Indian Navy च्या ‘ह्या’ युद्धनौकेने पाकिस्तानच्या पाणबुडीला समुद्रातच समाधी दिलेली

पाकिस्तानची एक शक्तिशाली पाणबुडी PNS Ghazi भारतीय नौदलाच्या INS Vikrant ह्या विमानवाहू नौकेला नष्ट करण्यासाठी आली होती. कारण जोपर्यंत INS Vikrant समुद्रात उभी आहे, तोपर्यंत पाकिस्तानला समुद्रमार्गे भारतावर हल्ला करणे शक्य नव्हते.
भारत हा सणांचा आणि उत्सवांचा देश आहे. आपल्या घरातील दिनदर्शिका पहा बरं; रोज एक दोन तरी सण, उत्सव, यात्रा, विशेष दिन असं काहीतरी हमखास असतंच. आणि असायलाच हवं मंडळी; आपला भारत आहेच असा मोठ्या मनाचा, सर्वांची संस्कृती व भावना जपणारा. इतकंच नाही बरं का, ज्यांनी या महान भारतासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली अशा महान व्यक्तींच्या सुद्धा आठवणी भारताने मायेने व अभिमानाने जपल्या आहेत.
भारताच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या, कोहिनूर हिऱ्यासारख्या अमूल्य असणाऱ्या, हिमालयासमान बळकट व कणखर असणाऱ्या व समुद्रासारख्या अथांग व अजिंक्य असणाऱ्या आपल्या भारतीय नौदलाच्या शौर्याची आठवण करून देणारा दिवस म्हणजेच भारतीय नौदल दिवस (Indian Navy Day). दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. १९७१ साली ४ डिसेंबरला भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत कराची हार्बरवर हल्ला केला होता. हा हल्ला एवढा भयानक होता कि ह्या हल्यात पाकिस्तानची अर्धी नौसेना उध्वस्त करण्यात आलेली. ह्याच शौर्याची आठवण म्हणून Indian Navy Day साजरा केला जातो.

पि. एन. एस गाझी हे नाव आपण ऐकलं असेलच, यावरील एक सिनेमा देखील पहिला असेल आपण. पाकिस्तानची हि गाझी पाणबुडी भारताच्या आई. एन. एस विक्रांतला उध्वस्त करण्यासाठी आली होती. या पाणबुडीला भारतीय नौदलाने कशी पाण्यातच समाधी दिली याची रंजक कहाणी आज आपण जाणून घेऊया. परंतु त्याआधी भारतीय नौदलाबद्दल थोडक्यात माहिती बघुयात.
कशी आहे आपली भारतीय नौदलसेना ?
Indian Navy हि भारतीय शस्त्र सेनेचा म्हणजेच इंडियन आर्मड फोर्ससचा एक भाग आहे. भूदल ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या भूसीमेचे रक्षण करतात, वायुदल ज्याप्रकारे आकाशातून आपले संरक्षण करतात; त्याचप्रमाणे, नौदल भारताच्या सागरी सीमांचे संरक्षण करतात. समुद्रामार्गे देशाला असलेला कोणताही धोका थोपवून लावणे हे नौदलाचे प्रमुख उद्दिष्ट होय.
या नौदलाची खरी स्थापना झाली ती ४०६ वर्षांपूर्वी म्हणजेच ५ सप्टेंबर १६१२ मध्ये. पूर्वी भारतात ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी हि व्यापार करण्यासाठी आली होती. या कंपनीच्या सामानाची व कच्च्या तसेच पक्क्या मालाची व समुद्रामार्गे होणाऱ्या व्यापाराची सुरक्षितता टिकवण्यासाठी १६१२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी मरीन स्थापन झाली. यानंतर १९३३-३४ च्या सुमारास नौदलाला ‘रॉयल इंडियन नेव्ही’ म्हटले गेले. भारत १९५० मध्ये प्रजासत्ताक झाल्यानंतर नौदलाला ‘भारतीय नौदल’ असे नाव मिळाले. फक्त ब्रिटिशच नव्हे बरं का, आपल्या शिवाजी महाराजांनी सुद्धा आधुनिक नौदलाचा पाय रचला होता.
सुमारे १६५० मध्ये शिवरायांनी मराठा आरमार उभे केले व स्वराज्य आणखी बळकट व सुरक्षित केले. म्हणूनच शिवरायांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ असेही संबोधले जाते.
आज भारतीय नौदलाकडे जवळपास ६७ हजार नौदल सैनिक आहेत. नौदलाकडे विमानवाहू नौका, सामानवाहू नौका, समुद्र व जमिनीवर कार्यरत असणारे रणगाडे, जवळपास ११ विनाशिका नौका, २२-२३ छोट्या युद्धनौका, २ न्यूक्लीअर पाणबुडया, १४ डिझेल पाणबुड्या व यासमान अनेक साधने व युद्धसामुग्री आहे. असे आपले शक्तिशाली नौदल (Indian Navy) अनेक वर्षे आपल्या सेवेत व सुरक्षेत तत्पर आहे. अश्या नौदलाला एक मानाचा सलाम.
काय आहे पी.एन.एस गाझी ?
पी.एन.एस (PNS) म्हणजेच पाकिस्तान न्हेवल शिप. या पाकिस्तान नेव्हीचे एक खतरनाक हत्यार म्हणजे गाझी पाणबुडी होय. या पाणबुडी चे खरे नाव होते यु.एस.एस डायब्लो ( एस एस -४७९), पाकिस्तान कडे हि पाणबुडी अमेरिकेकडून १ जुन १९६४ साली भाडेतत्त्वावर आणली गेली. पाकिस्तानने या पाणबुडी ला गाझी असे नाव दिले. हि PNS Ghazi १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या समुद्री सीमांवर पाठवलेली एक अत्यंत ताकदवान पाणबुडी होती.
नक्की काय झाले होते ?
१९७१ मध्ये भारत-पाकिस्तान या दोघांत युद्ध सुरे झाले. आताच्या बांगलादेशला तेव्हा पूर्व पाकिस्तान म्हटले जायचे. १९७१ च्या युद्धानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश म्हणून अस्तित्वात आला. यात भारताने मोठी मदत केली. या युद्धात पूर्व पाकिस्तानच्या समुद्री सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाची एक सक्षम युद्धनौका आई.एन.एस विक्रांत तैनात केली होती. INS Vikrant असेपर्यंत पाकिस्तानला समुद्रामार्गे हल्ला करणे अशक्य होतं.

हि विक्रांत युद्धनौका विशाखापट्टणम येथे तैनात आहे हे समजताच पाकिस्तानने कराची हार्बर मधून १४ नोव्हेंबर १९७१ रोजी विक्रांत युद्धनौका उध्वस्त करण्यासाठी पी.एन.एस गाझी हि लढाकू पाणबुडी रवाना केली. या पाणबुडीची दोन उद्दिष्टे होती; एक म्हणजे INS Vikrant उध्वस्त करणे आणि दुसरे म्हणजे समुद्रात माईन्स सोडणे. माईन्स म्हणजे एक प्रकारचे बॉम्ब होय.
गाझी पासून विक्रांतला असलेला धोका टाळण्यासाठी भारतीय नौसैनिकांनी एक मास्टरप्लॅन तयार केला. जोपर्यंत गाझी पाणबुडी विक्रांतच्या शोधात मद्रासला पोहोचेल तोपर्यंत आई.एन.एस विक्रांत गुप्तपणे अंदमान बेटावर निघून जाईल. आता विशाखापट्टणम बंदरावर उभी असलेली नौका होती आई .एन.एस राजपूत, या राजपूत नौकेवरून मुद्दाम वायरलेस सिग्नल्स पाठवले गेले; अगदी तसेच जसे आय.एन.एस विक्रांत वरून पाठवले जात असत.
INS Rajput अगदी विक्रांत नौकेप्रमाणे कार्यरत होती. त्या सिग्नल्स मुळे गाझीचा समज पक्का झाला कि विशाखापट्टणम येथेच विक्रांत युद्धनौका आहे. आय.एन.एस राजपूत मधून विक्रांत नौकेच्या अधिकाऱ्यांच्या घरी टेलिग्राम देखील पाठवले गेले. खोट्या सिग्नल्समुळे हे टेलिग्राम विक्रांत नौकेवरून पाठवले असाच पाकिस्तानचा समज झाला आणि गाझी विक्रांतला उध्वस्त करण्यासाठी पुढे झाली.
ठरल्याप्रमाणे INS Rajput विशाखापट्टणम हार्बर येथून रवाना होणार होती. आता विक्रांतचे सिग्नल गाझीला मिळत नसल्याने त्यांनी आपले दुसरे उद्दिष्ट पूर्ण करायला घेतले. गाझी पाणबुडीने विशाखापट्टणम जवळ समुद्रात माईन्स टाकायला ३ डिसेंबरच्या मध्यरात्री सुरुवात केली. इकडे विक्रांत म्हणून वावरणाऱ्या राजपूत नौकेने कधीच बंदर सोडून समुद्रात आगेकूच केली होती. या गोष्टीचा जराही थांगपत्ता गाझी पाणबुडीला लागला नव्हता. समुद्रात काही अंतर जाऊन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राजपूत नौका थांबली. जराही थांगपत्ता नसलेल्या गाझीने समुद्रात माईन्स टाकून परत जाण्यासाठी तयारी केली.
नॅव्हिगेशन मिळवण्यासाठी गाझी खोल समुद्रातून जरा वर वर येत होती. तोपर्यंत आदेशानुसार राजपूत पुढे पुढे सरकत होती, त्याचमुळे समुद्रात पेरिस्कोप डेप्थ वर असलेल्या गाझीला चुणूक लागली कि आपल्या दिशेने एक युद्धनौका येत आहे. त्वरित गाझी पाणबुडी खोल जाण्यासाठी सज्ज झाली आणि त्या हालचालीत समुद्रात असंख्य तरंग उठले. हि अचानक समुद्रात होणारी हालचाल राजपूत नौकेवर असलेल्या अधिकाऱ्यांना जाणवली. त्यांना समजले कि याच भागात गाझी पाणबुडी असली पाहिजे. क्षणाचाही विलंब न लावता INS Rajput वरून २ डेप्थ चार्जेस समुद्रात सोडले गेले आणि त्याचा मारा होऊन गाझी अक्षरशः उध्वस्त झाली. लागलेल्या आगीमुळे गाझीमधील शस्त्रसाठा पेटला आणि अजून मोठा विस्फोट झाला. PNS Ghazi क्षणार्धात नष्ट झाली.
काय आहे पाकिस्तानचे म्हणणे ?
पाकिस्तानच्या रिपोर्ट नुसार राजपूत नौकेच्या १०-१५ मिनिटे आधीच नॅव्हिगेशन चुकल्यामुळे गाझी पाणबुडी हि स्वतः टाकलेल्या माईन्स च्या संपर्कात आली आणि नष्ट झाली. त्यामुळे योगायोगाने राजपूतचे बॉम्ब सुद्धा गाझीला नष्ट करण्यात कारणीभूत ठरले. खऱ्या अर्थाने गाझी स्वतःच्या चुकीमुळेच नष्ट झाली असे पाकिस्तानचे मत आहे.

शौर्याला सलाम
Indian Navy च्या कामगिरीचे कौतुक करावे तितके कमीच आहे. आजही विशाखापट्टणम येथून ९-१० नौटिकल मैल दूर, पाण्यात २०० फुट खोल गाझी पाणबुडी ४७ वर्षे उध्वस्त अवस्थेत समाधी घेऊन आहे. गाझी पाणबुडीमध्ये एकूण ९०-९२ पाकिस्तानी नौसैनिक होते, त्या सर्वांसमवेत पी.एन.एस गाझी उध्वस्त झाली. ९ डिसेंबर १९७१ रोजी भारताने गाझी नष्ट झाल्याची १००% पक्की वार्ता दिली. १६ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानी आर्मीने शरणागती सुद्धा पत्करली व १९७१ चे युद्ध थांबले.
वाईस ऍडमिरल कृष्णन, एल.टी इंदर सिंग आणि अशा अनेक नौसेना वीरांच्या धाडसामुळे एक मोठे संकट सहज पार झाले. या शूरवीर सैनिकांच्या पराक्रमाची आठवण म्हणून विशाखापट्टणम येथील आर.के बीच येथे एक युद्धस्मारक देखील बनविले आहे. ४ डिसेंबर १९७१ रोजी झालेल्या या घटनेची व नौसेनेच्या शौर्याची आठवण म्हणून हा नौसेना दिवस (Indian Navy Day) उत्साहात साजरा होतो. म्हणूनच नौसेनेच्या या शौर्याला व नेहमी आपल्या सुरक्षेला तत्पर असण्याऱ्या प्रत्येक सैनिकाला मनापासून सलाम.