पावसाळ्यात पाणी पिताना अशी घ्या काळजी
दूषित पाण्यातून विशेषतः पावसाळ्यात अनेक आजार पसरतात. पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ, डायरिया,गॅस्ट्रो, कॉलरा असे आजार उद्भवतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी स्वच्छ व निर्जंतुक असणे गरजेचे आहे. जेथे २४ तास पाणी उपलब्ध नसते त्यांना तर हे उपाय जास्त फायदेशीर ठरतात. तेव्हा घरच्या घरी पाणी स्वच्छ करण्याच्या InfoBuzz च्या काही खास पद्धती…
१. पाणी गाळून घेणे
वॉटर प्युरीफायरमध्ये पाणी गाळले जाते. त्याचप्रमाणे स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीची गाळणी यांनी पाणी गाळून घेतल्यास ते स्वच्छ होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या पद्धतीचा हमखास वापर करावा. मी चागंल्या सोसायटीमध्ये राहतो त्यामुळे आमच्याकडे चांगले पाणी येते असे वाटत असले तरीही पाणी कायम गाळून मगच प्यावे.
२. उकळणे
उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेले पाणी प्यावे. पाण्याला उकळी फुटल्यानंतर पाणी १०-१५ मिनिटे उकळावे. नंतरच गॅस बंद करावा. पाणी पुरेसे उकळणे गरजेचे आहे.
३. तुरटी फिरवणे
तुरटी फिरवून पाणी शुद्ध करणे ही अतिशय पारंपरिक पद्धत आहे. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होते. मात्र तुरटी फिरवली असली तरीही हा पाणी स्वच्छ करण्याचा म्हणावा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने हे पाणी गाळून आणि उकळूनच प्यावे.
४. नळाला फडके किंवा फिल्टर बसविणे
पावसाळ्याच्या दिवसात नळाला काहीसे मातकट आणि अशुद्ध पाणी येते. त्यामुळे हे पाणी भरतानाच काही प्रमाणात स्वच्छ व्हावे यासाठी नळाला कापड बांधावे किंवा गाळणे लावावे. याशिवाय हल्ली बाजारात नळाला लावण्यात येणारी वेगवेगळी फिल्टर्स उपलब्ध असतात. त्यांचा वापरही फायदेशीर ठरु शकतो. यामुळे पाण्यातील सौम्य प्रकारच्या जंतूंचा धोका कमी होण्यास मदत होते.