अझीम प्रेमजींच्या वडिलांना पाकिस्तानचे वित्तमंत्री होण्याची ऑफर मिळालेली
अझीम प्रेमजी यांचे वडिल हाशिमजींना ‘राईस किंग ऑफ बर्मा’ म्हणून तर अझीमजींना ‘भारतीय आयटी इंडस्ट्रीजचा सम्राट’ म्हणून ओळखल्या जाते..
अझीम प्रेमजी ! हे नावच इतकं उत्तुंग आहे की त्याची उंची गाठण्याचं सामर्थ्य सामान्य माणसात नाही. व्हेजिटेबल व रिफाईंड ऑइल, बेकरी, हेअर केयर, बेबी टॉयलेटरी, लायटिंग ह्या क्षेत्रांतून IT (Information Technology) सारख्या विस्तारलेल्या क्षेत्रात जम बसवणं म्हणजे पोरखेळ नक्कीच नाही. तर अश्या ह्या प्रख्यात उद्योगपती-अझीम प्रेमजी यांची झेप काही औरच आहे.
तांदळाच्या व्यवसायातून वनस्पती तूप बनवण्याच्या उद्योगाला अझीम प्रेमजी यांचे वडील हाशिम प्रेमजींनी सुरुवात केली. कुठलाही व्यवसाय करायचा तर काही ठळक गुण अंगीकारावे लागतातच. भरपूर मेहनत, चिकाटी, जिद्द, संयम ह्याच बरोबर व्यावसायिक कौशल्य, गुणी माणसे पाराखण्याची दृष्टी, धडाडी व जोखीम पत्करण्याची तयारी अशी वैशिष्ट्ये असणं अत्यंत महत्वाचं असतं. वडिलांमधील या गोष्टी अझीमजींमध्ये पुरेपूर उतरल्या.
विदेशात सुरू असलेलं शिक्षण वडिलांच्या अकस्मात झालेल्या निधनामुळे अर्धवट सोडून Azim Premji यांना भारतात परतावं लागलं. त्यावेळी अझीमजींचं वय होतं केवळ २१ वर्ष! वडिलांचा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी आली. अनुभवहीन अशा ह्या तरुणाचं हसं होतं की काय असं वाटत असताना ह्या नवशिक्याने मनाचा पक्का निर्धार केला आणि अझीमजींची वाटचाल सुरू झाली.
तेल, साबण बनवण्याच्या ह्या वंशपरंपरागत व्यवसायाला नवे आयाम देत असताना अझीमजींनी अनेक कल्पक व धाडसी निर्णय घेतले. एक व्यवसाय हा दुसऱ्या व्यवसायापेक्षा भिन्न असतो, त्याची गणितं, गुपितं, नियम संपूर्णतः वेगवेगळे असतात. परंतु हरहुन्नरी अश्या ह्या गड्याने ही जोखीम पत्करली. निरनिराळ्या व्यवसायांत पाय रोवायला सुरुवात केली.
विविध कारखाने उभारून हे नवीन व्यवसायही वृद्धिंगत केले. दिग्गज कंपन्यांबरोबर टक्कर देत आयटी क्षेत्रातही उडी घेतली. नोकिया, सिस्को, नॉर्टेल अश्या जागतिक स्तरावर नावाजलेल्या कंपन्यांबरोबर हातमिळवणी करत स्वतःलाही तंत्रक्षम बनवलं. जगाबरोबर बदलत राहणं, स्वतःला प्रगत ठेवणं ही काळाची गरज आहे हे या धोरणी माणसानं ओळखलं होतं.
असं म्हणतात- तुमच्याकडे किती संपत्ती, किती मनुष्यबळ, किती तंत्रज्ञान आहे ह्यापेक्षाही तुमची नीती, तुमची मूल्ये, प्रामाणिकपणा, सचोटी या गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात !
अझीमजी आजही विमानाच्या इकॉनॉमि क्लासने प्रवास करतात. वेळ आलीच तर ऑटोने कुठे जायलाही मागेपुढे पाहत नाहीत. कामानिमित्त बाहेरगावी राहावं लागतं तेव्हा कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये राहणे ते पसंत करतात. ‘अझीम’चा अर्थच आहे – मोठं! भव्य! ह्या माणसाच्या विचारांची उंचीही अशीच प्रगल्भ आहे.
हाताखाली असणाऱ्या लाखो कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देऊन त्यांना समाधानी ठेवण्याचं कसबही Azim Premji यांच्याजवळ आहे. वडिलांनी उभारलेल्या वेस्टर्न इंडिया प्रोडक्टस (Western India Products) ह्या कंपनीचं त्यांनी ‘WIPRO’ असं नामकरण करून त्यांनी अनेक नवनवीन ब्रँड्स बाजारात आणले; त्यांना त्यांचं स्थान मिळवून दिलं. संतूर, विप्रो बेबीसोप, विप्रो शिकेकाई साबण, सनफ्लॉवर वनस्पती, यार्डले… अशी किती नावं सांगावीत!
त्यांच्या वडिलांना हाशिमजींना ‘राईस किंग ऑफ बर्मा’ म्हणून तर अझीमजींना ‘भारतीय आयटी इंडस्ट्रीजचा सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणं हा योग केवळ दुर्मिळ!!
पाकिस्तानचे वित्तमंत्री बनण्याची मिळालेली ऑफर
१९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळी मोहम्मद अली जिन्ना यांना हाशिम प्रेमजींसारखे प्रतिष्ठित, सुशिक्षित मुसलमान हवे होते. जिन्ना आणि हाशिम प्रेमजी यांचे चांगले संबंध होते आणि म्हणूनच त्यांनी प्रेमजींना आपल्यासोबत पाकिस्तानला नेण्याचा आग्रह केला. एवढेच नव्हे तर ‘पाकिस्तानचे वित्तमंत्री’ होण्यासाठी जिन्ना यांनी हाशिमजींना ऑफर दिली होती.
परंतु भारताला आपला देश मानणाऱ्या ह्या बहाद्दराने ते सपशेल नाकारून इथल्या मातीतच, इथल्या माणसांतच राहणं पसंत केलं ! इथल्या लोकांविषयीची त्यांची ही माया अझीमजींमध्येही पूर्णपणे उतरली आहे. आपल्या अमाप संपत्तीतला बराचसा वाटा अझीम प्रेमजी सामाजिक कार्यासाठी देतात.
Azim Premji Foundation द्वारे अनेक एनजीओंना सामाजिक कार्यासाठी लागणारा फंड पुरवण्यात येतो. कोरोनाच्या काळात प्रेमजी आणि त्यांची कंपनीने सरकारला ११२५ कोटी रुपयांची मदत केली.
केवळ देशातीलच नव्हे तर जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना होणाऱ्या अझीम प्रेमजींना अनेक पुरस्कार, प्रमाणपत्रं, मान्यतापत्रं मिळाली आहेत. काही कोटींच्या वार्षिक उत्पन्नावरून अनेक अब्ज डॉलर्सच्या उलढालींवर Wipro ला नेण्यात ह्या माणसाचं कसब तर आहेच; पण त्याचबरोबर आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या जुन्या व्यवसायाला दुर्लक्षित न करता त्यालाही काळानुरूप बदलून एका उंचीवर नेण्यात त्यांची हुशारी दिसून येते.
आज त्यांनी विप्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदा वरून निवृत्ती घेतली असली तरी कंपनीच्या संचालक व संस्थापक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. विप्रोची धुरा वाहणाऱ्या त्यांच्या मुलाला – रिशदला अझीमजींचं मोलाचं, बहुगुणी मार्गदर्शन लाभत असणार यात शंका नाही.
२४ जुलै – हा अझीमजींचा जन्मदिवस! त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो व देशाचं नाव जगात कोरणाऱ्या विप्रोचीही अशीच भरभराट होवो ही प्रार्थना करूया !!