सतत करिअर आणि लग्नाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांना कसं हाताळायचं ?
अनेकवेळा घरगुती कार्यक्रमांमध्ये भेटणारे काही नातेवाईक जाणून बुजून आपल्याला त्रास होईल असे प्रश्न विचारून डिवचतात. त्यांना कसं हाताळायचं हे आम्ही तुम्हाला सांगतो.
आपण भारतीय लोक उत्सवी मनाचे आहोत असे मला खरेच वाटते. बहुतांश वेळा नातेवाईक जमवून किंवा मित्रमैत्रिणी जमवून कल्ला करणे हा साधारण आपला स्वभाव आहे.
आपल्याकडील लग्न समारंभ, वाढदिवस किंवा बारशी हे सर्व दुसरे गेटटुगेदरच असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ही गेट टुगेदर्स समवयस्कांच्या भेटीगाठींमुळे संस्मरणीय ठरतात. मात्र हे समारंभ किंवा गेटटुगेदर्स कंटाळवाणे किंवा टाळावे असे वाटतात ते भोचक नातेवाईकांमुळे.
काही नातेवाईक आपल्याला आवडत नसतात नेमके त्यांनाच सामोरे जावे लागते. अशा नातेवाईकांना टाळायचे तर समारभांना जाणेच टाळायला लागेल पण प्रत्येक वेळी तसेही शक्य होतेच असे नाही.
इतर सर्वांबरोबर आपले संबंध छान असतील परंतू काही Relatives मात्र आपल्याला नकोसे वाटतात. आता हाताळण्याचे कसबच अंगी बाणवावे लागते. कशी सांभाळयची ही परिस्थिती हा विचार करताना काही गोष्टी करून पाहता येतील.
नावडती व्यक्ती आणि आपली वर्तणूक
आपल्या नावडत्या नातेवाईकाबरोबर वेळ घालवण्याचा प्रसंग गुदरलाच तर आपली वर्तणूक कशी असेल किंवा आपण कसे वागायचे हे ठरवा. कदाचित भूतकाळात तुम्हा दोघांमध्ये वादाचा प्रसंग उद्भवला असू शकतो.
त्यामुळे वाद नेमका कोणत्या गोष्टीमुळे झाला होता याचा विचार करा आणि तो मुद्दा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.
न टाळता येणारे संवाद
एखाद्या बद्दल आपले मन कलुषित असेल तेव्हा शक्यतो त्या व्यक्तींशी बोलताना विचारपूर्वक बोलावे. जरा शांतपणे शक्यतो काहीही नकारात्मक बोलणे टाळावे.
शक्य नसल्यास तिथून रजा घेणे उत्तम. कोणाला मदत हवी आहे किंवा नैसर्गिक विधींसाठी जातो सांगून तिथून बाहेर पडणे चांगले.
समर्थन देणारी व्यक्ती
घरी येणाऱ्या एखाद्या नातेवाईकाशी पटत नाही हि आपल्या घरच्यांना आगाऊ कल्पना द्यावी. जेणेकरून त्यांचा आधार तुम्हाला मिळेल.
थोडक्यात नावडत्या व्यक्तीशी संवाद साधण्याची कमीत कमी वेळ तुमच्यावर येऊ देण्याची काळजी ते घेतील. जर कदाचित आपण अशा परिस्थिती अडकलो तर एखादी व्यक्ती त्यातून तुम्हाला बाहेर काढेल.
स्वतःच आनंद
एखाद्या व्यक्तीपायी आपण समारंभाला जाण्याचे टाळणे योग्य नव्हे. ती व्यक्ती खोलीत असली तरीही त्या व्यक्तीला टाळून आपण स्वतःच इतर गोष्टींकडे लक्ष देऊन मजा करू शकतो.
शेजारी शेजारी जेवायला बसणे टाळता येईल, अशा व्यक्तीशी बोलायची वेळ आली तरीही आपले लक्ष दुसरीकडे केंद्रीत करू शकतो.
व्यक्तीला गुंतवून ठेवा
घरगुती समारंभात अशी व्यक्ती आली तर तिला काहीतरी काम सांगून गुंतवून ठेवता येते. स्वयंपाक करताना तिला काही चिरायला निवडायला सांगता येईल जेणेकरून ती व्यक्ती व्यग्र राहिल. म्हणजे त्या व्यक्तीला गुंतवून ठेवून तिची मदत होते आहे असे भासवू शकतो.
विनोदाचा वापर
एखाद्या वेळी ज्येष्ठ नातेवाईक सतत सूचना देत राहातात त्यावेळी विनोद करून त्यांना टाळू शकतो. त्यामुळे परिस्थिती फारशी गंभीर होत नाही. शक्यतो अधीरपणा न दाखवता शांतपणे परिस्थिती हलकीफुलकी करावी.
बाहेर निघून जाणे
एखाद्या नातेवाईकाबरोबर नाहीच सूर जुळत तेव्हा तिथून बाहेरच कसे पडता येईल याचाही विचार करून ठेवावा. काही तातडीची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मित्राला फोन करायला सांगावा किंवा आपण त्याला फोन करावा.
वादाचे प्रसंग टाळा
एखादा विषय जो वादाचा ठरू शकतो तो कौटुंबिक कार्यक्रमात येऊ नये असा प्रयत्न करा. अर्थात काही व्यक्तींना सवय असते की ते त्या विषयावरून आपल्या कोर्टात बॉल टाकतात जेणेकरून आपली तत्काळ प्रतिक्रिया समोर यावी.
पण प्रतिक्रिया कशी द्यावी हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे आणि त्या व्यक्तीला स्पष्टच सांगू शकतो की हे विषय इथे न आणणेच अधिक योग्य ठरेल.
सोडून पुढे जा
समोरची व्यक्ती खरोखरच काहीतरी वाईट किंवा अपमानास्पद बोलते तेव्हा उलटून लगेच प्रतिक्रिया द्यायला जाऊ नका. शांत रहा. कारण प्रतिक्रिया दिल्याने समोरच्या व्यक्तीचे मत किंवा म्हणणे बदलणार नसते उलट त्यातून वादच वाढणार असतो.
त्यामुळे राग गिळून, असे तुमचे मत आहे असे सांगून त्या व्यक्तीसमोरून दूर निघून जा.
मतभिन्नतेचे मुद्दे
मतभिन्नतेमुळे जर वाद होत असतील तर शक्यतो हे वाद सोडवण्याचे प्रयत्न करा. शांतपणे समोरासमोर बसून प्रामाणिकपणे एकमेकांशी बोला आणि वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न करा.
Relatives मधील वाद सोडवताना आक्रमक न राहता थोडी कनवाळूपणा, दयाळू राहूनही हे वाद सोडवता येतील.
नाही म्हणणे
काही नातेवाईक विशेषतः वयाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्ती आपल्याकडून काही हक्काने अपेक्षा ठेवतात. पटत नसूनही पैसे मागणे किंवा फुकट राबवून घेणे अशा काही गोष्टी ते आपल्याकडून ज्येष्ठत्वाच्या किंवा नात्याच्या हक्काने करू पाहतात.
मात्र इथेच नाही म्हणायला घाबरू नका. कारण नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याला नक्कीच असतो. तुम्हाला हो म्हणायचे असेल तरीही त्यापुर्वी विचार करायला वेळ घेऊ शकता.
तुम्ही का नाही म्हणता याचेही कारण देण्याची गरज नाही. ज्यांच्यासमवेत आपले पटत नाहीये त्यांना स्पष्टीकरण देण्याची तशीही काही आवश्यकता वाटत नसेल तर ते देऊच नये.
अवमानकारक तुलना
आपल्याकडे नातेवाईकांना तुलना करण्याची भारी खोड असते. त्यांच्या स्वतःच्या नातवंडांशी, मुलांशी तुलना करण्याची खुमखुमीच आपल्यासमोर त्यांना येते. अशा नातेवाईकांच्या संभाषणाची साक्षीदार होण्याचीही काही गरज नसते.
आपला राग आवरून त्या ठिकाणाहून काढता पाय घेणे आपल्या शांत चित्ताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे या नातेवाईकांना फार भाव न देता संवादातून शांतपणे एक्झिट घ्यावी.
कौटुंबिक मूल्ये
प्रत्येक कुटुंबाची काही मूल्ये असतात ती कायमच जपली पाहिजेत. त्यामुळे अशा नातेवाईकांकडून जर या मूल्यांना धक्का लागत असेल तर समोरासमोर सांगावे. कारण घरातील मुलांवर त्याचे विरूद्ध मूल्यसंस्कार होऊ शकतो.
स्वतःच्या भावना हाताळा
एखाद्या व्यक्तीविषयी चीड असणे, न पटणे साहाजिक आहे. त्यातही एखादा दिवस त्या व्यक्तिसमवेत राहावे लागल्यास कदाचित राग आवरता येणार नाही. काही प्रमाणात का होईना चिडचिड होऊ शकते.
अशा नातेवाईकांना भेटायची वेळ येणार असेल तर आधीपासून थोडे मनाला सूचना द्या. आदल्या दोन दिवसात पुरेशी झोप घ्या. गेटटुगेदरच्या दिवशी देखील जर फार त्रास होऊ लागला तर तिथून लवकर घरी परतण्याचाही पर्याय असू द्या.
स्वतःची काळजी घेताना राग आला तरीही योग्य आहार जरूर घ्या. त्यामुळे रक्तशर्करा कमी होऊ नये याची काळजी घ्या. कारण रागामुळे रक्तशर्करा कमी होऊ शकते.
दुसऱ्याला बदलणे अशक्य
एक लक्षात ठेवायला हवे की आपण कितीही मुद्देसूद मत मांडले, तार्किकदृष्ट्या बरोबर वागत असलो तरीही दुसऱ्याला बदलणे आपल्या हातात नसते. त्यामुळे मनातील राग, द्वेष यांना आवर घालून आहे त्या परिस्थितीला हाताळण्यासाठी स्वतःला तयार करा.