दिल्लीत उद्भवलेलं गंभीर संकट सोडवण्यासाठी हायकमांडने सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्रीपदी बसवलेलं
वाघिणीसारखा आवाज अशी ज्यांची ओळख, विचारांमध्ये ज्यांच्या तारुण्य आणि मनात दृढनिश्चयी स्वभाव अशा सुषमा स्वराज यांचा आज प्रथम स्मृतिदिन.
भारतीय राजकारणाचा असा गोड व तेजस्वी चेहरा की, विरोधकही ज्यांचे कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. ज्यांच्या अचूक निर्णयक्षमतेची उदाहरणे संपूर्ण जगाने अनुभवलेली आहेत. मग ते त्यांच्या आजारपणातही सतत ट्विट करून आपली प्रकृती बरी असल्याच्या बातम्या कळवणे असो अथवा अडचणीत असलेल्या व्यक्तींच्या विनंतीवर त्वरित कारवाई करण्याबाबत असो.
प्रत्येक प्रसंगात योग्य निर्णय घेऊन त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. मग त्यात संसदेत पाकिस्तानला उत्तर देण्यापासून ते आपल्या मंत्रालयाच्या धोरणांचे स्पष्टीकरण देण्यापर्यंतच्या कामगिरीतून सुषमा स्वराज यांनी देशासह जगाची मने जिंकलेली आहेत.आज आपण त्यांच्याबद्दल काही किस्से जाणून घेऊयात जे सुषमा स्वराज यांच्या जीवनाच्या विविध छटा आपल्या डोळ्यांसमोर मांडतील.
इच्छा नसतानाही सुषमा स्वराज यांना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलेलं
पहिला किस्सा असा आहे की जेव्हा इच्छा नसतानाही त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली होती. जेव्हा त्यांना हे पद मिळाले होते तेव्हा त्या केंद्र सरकारच्या मंत्री होत्या. पण भाजपच्या हाय कमांडच्या आदेशामुळे त्यांना दिल्लीची गादी सांभाळावी लागली. पण इच्छा नसतानाही असे का ? तर यामागे एक अतिशय रंजक कथा आहे.

सन १९८८ मध्ये, जेव्हा अटलबिहारी वाजपेयी केंद्रात सत्तेत होते, तेव्हा साहिबसिंग वर्मा दिल्लीची सत्ता सांभाळत होते. त्या काळात संपूर्ण दिल्लीत कांद्याच्या तुटवड्याचे गंभीर संकट उद्भवले आणि कॉंग्रेसने संपूर्ण दिल्लीमध्ये या मुद्द्याला धरून आंदोलन केले. अशी परिस्थिती होती की, ज्यावेळी चित्रपट अभिनेता आणि खासदार सुनील दत्त यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून कॉंग्रेससोबत आंदोलन केले होते आणि याच काळात Sushma Swaraj यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली.
दिल्लीचे राजकारण जवळून पाहणाऱ्या राजकीय विश्लेषकांनी मत मांडले की, सुषमा स्वराज यांना या पदामध्ये फारसा रस नाही. कारण एक तर त्या केंद्रात मंत्री होत्या तर दुसरे कारण म्हणजे भाजप साहिबसिंग वर्मा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री बनवलं होता.
भाजपच्या एका मोठ्या गटात अशी चर्चा होती की, साहिबसिंग यांना हटवावे जेणेकरून एका दगडाने दोन शिकार करत सुषमा स्वराज यांना दिल्लीच्या राजकारणापर्यंतच मर्यादित ठेवता येईल.
परंतु जेव्हा त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले तेव्हा दिल्ली बाहेरील भागात साहिबसिंग यांना हटवण्यावरून बराच विरोध झाला. सुरुवातीला सुषमा स्वराज शांत राहिल्या पण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम साहिबसिंग यांच्या घरी जाऊन त्यांना सामंजस्याने समजावले. त्यानंतर साहिबसिंग दिल्लीचे मुख्यमंत्री झाले नाहीत मात्र ते केंद्रात मंत्री झाले.
Sushma Swaraj यांनी दिनांक १३ ऑक्टोबर १९९८ रोजी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. खरंतरं, तो उत्सवाचा हंगाम होता अन तेव्हाच राजधानी दिल्लीमध्ये मिठाच्या तुटवड्याच्या अफवा उठल्या. आधीच लोकांनी कांद्याच्या तुटवड्याचे संकट सहन केल्याने लोकांनी मीठ साठवण्यास सुरवात केली. ही अफवा सुषमा यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्वरित अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी सरकारी यंत्रणांना सतर्क केले.

अधिकाऱ्यांसमवेत सरकारी स्टोर्सना भेट देऊन छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यांनी तातडीने लोकांना सांगितले की राजधानीत मिठाचा तुटवडा नाही आणि राज्यात सरकारकडे पुरेसे मीठ उपलब्ध आहे. यानंतर, लोकांच्या जीवात जीव आला आणि तेव्हा हातात मीठ घेऊन वर्तमानपत्रांत छापलेले सुषमा यांचा फोटो त्या काळात चांगलाच प्रसिद्ध झाला होता.
मध्यरात्री दिल्लीतील पोलिस स्टेशनला दिलेली सरप्राईज व्हिजिट
एकदा सुषमा स्वराज यांनी अचानक तपासणीसाठी (सरप्राईज व्हिजिट) रात्री उशिरा दक्षिण दिल्लीतील पोलिस स्टेशन गाठले व विचारले एसएचओ सर कुठे आहेत ? पोलिस स्टेशनमध्ये हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावण्याचे आदेश दिले. वास्तविक एसएचओ साहेब पोलिस ठाण्यात झोपले होते.
सुमारे दीड तासानंतर ते सुषमा (Sushma Swaraj) यांच्यासमोर आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कठोरपणे फटकारले. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली विधानसभेत पत्रकार परिषद बोलावली आणि पोलिस स्टेशन्स कसे कार्यरत आहेत याची माहिती दिली. पोलिस स्टेशनने त्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने त्या अस्वस्थ झाल्या होत्या.
दिल्ली केंद्रशासित प्रदेश असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत आपण असहाय्य असल्याचे त्यांनी मान्य केले होते.
पण त्यासोबतच त्यांनी लोकांना आश्वासन दिले होते की दिल्लीतील लोकांनी शांतपणे झोपावे, त्यांच्यासाठी त्या रात्रभर जागरण करतील.
त्याच वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. सुषमा स्वराज यांनी हौजखास विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकली. पण दिल्लीत कॉंग्रेसला बहुमत मिळाले होते. शीला दीक्षित मुख्यमंत्री झाल्या. काही दिवसांनंतर सुषमा राजीनामा देऊन मध्यवर्ती राजकारणात परतल्या. हौजखास मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि या ठिकाणी कॉंग्रेसचे प्रा. किरण वालिया विजयी झाल्या. त्यांनी शीला दीक्षित यांच्या मंत्रिमंडळातही अनेक वर्षे काम केले.

पुढे मोदी सरकार निवडून आल्यानंतर सुषमा यांना त्यांच्या मंत्री मंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी त्या संधीचे सोने केले. एवढेच नव्हे तर लोकांच्या हृदयात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यातही त्या यशस्वी झाल्या. इन्फोबझ्झ कडून सुषमा स्वराज याना भावपूर्ण आदरांजली.