आपल्या भक्तीगीतांनी संपूर्ण देशाला मोहित करणाऱ्या गुलशन कुमारांना भर दिवसा संपवण्यात आलेलं
ज्यूसचं दुकान चालवणारा म्युझिक इंडस्ट्रीचा King कसा झाला ?
बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत अनेक संगीतकार आणि गीतकार यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. यामध्ये अनेक नावं घेता येऊ शकतात परंतु एका संगीतकाराने मात्र छोटीशी सुरुवात करून टी-सीरीज सारख्या मोठ्या साम्राज्याची निर्मिती केली. होय आपण प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांच्या बाबत माहिती जाणून घेणार आहोत…..
टि सीरीजच्या युट्युब चॅनल वर सध्याच्या परिस्थितीत जवळपास 13 करोड पेक्षाही जास्त सबस्क्राईबर आहेत ही संख्या कुठल्याही कंपनीसाठी दैदीप्यमान गोष्ट आहे. अगदी सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या गुलशन कुमार यांनी या कंपनीची सुरुवात केलेली. एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या या व्यक्तीने आपल्या आयुष्यात मात्र प्रचंड संघर्ष पाहिलेला आहे.
दिल्लीतील दरिया गंज भागात गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांचं छोटसं ज्युसचं दुकान होतं. गाण्याची आवड त्यांना सुरुवातीपासूनच होती पण 1980 ला जेव्हा त्यांच्या वडिलांनी कॅसेट रिपेरिंग आणि रेकॉर्डिंगचं दुकान सुरू केलं तेव्हा त्यांच्या ह्या आवडीला प्रोत्साहन मिळत गेलं. पुढे ज्युस पेक्षा ते कैसेटच्या दुकानात जास्त वेळ व्यतीत करू लागले. अगदी सुरुवातीला Gulshan Kumar काही साध्या गायकांकडून भक्ती गीत गाऊन घेत आणि अत्यंत कमी किमतीत त्यांची भक्तीगीत विकत असत, पण व्यवसाय वाढवायच्या दृष्टीने त्यांनी चित्रपटाला संगीत द्यायला सुरुवात केली.
त्याकाळात भारतीय बाजारांमध्ये एचएमव्ही म्हणजेच आताची सारेगामा या कंपनीची एकाधिकारशाही होती कारण हीच कंपनी चित्रपटांना संगीत देत असे आणि त्यामुळे त्यांच्याकडे कॉपीराईट होते. परिणामी या एकाच कंपनीकडे सर्व गीतांचे कॉपीराइट असत, या एका कारणामुळे संपूर्ण बाजाराला याच कंपनीकडून ते सांगतील त्या दराने कॅसेट विकत घ्यावी लागत असे. परंतु 1990 च्या काळात रेकॉर्ड कॅसेटची मागणी प्रचंड वाढली आणि एक कंपनी ही मागणी पूर्ण करू शकत नव्हती.
अशा परिस्थितीत गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांनी या कॉपराईट ऍक्टचा बारीकाईने अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की कॉपीराइटमुळे आपण हा कार्यक्रम रेकॉर्ड करू शकत नाही, परंतु आपण त्या कार्यक्रमाची नक्कल नक्कीच करू शकतो. याचाच अर्थ असा की जर एखाद्या गायकाचं गीत HMV या कंपनीकडे कॉपीराइट आहे तर ते गीत गुलशन कुमार वापरू शकत नव्हते पण जर तेच गीत दुसऱ्या गायकाने गायलं तर गुलशन कुमार ते गीत अत्यंत सहजरित्या बाजारात वापरू शकत होते. ते म्हणतात ना की “नक्कल करण्यासाठी देखील अक्कल असणं गरजेचं असतं.”
त्या काळात लता मंगेशकर यांची गाणी प्रचंड प्रमाणात चालत होती. पण लता मंगेशकर यांच्या गीताची कॅसेट एवढ्या महाग असत की सर्वसामान्यांना परवडत नसे. गुलशन कुमार यांनी T-Series च्या प्लॅटफॉर्म खाली लता मंगेशकर यांच्या सारखा आवाज असणाऱ्या गायिकाकडून त्यांची इतर गाणी रेकॉर्ड करून घेतली आणि ह्या गाण्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळाला.
जेव्हा मोठ्या बदलाला सुरुवात होते तेव्हा प्रस्थापित असा काही बदल घडू शकत नाही अशी भूमिका घेतात आणि नेमकी ही चूक एचएमव्ही या कंपनीने केली. कंपनीला असं वाटत असे कि हा उद्योग फार काळ टिकू शकणार नाही आणि जेव्हा हा धोका एचएमव्ही कंपनीला जाणवू लागला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. टि सीरीजने संपूर्ण भारतात आपले पाय पसरले होते. सामान्यांपर्यंत संगीत पोहोचवल्यामुळे T-Series संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली.
ओरिजनल गाण्यापेक्षा डुप्लिकेट गाण्याची कॅसेट जास्त प्रमाणात विकली जाऊ लागली. टी सिरीज सोबत या काळात अनुराधा पौडवाल, कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम, विपिन सचदेव अशी एक फौज उभी राहिली होती. ही लोकं रोज गुलशन कुमार यांची नक्कीच आठवण काढत असतील कारण आज जरी ही मंडळी स्टार असली तरी गुलशन कुमार यांनीच सुरुवातीला यांच्यावरती विश्वास दाखवून यांना गाण्याची संधी प्राप्त करून दिली.
गुलशन कुमार हे नाव आता सगळीकडे घेतलं जाऊ लागलं. परंतु अजून देखील त्यांना खूप अंतर गाठायचं होतं. काही दिवसांनी प्रचंड विचार करून त्यांनी एच एम व्ही, टिप्स, विनस यासारख्या कंपन्यांच्या आधीच ते कॉपीराइट विकत घेत असत ज्यामुळे या कंपन्यांचा अर्धा व्यवसाय ठप्प झाला. या काळात Gulshan Kumar यांनी संपूर्ण भारतभर आपली एकाधिकारशाही प्रस्थापित केली व 65% भारतीय बाजारावर त्यांचा कब्जा निर्माण झाला.
गुलशन कुमार एवढं करूनच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती देखील सुरू केली. लाल दुपट्टा मलमल का, आशिकी आणि दिल है कि मानता नही या चित्रपटांमुळे तर गुलशन कुमार भारताच्या कानाकोपऱ्यात पोचले.
1990 च्या काळात गुलशन कुमार यांनी तयार केलेली नदीम-श्रवण ह्या संगीत दिग्दर्शकांची जोडी सुपरहिट ठरली. परंतु पुढे काही प्रयोग फसत गेले आणि यामुळे नदीम, गुलशन कुमार यांच्यावर नाराज होता. गुलशन कुमार नेहमीच नवीन कलाकारांना आणि गायकांना संधी देत असत. त्यांच्या याच वागण्यामुळे पुढे नदीम यांचा मोठा गैरसमज झाला. या गैरसमजातूनचं त्याने घाबरून डॉन अबू सालेमशी संपर्क केला आणि Gulshan Kumar यांच्या मार्फत स्वतःला प्रमोट करायची मागणी केली
अबू सालेमने गुलशन कुमार यांच्याकडे खंडणीची मागणी केली. सुरुवातीला काही पैसे दिल्यानंतर देखील अबू सालेमने त्यांच्याकडे पैशाची मागणी सुरूच ठेवली आणि मग शेवटी वैतागुन गुलशन कुमार यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याच गोष्टीवर नाराज होत Abu Salem याने गुलशन कुमार यांना दिवसाढवळ्या संपवले. या प्रकरणात नदीम आणि टिप्स कंपनीचे मालक रमेश तुरानी यांच्यावर देखील आरोप केले जातात. नदीम (Nadeem Saifi) या प्रकरणामुळे इंग्लंडमध्ये गेला आणि तेथील नागरिकता स्वीकारून तिथेच लपून बसला. भारताने अनेक वेळा नदीमची मागणी इंग्लंडकडे केली परंतु पुरावे नसल्यामुळे इंग्लंडने त्याला प्रत्येक वेळी नकार दिला.
ज्याने गोळी चालवली तो व्यक्ती सोडून आजपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही. काही जण असं देखील म्हणतात की गुलशन कुमार नेहमीच भक्तीगीत रेकॉर्ड करून भारतीय बाजारामध्ये आणत असत आणि त्याकाळात गुलशन कुमार यांच्या भक्तिगीताने संपूर्ण भारत मोहित करून टाकला होता. गुलशन कुमार यांच्या याच छबी मुळे त्यांना संपवण्यात आल्याचे देखील अनेक वेळेस बोलले जाते, परंतु यामागील सत्य परिस्थिती काय आहे हे आज देखील समोर आलेलं नाही.
गुलशन कुमार यांच्या जीवनावर सिनेमा येणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच घोषित करण्यात आले आहे. सुरवातीला अक्षय कुमार गुलशन यांचा रोल करणार होता परंतु काही कारणांमुळे त्याने हा चित्रपट सोडला. अक्षयच्या ऐवजी आता आमिर खान ह्या चित्रपटात गुलशन कुमार यांचे पात्र साकारणार असून ह्या सिनेमाचं नाव मोगूल (Mogul) असणार आहे.
हे हि वाचा –