नवरात्रीत घटात पेरल्या जाणाऱ्या धान्याचे धार्मिक महत्व आणि आरोग्यदायी फायदे
देवीचा नऊ दिवसांचा सोहळा स्त्री ला तिच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा असतो. आजही स्त्रियांची परिस्थिती फारशी बदलली नसली तरीही देवीचे नवरात्र तिला प्रसंगी चंडिका होण्यासाठी प्रेरणा देत असते. देवीच्या या नवरात्री उत्सवाची लगबग सुरू झाली की स्त्रियांमध्येही उत्साह संचारतो.
सणांचे धार्मिक महत्त्व जितके, तेवढेच महत्त्व आरोग्यासाठीही आहे. देवीच्या नवरात्रीची सुरूवात महाराष्ट्रात घटस्थापनेच्या दिवशी होते तेव्हा घट बसवले जातात. या घटाच्या भोवती काळी माती घालून शेत लावले जाते. म्हणजे काळ्या मातीत धान्य पेरले जाते.
वास्तविक हे धान्य म्हणजे सातू. काही ठिकाणी उपलब्धतेनुसार वेगळे धान्यही जसे – करडई, ज्वारी, जवस, उडीद, मूग, हरभरा देखील पेरले जाते. मात्र प्रामुख्याने जवस आणि सातू पेरण्याचे प्रमाण जास्त आहे.
काही जणांकडे मातीच्या गाडग्यात शेतातील काळी माती घालून सातू पेरतात. त्याचे शेत उगवतात. नवरात्रीत सातूला महत्त्व आहेच परंतू सातूचे आरोग्य फायदेही मोठ्या प्रमाणात असतात. त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
त्यामुळेच केवळ नवरात्रीत सातू पेरणे इतकेच न करता त्याचे आरोग्य फायदे समजून घेऊन आहारात त्यांचा समावेश करता येईल का याचा विचार नवरात्रीच्या निमित्ताने करूया.
महाराष्ट्रात बहुतांश वेळा सातूचे पीठ केले जाते, ते पूर्ण वेगळे असते. सातू हे धान्य गव्हासारखे दिसते, परंतू याचा दाणा कठीण असतो. तो दळण्यासाठी जास्त वेळही लागतो. परंतू गव्हाच्या तुलनेत पचण्यास हलके असे हे धान्य आहे. इंग्रजीमध्ये याला बार्ली असे नाव आहे.
सातूचे पीक गव्हाच्या तुलनेत कमी प्रमाणात घेतले जाते. हल्ली हे सातू आहारात वापरण्याचे प्रमाणही कमी झाले असले तरीही त्याचे आरोग्य फायदे दुर्लक्षून चालणार नाहीत.
आहारात सातू वापरण्याचे फायदे
मूतखडा
ज्या व्यक्तींना मुतखड्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी बार्ली किंवा सातूचे पाणी उपयुक्त ठरते. मुतखड्याच्या रूग्णांनी पाण्यात सातू उकळावेत मग हे पाणी थंड झाले की रोज एक ग्लास हे पाणी प्यावे. या पाण्याच्या नियमित सेवनामुळे मुतखड्याची समस्या दूर होऊ शकते.
मुत्रपिंडाचे आरोग्य
मुतखड्यासाठी सातूच्या पाण्याच्या फायदा होतो हे तर आपण पाहिलेच. त्याव्यतिरिक्त सातू भिजवलेल्या पाण्याचे सेवन केल्यास किडनीशी निगडीत इतर समस्याही दूर होतात. मूत्रपिंड निरोगी आणि तंदुरूस्त ठेवण्यासाठी सातूचे सेवन करता येते.
जीवनसत्त्वांचा खजिना
सातू हे धान्य पचायला हलके असते. परंतू त्यात भरपूर जीवनसत्त्वे असतात. बी-कॉम्प्लेक्स, लोह, कॅल्शियम, झिंक, तांबे, प्रथिने, अमिनो असिड्स. तसेच पचनयोग्य तंतुमय घटक आणि अनेक प्रकारची अँटी ऑक्सिडंटस असतात. हे सर्व घटक शरीर तंदुरूस्त राखण्यासाठी मदत करतात.
धार्मिक महत्त्व
ऐकिव माहितीनुसार, जवस हे पृथ्वीवरील पहिले पीक आहे. नवरात्रीच्या शेवट्च्या नवव्या दिवशी अन्नाचे विशेष महत्त्व असते. नवरात्रीमध्ये पेरलेले हे धान्य जसे जसे वाढत जाते तशी घरात देवीचा वरदहस्त वाढत जातो. घरात सुख, समृद्धी येते.
अशा वेळी सातू किंवा बार्ली पेरण्यामुळे भविष्याविषयी काही संकेत मिळू शकतात अशी धार्मिक भावना आहे. वास्तविक सातू पेरण्यामागे अन्न हे पूर्णब्रह्म आणि अन्नाचा मान ठेवा हीच भावना असते.
सातू किंवा धान्य पेरल्यानंतर त्याच्या वाढीशी निगडीत काही समज किंवा काही संकेत असल्याचे सांगितले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पेरलेले हे धान्य दोन तीन दिवसात अंकूर येऊन फुटु लागते. त्याच्या वाढीमधून भविष्याबद्दल भाकित केले जाते.
दोन तीन दिवसांनंतरही धान्य अंकुरले नाही तर आपल्याला कठोर परिश्रम करूनच त्याचे फळ मिळते. उगवलेल्या धान्याचा रंग खालून अर्धा पिवळा आणि वरून अर्धा हिरवा असेल तर येत्या वर्षातील अर्धा काळ चांगला जाणार आहे.
पेरलेले धान्य कोणत्या रंगात उगवते त्यावरूनही काही संकेत आहेत. जसे पेरलेले धान्य जर पांढऱ्या किंवा हिरव्या रंगात उगवले तर हा शुभ संकत आहे आणि त्यामुळे आपले वर्ष उत्तम जाणार असल्याचे समजले जाते.
नवरात्रीत सातूचे धान्य पेरण्याला म्हणूनच महत्त्व आहे. केवळ नवरात्रीपुरते नव्हे तर आहारात सातूचा समावेश करता येऊ शकतो कारण सातू हे धान्य पचायला हलके असल्याने वजन कमी करण्यासही सहाय्य करते. धार्मिक, आरोग्याशी संबंधित महत्त्व असल्याने नवरात्रीत सातूचे धान्य पेरण्याला महत्त्व असते.