विश्वास नांगरे पाटील यांची प्रेमकहाणी
पोलिस अधिकार्याचे आयुष्य हे अनेक आव्हानांनी भरलेले असते. अत्यंत मेहनत करून यूपीएससीची परीक्षा पास होणे म्हणजे साधे काम नाही. त्यातही अनेक पोलीस अधिकारी आयएएसची जागा उपलब्ध असतानाही केवळ वर्दीवर असलेल्या प्रेमापोटी पोलीस प्रशासनाची जबाबदारी स्वीकारतात. महाराष्ट्राला कर्तुत्ववान पोलीस अधिकाऱ्यांची देणगी लाभलेली आहे, त्यातीलच एक नाव म्हणजे विश्वास नांगरे पाटील (IPS Vishwas Nangare Patil). महाराष्ट्रातील प्रत्येकाला परिचित असणारे हे नाव.
धुळ्यात कुशलतेने हाताळलेल्या 3 जातीय दंगली, सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या हायप्रोफाइल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश आणि मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यावेळी त्यांनी पार पडलेली जबाबदारी या कामगिरीमुळे विश्वास नांगरे पाटील नेहमी चर्चेत राहणारे पोलीस अधिकारी आहेत. पण एवढ्या नावाजलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा कुठेतरी हळवा कोपरा नक्कीच असेल ना ? आज आपण त्यांच्या याच हळव्या कोपर्याबद्दल म्हणजेच कुटुंबाबद्दल जाणून घेणार आहोत.
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील कोकरूड गावचे सुपुत्र असलेले विश्वास नांगरे पाटील हे एक धडाकेबाज, अभ्यासू IPS अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. घराबाहेर विश्वास नांगरे पाटील यांच्या कामाचा आवाका फार मोठा आहे. तेवढाच आवाका घरामध्ये त्यांच्या पत्नीचा देखील आहे. औरंगाबादची कन्या असलेल्या रूपाली नांगरे पाटील यांनी विश्वास नांगरे पाटील यांना तेवढीच भक्कम साथ दिलेली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांच्या करिअर आणि वैवाहिक आयुष्याला औरंगाबाद येथेच सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. कारण त्यांची पहिली पोस्टिंग प्रोबेशनवर औरंगाबाद येथे झाली होती. त्यांनी फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड या विभागात काम केलेले आहे. या विभागातील मुलीशी आपण विवाह करू असे नांगरे पाटील यांना कधी वाटले असेल का ?
दरम्यान या विभागात काम करत असताना नांगरे पाटील आणि कल्याण अवताडे यांच्यामध्ये मैत्री झाली. पुढे अवताडे यांनीच मुळे कुटुंबाकडे नांगरे पाटील यांच्यासाठी शब्द टाकला. कल्याण अवताडे यांनी मुळे कुटुंबीयांशी बोलणी करून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम नक्की केला. विश्वास त्यांच्या दोन मित्रांसोबत मुलगी बघण्यासाठी मुळे यांच्या घरी गेले. इथेच होकार न देता रूपाली यांनी परत एकदा विश्वास ह्यांना भेटण्याची इच्छा दाखवली. यावेळी ते घरी न भेटता बाहेर एका कॅफेमध्ये भेटले. यावेळी या दोघांमध्ये दिलखुलास गप्पा झाल्या. विश्वास यांनी पोलिसांच्या आयुष्याबद्दल रूपाली यांना कल्पना दिली. पोलीस आणि त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव करून दिली आणि जर तुम्ही तयार असाल तरच होकार द्या असेही सांगितले. विश्वास यांच्या या स्वभावामुळे रूपा यांनी होकार दिला.
मुलीकडून जरी होकार आलेला असला तरी विश्वास यांच्या वडिलांचा मराठवाड्यातील मुलगी करण्याला विरोध होता. पण पुढे वडिलांनीही विश्वास यांच्या पसंतीला मान देत लग्नाला होकार दिला. साखरपुडा ते लग्न यामध्ये सहा महिन्यांचा कालावधी होता. दरम्यान औरंगाबाद मधील प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर विश्वास यांची काश्मीर येथे बदली करण्यात आली. इथे विश्वास रुपाली यांच्याशी बोलण्यासाठी टेलिफोन बूथवर जात असत आणि बाहेर दोन बॉडीगार्ड उभे राहत असत. तेही AK 47 घेऊन. या काळामध्ये विश्वास यांनी रूपा यांना अनेक पत्र देखील लिहिलेली आहेत.
धुळ्याला बदली झाल्यांनतर विश्वास यांना नियमित डी वाय एस पी चा चार्ज देण्यात आला. येथे परतताच घरच्यांनीही लग्नाची तारीख काढली 28 नोव्हेंबर 2000 रोजी विश्वास आणि रूपा यांची लग्नगाठ बांधली गेली. पुढे धुळ्यामधील जातीय दंगली आणि तणाव सांभाळताना विश्वास नांगरे पाटील यांच्या निर्णय क्षमतेची कसोटी लागली. विश्वास यांनी अनेक अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या ज्यामुळे त्यांची राष्ट्रपती शौर्य पदकासाठी निवड करण्यात आली. त्या पैकीच एक कामगिरी म्हणजे 26/11 चा हल्ला.
या हल्ल्यामध्ये नागरिकांना वाचवण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता ताज हॉटेल मधील दहशतवाद्यांना थोपवून धरण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले. या कामगिरीच्या वेळी त्यांनी त्यांच्या कडील फोन सहकार्याकडे देऊन, “कोणाचाही फोन आला तरी मला देऊ नकोस” अशी सक्त ताकीद त्याला दिली होती. यामागे विश्वास यांना भीती होती ते घरच्यांच्या भावनिकतेची.
“घरच्यांच्या भावनिक आवाहनाला होकार देत जर मी त्या परिस्थितीतून घरी आलो असतो तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करु शकलो नसतो, कदाचित मी आत्महत्या केली असती.” अशी भावना विश्वास नांगरे पाटील यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. पण, विश्वास यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी घेतलेली मेहनत ही तेवढीच महत्त्वाची आहे. पती राष्ट्रीय जबाबदारीत असताना कसलाही हट्ट न करता त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडू देणे हेही महत्त्वाचं काम आहे आणि रुपाली नांगरे पाटील यांनी त्यांची ही जबाबदारी अत्यंत अचूक पार पडलेली आहे एवढं खरं.