Establishment 22 – चीनचा काटा काढण्यासाठी नेहरूंनी उभारलेलं हत्यार
चीन आणि भारताचे युद्ध सुरु होते, तसा भारताला मिळालेला हा झटकाच होता. युद्धात भारतीय सैन्य काहीसे पिछाडीवरच होते. चीनचा जोर काही कमी होत नव्हता. १९६२ चा ऑक्टोबर महिना उजाडला आणि चीनने अचानकच एकतर्फी युद्ध थांबवून शांतता प्रस्ताव ठेवला.
या घटनेमुळे भारतासह अख्ख जग आश्चर्यचकित झाले होते. यावर आजही वाद विवाद होतात, एक गट म्हणतो की चीनला फक्त भारताला धडा शिकवायचा होता, स्वतःचे फार नुकसान करायचे नव्हते तर दुसरा गट म्हणतो जागतिक देशांनी वाढवलेल्या दबावामुळे चीनने नमते घेतले. आजही यावर ठोस उत्तर कोणीही देऊ शकले नाही.
चीनने दिलेला हा शांतता प्रस्ताव पंतप्रधान नेहरू स्वीकारणे शक्यच नव्हते कारणही तसेच होते, प्रस्तावानुसार भारतीय भूमीवर चीन आक्रमकांचा कब्जा कायम राहणार होता. त्यामळे पंतप्रधान नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.
चीनच्या या भूमिकेला टक्कर कशी द्यायची यावर जोरदार विचार मंथन चालू झाले होते. प्रत्येकजण नेहरूंपुढे काही ना काही मांडत होते, पण नेहरू तयार झाले ते IB प्रमुख भोलानाथ मलिक यांच्या योजनेला. आपल्याला माहितीच आहे B.N. Malik हे तडाखेबाज अधिकारी होते आणि नेहरूंच्या जवळचे सुद्धा.
B.M. Malik यांनी नेहरूंना प्रस्ताव दिला तो काट्याने काटा काढायचा. आपल्याकडे हि योजना तशी सगळीकडे चालते. अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर मलिक यांच्या मते चीनच्या विरोधात लढत असलेल्या तिबेट बंडखोराना प्रशिक्षण द्यायचे आणि चीनच्या डोकेदुखीत भर घालायची. या प्रस्तावाला तात्कालीन ओडिसा CM बिजू पटनाईक सुद्धा सहमत होते. आता यांच्या संमतीचा काय सबंध तर बिजू पटनाईक नेहरूंचे युद्धविषयक सल्लागार होते आणि मग सगळ्यांच्या संमतीने नेहरूंच्या वाढदिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबरला स्पेशल फ्रंटिअर फोर्स (SFF) उभारण्यास मान्यता देण्यात आली.
Establishment 22 ची कोणाला फारशी माहिती नव्हती. अगदी गोपणीय पद्धतीने तिची उभारणी करण्यात येत होती. सुरुवात भारताने केली असली तरी पुढे जाऊन हि स्पेशल फोर्स एका आंतरराष्ट्रीय राजकीय बुद्धिबळाचा भाग झाली. आता तुम्ही म्हणाल कसं काय बरं ? तर त्याच झालं असं कि या टास्क फोर्सची माहिती CIA म्हणजेच अमेरिकेची गुप्तचर यंत्रणेला सुद्धा लागली. CIA च्या दृष्टीने त्यांना चीन वर कुरघोडी करण्यासाठी आयती संधी होती.
चीन आणि त्यांची प्रगती अमेरिकेच्या डोळ्यात खुपसत होती असे काही जाणकार सांगतात पण सत्य काय यात अनेक मतप्रवाह आहेत. CIA ने यात अतिउत्कटच इच्छा दाखवली होती कारण अमेरिकेने या अगोदर सुद्धा नेपाळी तरुणांना प्रशिक्षण आणि शस्त्र देऊन वापर केला होता पण तो काही खास कामाचा ठरला नाही. त्यामुळे आता CIA ने आयबी सोबत हात मिळवणी करण्यासाठी एक कमांडो पथक उभारण्यास उत्सुकता दाखवली.
अत्यंत गोपनीय आणि तडाखेबाज कमांडो पथक उभं करण्यासाठी त्यांचा ऑफिसरही त्याच तोडीचा हवा होता. सरकारने अनेक फाईल चाळल्यानंतर त्यांचा शोध सुजनसिंह सुबान यांच्या नावापुढे येऊन थांबला. मेजर पदावरून निवृत्त झालेले सुजनसिंह म्हणजे भारतीय लष्करातील दंतकथाच होय. त्यांच्याकडे SFF ची जबाबदारी सोपवून हा खेळ चालू करण्यात आला.
आता या SFF चं पुढे काय झालं ? खरंच हे हत्यार भारताच्या कामी आले का ? आणि त्यांनी कोणती कोणती मिशन फत्ते केली हे वाचू पुढल्या भागात.