Indian Army मध्ये Gujrati लोकांची संख्या कमी का आहे ?
बिहार रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, मराठा रेजिमेंट अशी एखादी गुजरात किंवा गुजराती रेजिमेंट आपल्याला सैन्यात दिसत नाही, यामागचे कारण काय आहे ?
आपल्याला आठवतंच असेल, एकदा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी असे विधान केले होते की “गुजराती लोकांमध्ये किती हुतात्मे झाले ? किती गुजराती माणसे देशासाठी लढली आणि शहीद झाली ?” त्यांच्या या विधानामुळे मोठा राजकीय वादंग निर्माण झाला होता. पण असा प्रश्न पडणारे ते काय एकुलते एक नसतील. आपल्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असेल की इतर क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणामध्ये दिसणारा गुजराती (Gujrati) माणूस सैन्यात का दिसत नाही ?
२००९ साली १० लाख सैनिकांमागे ७१९ गुजरात माणसांनी सैन्यामध्ये नोंदणी केली होती. तेव्हा हा आकडा त्यांच्या आधीच्या आकड्यांच्या तुलनेत सर्वोच्च होता कारण त्यावेळी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी एक मोठे जागृती अभियान गुजरातमध्ये चालवण्यात आले होते. त्याआधीची आकडेवारी पाहिली असता २००७-०८ मध्ये गुजरातमधून सैन्यात भरती होणाऱ्यांची संख्या फक्त २३० होती. २०१५-१८ ह्या काळात गुजरात मधूला जवळपास ३००० लोक सैन्यात भरती झाले.
आता ही आकडेवारी पाहिल्यावर आपल्याही मनात हा प्रश्न आला असेल की ६ कोटींहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या गुजरातमध्ये Indian Army मध्ये भरती व्हायचे प्रमाण एवढे अत्यल्प का आहे. मुळातच गुजराती समाज हा आधीपासून व्यापारात आहे किंबहुना तशी परंपराच त्यांनी निर्माण केली आहे. लहानपणापासूनच मुलांना व्यापार कसा करायचा याचे बाळकडू घरातच दिले जाते. त्यामुळे खूप शिकणे आणि नोकरी करणे हा विचार त्यांच्यासाठी दुय्यम असतो. मुलं कळत्या वयात आले की त्याला कौटुंबीक व्यवसायात सामावून घेतले जाते किंवा मग भागभांडवल देऊन नवीन व्यवसाय थाटून दिला जातो.
काही कारणास्तव जर व्यवसाय बुडाला तर लगेचच त्याचे आप्तस्वकीय त्याला व्यवसाय पुन्हा उभा करण्यास मदत करतात. गुजराती समाजामध्ये व्यवसायाला नेहमी प्राधान्य आणि प्रोत्साहन दिले जाते. हेच कारण आहे की गुजराती मुलं नोकरी पेक्षा व्यवसायाकडे अधिक वळतात. आता जर कोणी व्यवसायच करायचा ठरवला असेल तर सैन्यात दाखल होणे काय ते दुसरी कोणतीही नोकरी करणार नाही आणि नोकरी करायची वेळ आलीच तर असे कुठले तरी काम करतात जे त्यांना पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास फायदेशीर ठरेल. परंतु यालाही एक अपवाद आहे.
मराठा, शीख, जाट, गोरखा या जातींप्रमाणे गुजरातमधील काही जाती या लढाऊ आहेत आणि प्रामुख्याने याच जातींमधील लोक सैन्यामध्ये भरती होतात. ह्यात दरबार नाव असलेली राजपूत जात आहे ज्यात सोलंकी आणि जाडेजा नावाची माणसं असतात.
पण लोकसंख्येच्या तुलनात्मक प्रमाणात पाहिल्यास गुजरातचे सैन्यामधील प्रमाण अत्यल्प आहे. म्हणूनच की काय बिहार रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, शीख रेजिमेंट, जाट रेजिमेंट अशी एखादी गुजरात किंवा गुजराती रेजिमेंट (Gujarat Regiment) आपल्याला सैन्यात दिसत नाही.
एखाद्या समाजामध्ये एखादी परंपरा निर्माण व्हायला तसा इतिहासही असावा लागतो. मराठ्यांमध्ये लढण्याची आणि सैन्यात भाग घेण्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांपासून किंबहुना त्याही अगोदरपासून निर्माण झाली. आदिलशाही असो वा निजामशाही या दोन्ही शाह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा सरदार होते. छत्रपतींनी १८ पगड जाती जमातीतील लोंकाना एकत्र करत स्वराज्य निर्मितीच्या कार्यास सुरवात केली. यातूनच लढण्याची आणि सैन्यात भाग घेण्याची परंपरा आपोपापच निर्मांण झाली. पुढे याच परंपरेने एकाहून एक शूरवीर असे लढवय्ये या मातीला दिले ज्यांनी अटकेपार झेंडे तर रोवलेच मात्र एवढ्यावरच न थांबता महायुद्धाच्या काळात असामान्य शौर्य आणि पराक्रम गाजवत ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ मिळवण्यापर्यंत मजल मारली.
जसा इतिहास मराठ्यांचा राहिला आहे तसाच इतिहास शिखांचा आणि राजपुतांचा देखील राहिला आहे. परंतु असा इतिहास गुजरात किंवा गुजराती समाजाच्या बाबतीत फारसा दिसत नाही. अल्लाउद्दीन खिलजीने १२९९ मध्ये गुजरात काबीज केला. यानंतर गुजरातमध्ये फारशा लढाया झाल्या नाहीत. त्यानंतर ज्या काही लढाया झाल्या त्यात मराठ्यांनी बराचसा भाग काबीज केला. गुजरातपासून उत्तरेकडे असणाऱ्या मुस्लिम सरदार यांच्यात आपापसात युद्ध चालू असे पण अकबराने अहमदाबाद जिंकले आणि गुजरात मुघलांच्या हातात गेला. नंतर इंग्रजांनी गुजरातवर ताबा मिळवला. या लढायांमध्ये गुजराती लोकांचा फारसा सहभाग नव्हता. कदाचित म्हणूनच तेथे लढण्याची किंवा सैन्यात भाग घेण्याची परंपरा निर्माण होऊ शकली नाही.
गुजरातचे सैन्यामधील प्रमाण (Gujrati in Indian Army) अत्यल्प असण्याचे अजून एक कारण बोलले जाते, ते असे की गुजराती समाज प्रतिष्ठेपेक्षा वास्तवाला अधिक महत्व देतो. नोकरीतून मिळणारे उत्पन्न हे मर्यादित असल्याने व्यापाराला प्राधान्य देण्याची भूमिका गुजराती समाज घेतो, मग ती नोकरी प्रतिष्ठेची का असेना. प्रतिष्ठेचा बाऊ न करता लवचिक तडजोड करण्याच्या वृत्तीमुळे गुजराती समाज सैन्याकडे किंवा तत्सम इतर नोकऱ्यांकडे वळत नाही आणि म्हणूनच गुजरातचे सैन्यामधील प्रमाण हे काही खास वाढताना दिसत नाही.