दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पराभवाला कारणीभूत ठरणारा भारतीयांचा पराक्रम
जगाच्या इतिहासात हजारो, लाखो युद्धे आणि लढाया झाल्या. इतिहासात प्रत्येक युद्धाची नोंद आहे सुद्धा परंतु, इतिहास आणि सामान्य माणसे सुद्धा काही युद्ध मात्र कायम लक्षात ठेवतात. जसे आपले मराठे व त्यांच्या लढाया अनेकांना अगदी तोंडपाठ असतात, पानिपतचे युद्ध अगदी घराघरात बोलला जाणारा विषय आहे. याच प्रमाणे २ युद्ध जगाच्या पाठीवर झाली आणि ती युद्ध, त्यांची कारणे आणि त्यांचे परिणाम इतके भयंकर होते कि आजही संपूर्ण जग या युद्धांचा पुन्हा अभ्यास करत आहे.
जगात घडलेल्या सर्वात विशाल आणि विनाशकारी युद्धांमध्ये याच युद्धांचा समावेश होतो. होय, आपण बोलतोय विश्वयुद्ध या विषयावर. जगात एकूण २ विश्वयुद्धे झाली. या युद्धांमध्ये अनेक देश सामील होते…एकमेकांविरुद्ध ते लढत होते आणि माणुसकीच्या सगळ्या सीमा ओलांडून या दोनही युद्धांमध्ये माणसाने प्रचंड विनाश घडवून आणला. आज आपण बोलत आहोत दुसऱ्या विश्वयुद्धाबद्दल आणि बघूया कि आपल्या भारताचा या युद्धामध्ये काही सहभाग आहे कि नाही.
ओळख व कारणे
१ सप्टेंबर १९३९ ला सुरु झालेले हे युद्ध २ सप्टेंबर १९४५ म्हणजे तब्बल ६ वर्षांनी संपले. हे युद्ध सुरु झाले दोन देशांच्या आपापसातील आक्रमणाने आणि मग जगातील अनेक देश दोन गटात विभागले जाऊन एकमेकांविरुद्ध युद्ध करू लागले. याची सुरुवात केली जर्मनी या देशाने. जर्मनीने १ सप्टेंबर १९३९ मध्ये पोलंड या देशावर आक्रमण केले आणि खऱ्या अर्थाने विश्वयुद्ध सुरु झाले. दोस्त राष्ट्रे चीन, इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स इत्यादी राष्ट्रे होती आणि अक्ष राष्ट्रांमध्ये जपान, जर्मनी आणि इटली अशा देशांचा समावेश होता.
भारताचा विश्वयुद्ध सहभाग
विश्वयुद्ध जेव्हा झाले तेव्हा भारत इंग्रजांच्या म्हणजेच ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि ब्रिटिश हे दुसऱ्या विश्वयुद्धात जर्मनीच्या विरुद्ध लढत होते. भारताने पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही युद्धांमध्ये सहभाग घेतला होता. ब्रिटिशांकडून जवळपास २५ लाख शिपाई हे भारतातून विश्वयुद्धासाठी जगातील विविध देशांत पाठविण्यात आले होते. भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक माणसे सैनिक आणि सैनिकेतर कामासाठी इंग्रजांमार्फत युद्धासाठी पाठविण्यात आली होती. ज्या विश्वयुद्धाशी आपला कोणताही सरळ संबंध नाही त्या युद्धामध्ये अनेक शूरवीर हकनाक मारले गेले आणि इतिहासाला सुद्धा त्यांची ओळख फारशी नाही आणि इतिहासाला असली तरी माणसांना मुळीच नाही.
दक्षिण-पुर्व आशियामध्ये बर्मा, सिंगापूर असे देश येतात, या देशांना जपानच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यात भारतीय सैनिकांचा फार मोठा वाटा आहे. जवळपास ३६ ते ३७ हजार सैनिकांनी आपले प्राण गमावले. ३०,००० पेक्षा अधिक जण जखमी झाले आणि साधारण ५०,००० पेक्षा जास्त सैनिकांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले. वेगवेगळ्या स्रोतांनुसार या आकड्यांमध्ये बरीच तफावत असू शकते. ब्रिटिश भारतीय लष्कराने तेव्हाच्या काळातील ब्रिटिशांचा सर्वात मोठा लष्करी सन्मान व्हिक्टोरिया क्रॉस मोठ्या संख्येने मिळविला होता.
भारतीयांनी युरोपातील सैनिकांसाठी व्यापारी सामान जसे अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या जहाजांवर काम केले. भारतातील अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक व्यक्ती युद्धकाळात सेवा पुरवीत होते. वेगवेगळ्या संस्थांकडून भारतातून विश्वयुद्धातील सैनिकांसाठी अन्न, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा देखील पुरवठा केला जात होता. अनेकवेळा या युद्धकाळात सैनिकांना एका ठिकाणाहून दुसरीकडे किंवा नवीन तुकडीला युद्धभूमीवर अथवा जुन्या तुकडीला घरी जाण्या-येण्याच्या मार्गामध्ये मित्र राष्ट्रांतर्फे कलकत्ता हे मोक्याचे ठिकाण बनले होते.
या काळात कलकत्ता येथे अनेक जहाजे येत, त्यातून अनेक सैनिक येथे आराम करीत, संपलेला साठा पुन्हा भरून घेत आणि काही सैनिकी तुकड्या ज्या घराकडे रवाना होत होत्या त्यांनाही प्रवासादरम्यान एक थांबा म्हणून कलकत्ता शहराचा आसरा होता. भारताच्या अनेक शहरांमध्ये युद्धामध्ये सहभागी असलेल्या अनेक सैनिकांच्या तुकड्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती.
अजून काही
आपण उल्लेख करू शकत नाही आणि इतिहासात ज्यांची नोंदही नसावी असे अनेक सैनिक व इतर मदतनीस सुद्धा या युद्धात भारतामधून सहभागी होते. उस्ताद इनायत खान यांची मुलगी नूर इनायत खान हे असेच एक नाव आहे जे युद्धात केलेल्या कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. नूर इनायत खान यांना ब्रिटिश लष्करांमार्फत विशेष कार्यकारी संघटनेत कार्य करण्यासाठी रेडिओ ऑपरेटर म्हणून फ्रान्समध्ये पाठविले गेले. तेथे जाऊन जर्मनीच्या सैन्याबद्दलची माहिती रेडिओमार्फत ब्रिटिश सेनेला पुरविण्याचे काम त्यांनी केले. हा एकच उल्लेख माहित असला तरी उल्लेख नसलेले असे अनेक वीर आहेत ज्यांनी लक्षणीय कामगिरी केली होती.
या युद्धकाळात भारत पारतंत्र्यात होता. त्यामुळे युद्धात भारतीय लष्कर नव्हे तर ब्रिटिश भारतीय लष्कर कार्यरत होते. कदाचित याच कारणामुळे भारतीय सैनिकांनी काय कामगिरी केली या पेक्षा ब्रिटिश लष्कराने काय कामगिरी केली या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पहिले जाते आणि म्हणूनच अनेक सैनिकांचा उल्लेख इतिहासात येत नाही, आणि ज्यांचा आला त्यांचा पुरेसा आला नाही. केवळ भारतावर ब्रिटिशांचे राज्य आहे या एका कारणामुळे अनेक भारतीयांना लष्करात जाऊन युद्धात जावे लागले आणि अनेकांना प्राण सुद्धा गमवावे लागले.
भारताचे सुद्धा या युद्धात बरेच आर्थिक, सामाजिक नुकसान झाले. ब्रिटिश सुरुवातीपासूनच भारताचे आर्थिक शोषण करत होते आणि युद्धात तर अजून पैश्याची गरज असल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या अनेक वसाहतींमधून शोषण केले. यात भारताचा सुद्धा समावेश होतो, याचमुळे भारताचे हि आर्थिक नुकसान झाले आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी भारताला सोसावी लागली.
इतके मात्र नक्की कि युद्ध हे केवळ विनाशकारी असते. युद्धात सहभागी असो वा नसो, युद्धाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असो वा नसो पण अनेक देशांना, लोकांना या युद्धामुळे खूप गंभीर परिणाम भोगावे लागले. युद्धात सहभागी असलेल्या अनेक देशांमध्ये युद्धानंतर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली, अनेक देश आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाले होते. जपानवर तर अणुहल्ल्यांचा इतका गंभीर परिणाम झाला होता कि जपान मधील लोकांच्या अनेक पिढ्या काही ना काही आजार घेऊन जन्माला आल्या. अनेक देशांनी यातून धडा घेतला आणि आज जग युद्धाच्या पर्यायाकडे सहसा वळत नाही. इतकी शिकवण या दोन विश्वयुद्धांनी दिली.