कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानच्या संसदेत सचिन आऊट झाल्याची घोषणा करण्यात आलेली
दोन प्रेक्षकांना स्टेडियम मधून बाहेर काढण्यात आलं कारण त्यांनी प्ले कार्ड वरती लिहिले होतं, ‘वर्ल्ड कप आणि कारगिल – दोन्ही आमचंच आहे’
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात फक्त क्रिकेटच नसतं तर दोन्ही देशाच्या नागरिकांच्या भावना देखील त्या सामन्यामध्ये गुंतलेल्या असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यांचे अनेक रोमहर्षक किस्से आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतील, परंतु जेव्हा पाकिस्तानच्या भर संसदेत “सचिन तेंडुलकर आऊट झाला” अशी घोषणा जाते तेव्हा काय परिस्थिती असेल याचा फक्त विचारंच केलेला बरा. चला तर मग जाणून घेऊयात या रोमहर्षक सामन्याबद्दल…
1999 मध्ये वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यांना आठवत असेल त्यांना हे देखील माहिती आहे की याच वर्षी भारत आणि पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध देखील चालू होतं. 1983 नंतर भारत वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत होता, पण वर्ल्ड कप काही केल्या भारताकडे येत नव्हता. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा वर्ल्ड कप मध्ये उतरला होता. त्या वर्षी पहिल्यांदाच ग्रुप तयार करण्यात आले होते आणि या ग्रुप मधून जो संघ सुपर सिक्स मध्ये येईल त्यांच्यात वर्ल्डकपसाठी चुरस निर्माण होणार होती.
या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सुपर सिक्स मध्ये पोहोचला आणि त्यांचा सामना पाकिस्तान सोबत होणार होता पण लक्षात घ्या त्यावेळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान कारगिलचं युद्ध सुरू होतं. पहिल्यांदाच युद्धादरम्यान हा सामना खेळण्यात येणार होता. 8 जून 1999 ला मँचेस्टर मध्ये हा सामना खेळला गेलेला. मग अशा परिस्थितीत दोन्ही देशांकडील नागरिक किती लक्ष देऊन या सामन्याकडे पाहत असतील याचा अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल. दोन प्रेक्षकांना स्टेडियम मधून बाहेर काढण्यात आलं कारण त्यांनी प्ले कार्ड वरती लिहिले होतं, ‘वर्ल्ड कप आणि कारगिल – दोन्ही आमचंच आहे’
असं सांगितलं जातं की सामन्यात तब्येतीचं कारण देऊन सौरव गांगुली खेळला नाही. वर्ल्डकप मध्ये सौरव गांगुली फॉर्ममध्ये होता, त्याने सहा मॅचमध्ये साडेतीनशे धावा काढल्या होत्या. पाकिस्तानी मिडियाने तर असं देखील जाहीर केलं की,” शोएब अख्तरच्या गोलंदाजीला घाबरून गांगुलीने मॅच खेळलीच नाही” गांगुलीच्या जागेवर सदगोप्पन रमेशला ओपनिंग करण्याची संधी देण्यात आली.
टॉस जिंकून मोहम्मद अजहरुद्दिनने फलंदाजी करायचा निर्णय घेतला. वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा सचिन-सौरव या जोडीने ओपनिंग केली नव्हती. सचिन आणि रमेशने चांगली सुरवात करत अकरा ओव्हरमध्ये 37 धावांची भागिदारी केली परंतु काहीच वेळात रमेश क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर राहुल द्रविड मैदानात आला. संपूर्ण वर्ल्डकप मध्ये राहुल द्रविडने भारतीय संघासाठी सर्वात जास्त रण काढले होते. द्रविडने सचिन सोबत 50 धावांची पार्टनरशिप केली.
सचिन तेंडुलकर त्यावेळी पाकिस्तानसाठी कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जात होता. याआधी देखील अनेक सामन्यांमध्ये त्याने आपली योग्यता सिद्ध केली होती. सचिनला पाकिस्तानी गोलंदाज काय परंतु पाकिस्तानी जनतादेखील प्रचंड घाबरत असे. त्यामुळेच जेव्हा सचिन 45 वर होता तेव्हा अजहरच्या एका बॉलवर तो कॅच आउट झाला.
जेव्हा सचिन आऊट झाला तेव्हा पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंद पसरला, एवढेच नव्हे तर पाकिस्तानच्या सूचना मंत्र्यांनी (माहिती व प्रसारण मंत्रालय) भर संसदेत उठून मोठ्या जोशाने सांगितलं,
“सचिन तेंडुलकर आऊट झाला आहे”
मित्रांनो यावरून तुमच्या लक्षात येईल की पाकिस्तानी जनता सचिन तेंडुलकरला किती घाबरत असेल. मंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर संपूर्ण संसदेमध्ये आनंदाची लाट पसरली जणू काही युद्ध जिंकले आहे अशा प्रकारचा आनंद तिथे साजरा करण्यात आला.
Sachin Tendulkar आऊट झाल्यानंतर द्रविड आणि मोहम्मद अजहरुद्दिन यांनी चांगला खेळ करत भारताला 227 धावांपर्यंत येऊन पोचवलं. वसीम अक्रम आणि अजहर महमूद या दोघांनीही चांगली गोलंदाजी केली आणि भारताचं चांगलंच नुकसान केलं. पाकिस्तानी क्रिकेट संघ जेव्हा धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलो तेव्हा व्यंकटेश प्रसाद, जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांनी आपल्या गोलंदाजीचा करिष्मा दाखवत पाकिस्तानच्या फलंदाजांना हात खोलण्याची संधीच दिली नाही. पाकिस्तानचे अनेक दिग्गज खेळाडू खूप कमी धावा काढत वापस गेले.
याच सामन्यात वेंकटेश प्रसादने चक्क 5 विकेट घेतल्या, त्याच्या संपूर्ण करियर मधील एकाच सामन्यात घेतलेल्या ह्या सर्वात जास्त विकेट आहेत. अनिल कुंबळेने 2 आणि श्रीनाथ यांनी देखील 3 विकेट घेत संपूर्ण पाकिस्तानी संघ तंबूत परत पाठवला.
या गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 180 धावांमध्ये ढेपाळला आणि भारताने 47 धावांनी तो सामना आपल्या खिशात घातला. पुढे भारत देखील या वर्ल्ड कप मधून बाहेर पडला परंतु ते म्हणतात ना की,
“भारताने वर्ल्डकप नाही जिंकला तरी चालेल पण पाकिस्तान सोबत हरलं नाही पाहिजे.”