सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या मित्रांनी आपल्या एका प्राध्यापकाला काळं-निळं होईपर्यंत मारलेलं ?
मॅट्रिक परीक्षेत कलकत्ता विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांना कलकत्ता विद्यापीठातून निलंबित करण्यात आलेलं.
सन १९१३ मध्ये मॅट्रिक परीक्षेत कलकत्ता विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळवल्यानंतर सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) कलकत्त्यामध्ये प्रेसिडेन्सी कॉलेज (Presidency College) मध्ये प्रवेश घेतला. येथे शिकत असताना त्यांच्यासोबत विविध प्रकारचे विद्यार्थी-गट होते. ज्यामध्ये काही अभ्यासू, काही श्रीमंत, काही गुप्त क्रांतिकारी कार्यांमध्ये सहभागी असणारे तर काही स्वतःला ‘रामकृष्ण परमहंस’ व ‘स्वामी विवेकांनंदांचे आध्यात्मिक वारसदार’ समजणारे असे होते.
सुभाषचंद्र (Subhash Chandra Bose) ज्या गटात सामील होते त्या गटात तत्वज्ञान, इतिहास, राष्ट्रवादावरची पुस्तके उत्साहाने वाचली जात असत, त्यावर चर्चा आणि विचारांचा प्रसारही होत असे. पण राजकीयदृष्ट्या हा गट दहशतवादी कृत्य आणि कटकारस्थानांच्या विरोधात होता.
सन १९१४ मध्ये ते रवींद्रनाथ टागोरांना भेटायला शांतिनिकेतनात गेले. दक्षिण आफ्रिकेतील गांधींच्या सत्याग्रह चळवळीसंबंधी जाणून घेण्यासाठी कलकत्याच्या टाऊन हॉल यामध्ये झालेल्या बैठकीनांही उपस्थित राहिले होते. थोडक्यात आज आपण विचारांनी परिपकव आणि स्वभावाने लढवय्या असणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांच्या कॉलेज जीवनातील पैलूंना उजाळा देणार आहोत.
प्रेसिडेन्सी कॉलेजात असताना त्यांचा पहिला वाद महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक यांच्या सोबत झाला. ‘ई. एफ.ओटेन’ असे त्यांचे नाव. प्राध्यापक ओटेन यांनी वर्गातील काही विद्यार्थ्यांशी ’धक्का-बुक्की’ केल्याचे प्रकरण दिनांक १० जानेवारी १९१६ रोजी सुभाषचंद्रांच्या कानावर आले, वर्गप्रतिनिधी म्हणून ते प्राचार्य ‘हेन्री आर.जेम्स’ यांच्याकडे गेले व ओटेन यांनी संबंधित विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी लावून धरली.
“हे विद्यार्थी आपल्या वर्गाबाहेर गोंधळ घालत असल्याने आपल्याला वर्गात त्रास होत होता व त्यामुळे आपण त्या विद्यार्थ्यांना केवळ हाताने धरून बाजूला केले” असे ओटेन (E F Oaten) यांनी स्पष्टीकरण दिले.
ज्यावर ओटेन यांची कृती अपमान किंवा धक्काबुक्की यात मोडत नाही असे प्राचार्यांनी मत मांडले. मुळात ओटेन हे शिक्षण सेवेचे सदस्य असल्याने त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई प्राचार्य करूच शकत नव्हते.
दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांनी याविरोधात यशस्वीरित्या संप केला, अशा कृत्यांमुळे विद्यार्थ्यांमधील बंडखोरीला आणि शिरजोरपणाला प्रोत्साहन मिळेल असे महाविद्यालय प्रशासनाला वाटले. ओटेन यांनी स्वतः वर्गप्रतिनिधींना भेटून हे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला परंतु, दुसऱ्याच दिवशी इतिहासाच्या वर्गातील १२ पैकी १० विद्यार्थ्यांना संपात भाग घेतल्यामुळे वर्ग सोडून जायला सांगितले.
त्यानंतर पुन्हा रसायशास्त्राच्या पहिल्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याला ओटेन यांनी धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली. यावेळी मात्र महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी ओटेन यांना तळमजल्यात गाठून अगदी काळं-निळं होईपर्यंत मार दिला.
त्यांना मारहाण करणाऱ्यांमध्ये सुभाषचंद्र (Subhash Chandra Bose) होते कि नाही याबद्दल ओटेन यांना खात्री नव्हती. परंतु शिपायाने सुभाष (Subhash Chandra Bose) व आणखी एका मुलाला घटनास्थळावरून बाहेर पडताना पाहिले असल्याचे प्राचार्यांना कळवले.
परिणामी प्राचार्यांनी सुभाषचंद्रांना महाविद्यालयातील सर्वात त्रासदायक व्यक्ती घोषित करून निलंबित केले. सुभाषचंद्रांनी दुसऱ्या महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण करण्याची विद्यापीठाकडे परवानगी मागितली पण त्यांना परवानगी मिळाली नाही आणि त्यांना कलकत्ता विद्यापीठातून काढून टाकण्यात आले.
या सगळ्याचा परिणाम असा झाला की, सुभाषचंद्रांच्या शिक्षणात आलेल्या अडथळ्यामुळे ते कलकत्ता सोडून कटकला गेले व त्यांनी स्वतःला सामाजिक कामात गुंतवून घेतले. वर्षभराने त्यांनी पुन्हा कलकत्त्याला येऊन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ‘सर्वार्थाने विद्यापीठाचे हुकूमशहा’ असलेल्या आशुतोष मुखर्जींची भेट घेतली.
विद्यापीठाच्या प्रशासनाने मवाळ भूमिका घेतली आणि सुभाषचंद्रांनी तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ‘बी.ए’ च्या परीक्षेत त्यांना पहिला वर्ग मिळालाच पण त्याशिवाय ते विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकावर होते. सुभाषचंद्रांचे बंधू शरदचंद्र यांच्याशी चर्चा करून त्यांच्या वडिलांनी त्यांना ‘आयसीएस’(इंडियन सिव्हिल सर्व्हिस) परीक्षेच्या अभ्यासासाठी इंग्लंडला पाठविण्याचा निर्णय घेतला.
सन १९१९ च्या अखेरीला सुभाषचंद्र इंग्लंडमध्ये येऊन पोचले. केम्ब्रिजमधील तिमाही आधीच सुरु होऊनही त्यांनी फित्झविल्यम हॉलमध्ये प्रवेश मिळवला. पदवीसाठी नीतिशास्त्र व मानसिक शास्त्रांचा अभ्यास केला व सोबत ISC/IAS परीक्षेसाठीची तयारीही सुरु केली. त्यासाठी त्यांनी आठ ते नऊ वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला.
त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि विशेष म्हणजे जेमतेम सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत अभ्यास करून ‘आयसीएस’ परीक्षेत गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक मिळवला ही खरंच त्यांच्याबाबतीत कौतुकास्पद बाब होती.