यावर वाजपेयी म्हणाले “अगदी बरोबर ! लखनौच्या संसदेची निवडणूक मला जिंकवून देऊन तुम्ही मला एक सदरा बहाल केला आहे, आता नगर निगम मेयरची निवडणूकही अशीच जिंकवून देऊन पायजमा बहाल करा !”
टाळ्यांच्या गजरात, हास्यकल्लोळात ह्या माणसाने प्रचंड मतं खिशात टाकली हे वेगळं सांगायला नको ! त्यावेळी वाजपेयींना बराच ताप होता तरीही त्यांनी ठरल्याप्रमाणे सभा घेतली, ती यशस्वीही करून दाखवली !
अर्थात नुसत्या विनोदाने लोक कुणाचे होत नसतात.. त्यासाठी नेत्याचं स्वच्छ आचरण, कामाप्रति निष्ठा, कामातील पारदर्शकता, प्रामाणिकपणा… अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ज्यांचा सुंदर संगम वाजपेयींमध्ये होता.
ते अविवाहित होते आणि त्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला “आपण लग्न का नाही केलंत ?” ते म्हणाले ‘आदर्श पत्नीच्या शोधात होतो.’ दुसरा प्रश्न आला “मग; मिळाली नाही ? ” आपल्या खास ढंगात ते मिश्कीलपणे म्हणाले, “मिळाली होती; परंतु तिलाही आदर्श पतीची वाट असावी.”
प्रश्न अश्याप्रकारे परतवून लावण्यात, त्वरित उत्तर देण्यात त्यांचा हातखंडा होता. आपल्या कारकिर्दीत या देशासाठी अनेक लाभदायक गोष्टी त्यांनी केल्या. सत्तेवर नसतानाही त्यांनी पक्षासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. परंतु नंतर म्हातारपणामुळे, तब्येतीच्या तक्रारींमुळे त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. याचा उलटा अर्थ काढून अशा वयस्कर नेत्यांना अपमानास्पद प्रश्न विचारणारे काही कमी नव्हते.
“तुम्हाला तुमच्या पक्षात मार्जिनलाईज्ड केलं गेलं आहे, हे खरंय का ?” विचारणाऱ्यांना ते म्हणाले, “करेक्शन्स करण्यासाठी मार्जिनची गरज पडतेच ना…. मी तेच करतोय असं समजा”

१९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून देणारा हा चतुर रणनीतिकार, पोखरण अणूचाचणी करून भारताची ‘एक सशक्त देश’ म्हणून जगाला ओळख करून देणारा भारताचा हा सक्षम पंतप्रधान, आपल्या तरल-हृदयस्पर्शी शब्दांनी सुंदर कविता रचणारा हा हळवा कवी श्री. अटलबिहारी वाजपेयी ! जवळपास १४ वर्षे ते आजारी होते. श्री लालकृष्ण अडवाणी ह्यांच्यासारख्या आपल्या घनिष्ठ मित्रांवर, आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांवर पक्षाची धुरा सोपवून त्यांनी १६ ऑगस्ट २०१८ ला शेवटचा श्वास घेतला.
प्यार इतना परायोसे मुझको मिला
न अपनोंसे बाकी है कोई गिला ।
पायातल्या वहाणा काढून त्यांना नमस्कार करायला उसळलेली गर्दी त्यांच्या अफाट लोकप्रियतेची साक्ष देते !!