कुठलाही निर्णय घ्यायला अवघड जात असेल तर स्वतःला हे प्रश्न विचारा… काम सोप्पं होईल
प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा कोणता निर्णय घ्यावा कळत नाही ? अश्या वेळी हे प्रश्न स्वतःला विचार, निर्णय घेणं सोप्पं होईल
आयुष्यात कठिण निर्णय घेण्याची वेळ बहुतेक प्रत्येकावर येते. त्यावेळी जी भावना मनात येते ती काही वेळा हतबलतेची, भीतीची असते. एखादा कठीण निर्णय घेताना मन विचलित होते, द्विधा अवस्था येते.
बहुतांश वेळा स्वतःच्या निर्णयक्षमतेवरच शंका येते की आपण घेऊ तो निर्णय कदाचित चुकीचा असेल किंवा चुकीचा ठरला तर. जीवनात अशा प्रकारची कोडी प्रत्येकाला सोडवावी लागतात. कधीकधी असे निर्णय घेताना मानसिक त्रास किंवा शारिरीक त्रासही होतो. परंतू निर्णय घेण्याला पर्याय नसतो.
पहिली गोष्ट म्हणजे अनेक प्रसंग असे येतात ज्यात स्वतंत्रपणे कठीण निर्णय (difficult decision) घ्यावा लागतो. अशा वेळी स्वतःवरच अविश्वास न ठेवता स्वतःलाच काही प्रश्न विचारायचे. जेणेकरून आपण जो निर्णय घेतोय तो योग्य आहे का याची चाचपणी करता येऊ शकते.
कठीण निर्णय घेताना स्वतःच्या मनालाच हे प्रश्न विचारा आणि त्याची प्रामाणिक उत्तरे स्वतःलाच द्या जेणेकरून योग्य वाट गवसण्यास मदत होईल.
हा निर्णय आत्ता न घेतल्याचा पश्चाताप होईल का ?
एखादा निर्णय कठीण घेणे कठीण असते कारण त्याचे होणारे परिणामही विचारात घ्यावे लागतात. म्हणूनच निर्णय घेताना त्याचे भविष्यात जे परिणाम किंवा पडसाद उमटणार असतात त्याने पश्चाताप होऊ नये.
पण, त्यामुळे निर्णयच घ्यायचा नाही किंवा काहीच केले नाही तर त्याच्या होणाऱ्या परिणामांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यातील दिरंगाई आपल्या हातातील महत्त्वाच्या संधी हिरावून घेऊ शकते.
भीती वाटते का ?
नेमका निर्णय घेताना अडखळल्यासारखे होते. अंतिम निर्णयाप्रत येऊनही अडकल्या सारखे होते याचे कारण म्हणजे मनात भिती दाटून आलेली असते की हा निर्णय घेतला तर काय होईल.
आपल्यापैकी प्रत्येकाला कशाची तरी भिती वाटत असतेच. काहींना अपयशाची तर काहींना यशाची. परंतू आपला निर्णय (Decision) हा आपल्यालाच घ्यायचा असतो. कोणतीही भिती बाळगून तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे स्वतःला हा प्रश्न विचारा.
मनाचा कौल काय ?
निर्णय घेताना मनाचा कौल लक्षात घ्या. इंग्रजीमध्ये ज्याला gut feeling म्हणतात ना तोच आपल्या आतला आवाज. एखादा निर्णय जर अंतर्मनाला पटत नसेल किंवा मनातून त्याला रूकार मिळत नसेल तर तसा निर्णय घेऊ नये.
तो निर्णय घेण्याविषयी इतरांनी दिलेले अनाहूत सल्ले, मते यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या मनाचा कौल घ्या. हा निर्णय खरोखर घ्यायला हवा आहे का याबाबत जरूर विचार करा.
कशासाठी करतोय ?
कोणताही निर्णय घेताना तो का आणि कशासाठी घेतोय या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. ‘अंत भला तो सब भला’ ही म्हण इथे लागू होते. आपले अंतिम लक्ष्य कोणते आहे, ते गाठण्यासाठी आपण कसे निर्णय घेतो हे फार महत्त्वाचे आहे.
उदा. स्थिरता, परिवार वाढवणे हे आपले लक्ष्य असेल तर त्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणारे निर्णय घेतले पाहिजेत. जसे घर खरेदी करणे. त्यामुळे लक्ष्य गाठण्याच्या एका पायरीवर आपण आलो.
परंतू जगप्रवासाचे, वेगळ्या जागा शोधण्याचे ध्येय बाळगून एकाच ठिकाणी घर बांधणे ही दिशा चुकली असेच म्हणावे लागेल. त्यामुळे मनामध्ये लक्ष्य स्पष्ट असावे आणि उद्दीष्टपुर्तीसाठी त्या त्या काळात योग्य ते निर्णय जरूर घेतले पाहिजे.
निर्णय कोणासाठी ?
आपल्या योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर इतरांच्या मताचा, सल्ल्याचा, उद्दीष्टांचा प्रभाव असता कामा नये. निर्णय घेताना इतरांचा विचारही करावा.
परंतू प्रत्येकवेळी इतरांना खुश ठेवण्यासाठी आपल्या आवश्यकता, गरजा मागे ठेवण्याची काहीच गरज नाही. निर्णय घेताना (decision making) किंवा निवड करताना आपला असलेला संतुलित विचार किंवा दृष्टीकोन हा इतरांनाही प्रेरक ठरू शकतो.
स्वतःविषयी काय वाटेल ?
काही वेळा निर्णय घेतल्यानंतर व्यक्ती स्वतःला दोष देत राहातो. काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात तेव्हा आपल्याला स्वतःविषयी राग येतो.
एखादा नकारात्मक निर्णय घेतला तर आपण स्वतःला दोष देतो आणि मग आत्मसन्मान कमी होऊ लागतो. त्यामुळे आयुष्यातील कठीण निर्णय घेताना तो आपल्या मनाला रूचेल तोच घ्यावा.
निर्णय चुकल्यास ?
निवड, निर्णय हे स्फोटक असू शकता. ते अशा अर्थी की, एखादा निर्णय घेतल्यानंतर त्यातून इतर परिस्थिती निर्माण होतात. निर्णयाचे परिणाम म्हणून का होईना उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करणे आवश्यकच आहे.
आयुष्यात घेतलेल्या निर्णयांचे अनेक परिणाम होत असतात. काही वेळा निवडलेले मार्ग आर्थिक नुकसान करणारे असू शकतात, काहींचा नातेसंबंधांवर परिणाम होता तर काहींचा मैत्रीवर, करिअरवर देखील होतो.
त्यामुळेच जेव्हाही आपण निर्णय घेऊ तेव्हा सांगोपांग स्वतः विचार करून घ्यावा. त्या निर्णयांच्या परिणामाला कसे सामोरे जायचे हा देखील विचार केला पाहिजे.
त्यामुळेच कोणताही मोठा निर्णय घेताना (decision making) मनाचा कौल घेऊन सांगोपांग विचार करून होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी जरूर ठेवली पाहिजे.