मासिक पाळीसंदर्भात या समस्या तुम्हाला उदभवतात का ?
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील ते चार दिवस म्हणजे अतिशय अवघड. या मासिक पाळीच्या चार दिवसात स्त्रीयांमध्ये शारीरिक आणि मानसिक पातळीवर अनेक बदल होत असतात. आज एकविसाव्या शतकात देखील आपल्या समाजात पाळीबद्दल खुलेपणाने बोलणे म्हणजे शरमेची गोष्ट समजली जाते आणि म्हणूनच कित्येक स्त्रीया त्यांना या चार दिवसात होणाऱ्या त्रासाला गपगुमान सहन करतात.
पण या त्रासाकडे तुम्ही दुर्लक्ष केलंत तर भविष्यात यामुळे मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात हे सर्व स्त्रियांनी जाणून घेतलं पाहिजे. म्हणूनच आजचा लेख त्या सर्व स्त्रीयांना समर्पित ज्या मासिक पाळीमध्ये उदभवणाऱ्या त्रासाला कोणाला काहीही न सांगता एकट्याच सहन करतात. चला तर मग चर्चा करूया मासिक पाळीत उदभवणाऱ्या समस्यांबद्दल.
- कित्येक स्त्रीयांना दर महिन्याला पाळी येण्या अगोदर मानसिक त्रास होतो आणि हा मानसिक तणाव बऱ्याच वेळा स्त्रीयांच्या शरीरात होणाऱ्या बदलामुळे असतो. या चार दिवसात आपल्या शरीरातील हार्मोन्स चेंज होत असल्याने बऱ्याच स्त्रीयांना स्तन हळवे होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे असे त्रास होतात.
- आजकाल जीवनमान बदलल्यामुळे बऱ्याच मुलींना वयाच्या दहाव्या ते अकराव्या वर्षीच पहिली मासिक पाळी येते. इतक्या लहान वयात पाळी आल्याने बऱ्याच मुली बावरून मानसिक दडपण घेतात त्यामुळे पहिली पाळी येण्याच्या अगोदर घरातील ज्येष्ठ स्त्रीयांनी आपल्या मुलींशी या विषयावर खुलेपणाने बोलणे गरजेचे असते. पाळी जितकी लवकर येईल तितक्या लवकर मुलींमध्ये स्त्रीत्वाची लक्षणे अधिक दिसू लागतात जसे कि, स्तनांचा आकार वाढणे, योनिद्वारावर व काखेत केस येणे.
- बऱ्याच मुलींना शारीरिक कमजोरीमुळे किंवा योग्य पोषण न मिळाल्याने वयाच्या १४ वर्षानंतर पहिली पाळी येते. पण जर हे वय उलटून गेले तर डॉक्टरांकडे जाऊन योग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते.
- बऱ्याच स्त्रीयांचा योनिमार्गावरचा पडदा बिनछिद्रांचा असतो त्यामुळे अशा स्त्रीयांना पाळी आली तरी पाळीचे रक्त योनिच्या मार्गामध्ये साठून राहते. सामान्य पाळीप्रमाणे त्यांचा रक्तस्राव बाहेर येत नाही. अशा स्त्रीयांना पाळीच्या वेळी पोटात दुखणे, ओटीपोटात फुगवटा येणे असे त्रास उदभवतात.
- बऱ्याच स्त्रीयांमध्ये पिच्युटरी ग्रंथी, बीजांडाची वाढ किंवा काही आजारांमुळे बिघाड होतो त्यामुळे अशा स्त्रीयांना पाळी येतच नाही. यामुळे अश्या स्त्रीयांमध्ये स्त्रीसंप्रेरक निर्माण होण्यात अडथळा निर्माण होतो.
- प्रत्येक महिन्याला मासिक पाळीचे हे चक्र सामान्यतः २८ दिवसांचे असते. म्हणजेच रक्तस्रावाचे ३ ते ५ दिवस सोडले तर दोन रक्तस्रावांमध्ये सुमारे २५ दिवस एवढे अंतर जाते. यात २-३ दिवस मागेपुढे बदल देखील होण्याची शक्यता असते. या प्रकाराला ‘लहान पाळी’ असे म्हणतात.
- गर्भधारणा झाल्यावर तसेच प्रसूतीनंतर काही काळ पाळी येत नाही हे तर आपल्याला माहीतच आहे आणि या काळात पाळी न येणे नैसर्गिक आहे. बऱ्याच स्त्रीयांची मोनोपॉज स्टेज म्हणजेच पाळी थांबणे वयाच्या ४५-५० वर्षी होते. हे पूर्णतः नैसर्गिक आहे.
- पाळीच्या वेळी किंवा पाळी येण्याआधी पोटात दुखणे हि समस्या नव्वद टक्के स्त्रीयांना सतावत असते. पाळीमध्ये हार्मोन्स चेंज झाल्याने चिडखोरपणा, थकवा, लघवीला वारंवार लागणे, डोकेदुखी, पोटात कळ, बध्दकोष्ठ, छाती-स्तन दाटून येणे, पायावर सूज असे त्रास होतात. यातला बराचसा त्रास होण्यामागे शरीरात ह्या काळात क्षार आणि पाणी जास्त साठणे हे आहे. असा त्रास होत असल्यास पाणी आणि मिठाचे प्रमाण घेणे कमी करावे.
- बऱ्याच स्त्रीयांना मासिक पाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतो. बऱ्याच वेळा यापाठीमागे गर्भाशयाच्या गाठी, गर्भनलिका व बीजांडवर सूज तसेच शरीरामधील इतर दोष जसे कि, रक्तस्रावाची प्रवृत्ती असणे इत्यादींमुळे रक्तस्राव जास्त होतो.