हिवाळ्यात कोरड्या त्वचेला मुलायम बनवण्यासाठी करा हे घरगुती उपाय
निसर्गाचे चक्र बदलले आहे, पावसाळा जरा लांबतो. मात्र पावसाळा संपल्यानंतर अगदी वीस पंचवीस दिवस ऑक्टोबर हिट असते मग आगमन होते ते हिवाळ्याचे. पावसाळ्यात वातावरणात दमटपणा भरून राहिलेला असतो. त्यामुळे जरा उन येऊन जाते तेव्हा बरे वाटते. मग वातावरणातील गारवा वाढतो तसे थंडीसाठी उबदार शाली, स्वेटर बाहेर काढले जातात.
शरीर उबदार ठेवण्यासाठी या गोष्टी वापरत असलो तरीही बाहेरच्या शुष्क, कोरड्या आणि थंड हवेचा (winter) परिणाम त्वचेवर होतच असतो. त्वचा कोरडी पडते. अर्थात ही काही खूप मोठी समस्या नाही. पण त्वचा कोरडी पडणे म्हणजे काय हे समजून घेऊया.
कोरडी त्वचा म्हणजे काय आणि कारणे (Reasons For Dry Skin in Marathi)
डॉक्टरांच्या मते त्वचेतील ओलावा कमी झाल्यानंतर त्वचा कोरडी पडते. त्वचेचा सर्वात वरचा थर ज्याला एपिडर्मिस म्हटले जाते त्यामध्ये पुरेसा ओलावा नसतो आणि नैसर्गिक तेल असते त्याचीही कमतरता जाणवते. म्हणून त्वचा कोरडी पडली असे म्हणतात. अशा त्वचेला खाज सुटते. वेळीच लक्ष न दिल्यास त्वचा रोगही होऊ शकतो.
हिवाळ्याच्या दिवसात त्वचेतील ओलावा कमी झाल्याने फॅटी ऍसिड कमी होतात त्यामुळे ओलावा टिकून राहात नाही. वातावरण बदलाबरोबर खूप गरम पाणी अंगावर घेणे तसेच कोलेस्ट्रॉल, हाय बीपी, मुरूम, अलर्जी आदींशी निगडीत औषधे सेवन केल्यासही त्वचा कोरडी (dry skin) होते.
हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय (Home Remedies For Dry Skin during Winter in Marathi)
दूध (Milk)
चेहऱ्याची त्वचाही अधिक कोरडी पडते. त्यासाठी रोज सकाळी चेहऱ्याला कापसाच्या बोळ्याने दूध लावा. 15 मिनिटे तसेच ठेवा. मग कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा नैसर्गिकरित्या मऊ होईल.
ऑलिव्ह तेल (Olive Oil)
ऑलिव्ह तेलाने अंगाला मालिश करा. त्यामुळे हिवाळ्यातही तुमची त्वचा मुलायम राहाण्यास मदत होईल.
मॉश्चरायझर लोशन (Moisturizer Lotion)
कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी क्रीमचा वापर करू नका, लोशन लावा. अंघोळ केल्यावर चेहरा कोरडा करून आणि रात्री झोपण्यापुर्वीही चेहरा कोरडा पुसून मगच लोशन लावावे. त्यामुळे त्वचा मऊ राहिल.
पुदीना (Pudina)
पुदीन्याचा रस चेहऱ्याला लावा किंवा ओटमीलमध्ये मिसळून तो चेहऱ्याला लावा. काढताना थोडे घासून काढा म्हणजे स्क्रब होईल. पुदीन्याचे टोनर करूनही चेहऱ्यावर मारता येते. त्यासाठी पुदीन्याची पाने स्वच्छ धुवून थोड्या पाण्यात उकळावी. मग ते पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे. आठवड्यातून दोन वेळा पुदीन्याच्या टोनरने चेहरा स्वच्छ करा. चेहरा चमकदार दिसतो.
पाण्याचे सेवन (Drink Water)
हिवाळ्यात घामही येत नाही आणि तहानही फारशी लागत नाही. परंतू आठवणीने दिवसातून दोन तीन लीटर पाणी जरूर प्यावे. शरीराला पाण्याची कमतरता भासली तर त्वचा कोरडी पडणारच, त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
कोरफड (Aloevera)
कोरफडीमध्ये जळजळ कमी होण्याचे गुण असतात. त्यामुळे कोरड्या त्वचेवरही कोरफड गुणकारी आहे. कोरफडीच्या जेलने चेहऱ्याला मसाज करा आणि रात्रभर ते तसेच राहू द्या. सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. त्वचेचा कोरडेपणा कमी होईल. हा उपाय रोजही करू शकतो.
मुलतानी माती (Multani soil)
त्वचेवरील जास्तीचे तेल शोषून घेण्याचे काम मुलतानी माती करते. थोडक्यात मुलतानी माती त्वचा कोरडी करते मग कोरड्या त्वचेवर ती उपयुक्त कशी ? तर काकडीचा रस आणि मध एकत्र करून त्यात मुलतानी माती घालून लेप तयार करून तो चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. आठवड्यातून एकदा हा पॅक वापरण्यास काहीच हरकत नाही.
बेकिंग सोडा (Baking Soda)
त्वचाविकारांसाठी बेकिंग सोडा म्हणजे रामबाण उपाय. कोरड्या त्वचेवरही बेकिंग सोड्याचा उपाय करू शकतो. त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी बेकिंग सोडा उत्तम आहे. कारण त्याचा पोत खरखरीत असतो.
एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात एक चमचा नारळ तेल मिसळून त्याने चेहऱ्याच्या त्वचेला गोलाकार मालिश करावी. असे स्क्रब केल्यानंतर दोन ते तीन मिनिटे तसेच ठेवून मग चेहरा पाण्याने धुवावा. आठवड्यातून एक दोन वेळा हा उपाय करू शकतो.
ग्लिसरीन (Glycerin)
ग्लिसरिनच्या वापराने त्वचा मुलायम होते. एक चमचा ग्लिसरीन, एक चमचा गुलाबपाणी एकत्र करावे. थोडा वेळ तसेच ठेवून ते चेहऱ्याला लावावे. चेहरा धुतला नाही तरीही चालतो. खूपच चिकट वाटत असेल तर चेहरा धुवावा. त्या व्यतिरिक्त ग्लिसरीन आणि लिंबाचा रस एकत्र करून लावला तरीही त्वचा मुलायम होते.
कडूनिंब (Neem)
औषधी गुणांनी युक्त ही वनस्पती आहे. म्हणूनच आपल्याकडे गुढीपाडव्याला कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा देखील आहे. कडुनिंबाची काही पाने सुकवून बारीक पावडर करावी. या पावडरमध्ये मध आणि चिमूटभर हळद घालावी. चिकटपणासाठी पाणी मिसळू शकतो. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे सुकू द्यावे. मग पाण्याने धुवावे. त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
आले (Ginger)
हिवाळ्यात, पावसाळ्यात आल्याचा चहा आपण सगळेच पितो. कोरड्या त्वचेवर आल्याचा उपचार करता येतो. त्यातील फायटोकेमिकल्स आणि अँटी ऑक्सिडंटस त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास सक्षम असतात. एक चमचा आल्याचा रस, त्यात एक चमचा मध, तसेच एक चमचा गुलाबपाणी टाकून सर्व एकत्र करावे. हे मिश्रण बोटाने हळूहळू चेहऱ्याच्या त्वचेला लावावे. 15 मिनिटे सुकू द्यावे. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
मेथीदाणे (Fenugreek seeds)
अँटीएजिंग आणि त्वचा बरी करण्याचे गुण मेथी दाण्यात आहेत. त्वचा कोरडी पडू नये यासाठी एक चमचा मेथी दाणे बारीक दळावेत. त्यात तेल आणि पाणी घालून त्याचा लेप सारखा तयार करा. मग चेहऱ्यावर लावून सुकल्यानंतर धुवून टाका. त्वचेचा मुलायमपणा तसाच राहिल आणि चेहरा प्रफुल्लित दिसेल.
तेल (Oils)
चेहऱ्याला रात्री झोपताना तीळ तेल, नारळाचे तेल किंवा बदामाचे तेल जे उपलब्ध होईल ते लावून हलक्या हाताने मालिश करावी. रात्रभर तेल त्वचेत शोषले जाते. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.
कोमट पाण्याने अंघोळ (Warm water for bath)
अंघोळ करताना थंडी वाजते म्हणून खूप कडक पाण्यने अंघोळ करू नका. कोमट पाण्याने अंघोळ करावी. खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा आणखी कोरडी पडते. अंघोळीच्या पाण्यात थोडे तेल टाकू शकता किंवा अंघोळीच्या आधी तेलाने मालिश करू शकता.
सनस्क्रीन (Sunscreen)
उन्हाळ्यात आपण सनस्क्रीन लावूनच बाहेर पडतो परंतू हिवाळ्यातही सनस्क्रीन लोशन लावूनच बाहेर पडावे. काऱण हिवाळ्यातही सूर्यप्रकाशातून अतिनील किरणांचा परिणाम त्वचेवर होत असतोच. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. हिवाळ्यातही सनस्क्रीनचा वापर करावा. त्यामुळे चेहऱ्याला सुरकुत्या पडत नाहीत.
त्वचा शुष्क न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures to prevent Dry Skin in Marathi)
त्वचा कोरडी पडली की तिला खाज सुटते. तसे होऊ नये यासाठी रोज त्वचेला मॉश्चरायझर लोशन लावावे. कोरड्या त्वचेसाठी क्रीमचा वापर करू नये. रसायनयुक्त क्रीम, लोशन आदी लावणे टाळा. भरपूर पाणी प्यावे, त्यामुळे त्वचेला आतून ओलावा मिळतो. हिवाळ्यात बाळांना वापरतात ते मॉश्चरायझर त्वचेवर लावावे. खूप कोरड्या पडलेल्या त्वचेवर (dry skin) हायड्रोकार्टिसोन हे क्रीम जरूर लावावे.
हिवाळ्यात (winter) सुती धाग्याचे कपडे वापरावे. कृत्रिम धाग्याचे कपडे म्हणजे सिंथेटीक कपडे हे त्वचेची समस्या अधिक वाढवतात. अंघोळीला कोमट पाणी वापरा, 15 मिनिटापेक्षा अधिक वेळ अंघोळ करू नका. त्वचा खसखसून पुसू नका. त्वचेवर खाजवू नका. शक्य असल्यास घरात उबदार वातावरण राखण्याचे प्रयत्न करा. हातमोजे घालावेत त्यामुळे बाहेरच्या थंड वातावरणाचा परिणाम हातांवर होत नाही.
आहारात पोटाला उष्णता देऊ कऱणाऱ्या भाज्या असाव्यात, ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळेही आहारात असावीत. त्यामुळे शरीराला आतून पोषण मिळते. साहाजिकच त्वचेवर त्याचे सुपरिणामच दिसतात.