भारत चीनप्रमाणे स्वस्त उत्पादनांची निर्मिती का करत नाही ? उत्तर वाचून अचंबित व्हाल
अनेकजण बोलतात आपणही चीनप्रमाणे स्वस्त उत्पादनांची निर्मिती करू, पण खरंच हे बोलण्याइतकं सोपं आहे ?
दैनंदिन आयुष्यात तुम्ही असंख्य प्रकारच्या वस्तु वापरता, उदाहरणार्थ विजेची उपकरणे फॅन, कूलर, मिक्सर ग्राइंडर, प्लास्टीकच्या वस्तु, लहान मुलांची खेळणी, सण आणि उत्सवांसाठी जी विद्यूत रोषणाई तुम्ही करता त्यासाठीची दिव्यांची माळ इत्यादी इत्यादी. ही सर्व उत्पादने, उपकरणे वापरताना कधी तुम्ही विचार केलाय का, कि ह्या वस्तु कुठे तयार होतात ? तुम्ही म्हणाल अहो असं काय करताय, वस्तु कुठेही उत्पादित होवोत आम्हाला काय त्याचे !
थांबा ! हे प्रकरण इतके साधे नाही. ते तुमच्या देशाच्या प्रगतीशी निगडीत आहे, खरंतर तुमच्या, माझ्या आपल्या सर्वांच्या भारत देशाच्या हिताशी, त्याच्या प्रगतीशी निगडीत आहे. कसे ? सांगतो.
तुम्ही दैनंदिन आयुष्यात वापरत असलेल्या 70% वस्तु ह्या विदेशी बनावटीच्या असू शकतात आणि त्यातही सर्वाधिक वस्तु ह्या चीनी बनावटीच्या असू शकतात. असू शकतात नव्हे नक्कीच असतील. आज फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चीनी उत्पादनाचं वर्चस्व तुम्हाला पाहायला मिळेल आणि याचं कारण आहे चीनी वस्तूंची अत्यल्प किंमत. एखाद्या वस्तूची किंवा उत्पादनांची विक्री नक्कीच वाढते जेव्हा ती वस्तु अतिशय स्वस्त असते आणि हेच आहे रहस्य चीनी मालाचे भारतीय बाजारपेठेतील वर्चस्वाचे.
होय ! तुम्ही बरोबर वाचलत, ‘रहस्यं’च !
आता तुम्ही म्हणाल चीनी माल स्वस्त असतो यात कसलं आलंय रहस्य. चीनी माल स्वस्त आहे हे रहस्य नसेलही कदाचित. पण चीनी माल एवढा स्वस्त का आहे किंवा चीनी माल एवढ्या स्वस्तात उपलब्ध होतो तरी कसा हे बहुतेकांसाठी रहस्यच आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशी काही तथ्य, अशी काही कारणं ज्यामुळे तुमच्या ध्यानी येईल की चीनी माल/चीनी बनावटीच्या वस्तु इतक्या स्वस्त का असतात.
कुशल आणि स्वस्त मनुष्यबळ
चीनी बनावटीच्या वस्तु तुलनेने स्वस्त असण्याचं कारण आहे स्वस्तात उपलब्ध होणारं कुशल मनुष्यबळ. होय ! चीन मध्ये मनुष्यबळ स्वस्तात तर उपलब्ध आहेच पण मुख्य म्हणजे ते कुशल मनुष्यबळ आहे आणि उत्पादन क्षेत्रामध्ये कौशल्याचे महत्व वेगळे सांगायला नकोच, नाही का ? स्वस्त मनुष्यबळ तर अन्य देश जसे की श्रीलंका, व्हिएतनाम सारख्या अनेक देशांत उपलब्ध असेलही, पण मनुष्यबळ नुसते स्वस्त असून चालत नाही तर ते कुशलही हवेच आणि तिथेच चीन बाजी मारून जातो. मागील काही वर्षांत चीनी वस्तूंच्या एकूण उत्पादन खर्चातील मनुष्यबळ खर्च (लेबर कॉस्ट) मध्ये 15% वाढ झाली असली तरी चीनी वस्तूंचा किंमती फार महाग वगैरे नक्कीच झाल्या नाहीत.
तसे पाहायला गेल्यास, चीन सोबत आपले संबंध फार बरे नाहीत पण त्यांचा हा गुण आपण नक्की आत्मसात करायला हवा. म्हणतात ना की शत्रूचेही चांगले गुण घ्यावेत.
कच्या मालाची उपलब्धता
मुद्दा नंबर 2 हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जो की चीनला उत्पादन क्षेत्रातील दादा बनवतो आणि तो म्हणजे चीन मध्ये वस्तु व उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल मुबलक प्रमाणात आणि स्वस्तात उपलब्ध होतो. खरंतर चीनला मिळालेली ही दैवी संपदा किंवा निसर्गदत्त देणगीच म्हणावी लागेल. तुम्हाला माहिती असेलच की वस्तूच्या उत्पादन खर्चातील सुमारे 60-70% खर्च हा कच्चा माल मिळवण्यासाठी खर्च होतो. कच्चा माल जितका स्वस्तात उपलब्ध तितकी वस्तूची विक्री किंमत कमी असते. असा सर्वसाधारण ठोकताळा म्हणा किवा नियम म्हणा. पण वस्तूच्या किमतीचे गणित हे कच्चा मालांच्या किमतीवर अवलंबून असते हे मात्र नक्की.
चीनची कॉपी & पेस्ट ही प्रवृत्ती
खरंतर हा तिसरा मुद्दा थोडासा वादग्रस्त/गरमागरमीचाच म्हणायला हवा पण चीनचा आर्थिक प्रगती मागची आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रातील या उंच भरारी विषयी बोलताना हा मुद्दा लक्षात घेण्याजोगाच आहे. तो म्हणजे बौद्धिक संपदा चोरीचा. होय ! हा आरोप चीनवर अनेकवेळा झालाय. याचं कारण आहे चीनची कॉपी & पेस्ट ही प्रवृत्ती.
मित्रांनो ! कुठल्याही वस्तूचे उत्पादन करावयाचे असल्यास आधी त्या वस्तुचे संशोधन आणि विकास यासंबंधी कार्य सर्वात महत्वाचे. गणित अगदी सोपं आहे मित्रांनो. कुठलीही वस्तु अथवा उत्पादन निर्मितीमध्ये अतिशय महत्वाचा असा हा टप्पा म्हणजे R&D (Research and Development) म्हणजेच संशोधन व विकास. कुठल्याही नविन अथवा अमूर्त वस्तु/उत्पादनला मूर्त स्वरूप हे संशोधनाअंतीच येते आणि संशोधन व विकास हा टप्पा म्हणूनच महत्वाचा आणि खर्चीक, किचकट व वेळखाऊ असतो आणि तो टप्पा पार करायची गरजच उरली नाही तर ? साहजिकच उत्पादन करणे सोपे, कमी खर्चीक आणि पटकन होणार हे वेगळे सांगायची गरजच नाही.
चीनची Dumping strategy
चीनी बनावटीचा वस्तु स्वस्त का असतात यामागील कारणांचा शोध घेतला असता आम्हाला अजून एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे चीनी बनावटीच्या वस्तूच्या किमती ह्या तुलनात्मक दृष्ट्या कमी असतात. म्हणजे नेमकं काय ? सांगतो अगदी उदाहरणासहीत सांगतो.
समजा तुम्हाला एक पेन विकत घ्यायची आहे आणि तुम्हाला विशिष्ट एका आकाराची, विशिष्ट रंगाचीच पेन हवी आहे. तुम्ही दुकानात जाता, ती पेन पाहता आणि दुकानदाराला किंमत विचारता. किंमत ऐकून तुमचा हिरमोड होतो कारण ती पेन थोडी महाग असते आणि तुम्हाला थोडी स्वस्त पेन हवी असते. लगेच तुमचं लक्ष आधी पाहिलेल्या पेनाच्या बाजूला असलेल्या पेनवर जाते. दुकानदार सांगतो की ती पेन आधीच्या पेनपेक्षा स्वस्त आहे आणि तुम्ही आनंदाने ती पेन विकत घेता. विशेष म्हणजे तुम्ही विकत घेतलेली पेन जवळपास जशीचा तशी, त्याच आकाराची आणि तीच वैशिष्ट्य असलेली असते जी तुम्ही आधीच्या पेनमध्ये पाहिलीत.
मग प्रश्न पडतो की ही पेन स्वस्त कशी ?
हाच तर खरा मुद्दा आहे ज्याला dumping strategy म्हणतात. म्हणजे एखाद्या देशातील बाजारपेठेत स्वतःच्या देशात उत्पादित वस्तु निर्यात करायच्या आणि त्या वस्तूची किंमत स्थानिक पातळीवरील उत्पादित वस्तूपेक्षा कमी ठेवायची आणि बाजारपेठेचं चित्रच बदलून टाकायचं. म्हणजे स्थानिक पातळीवरील उत्पादनकर्त्याचे कंबरडे मोडेल आणि हळूहळू संपूर्ण बाजारपेठ काबीज करायची.
ही घातक आणि अनुचित खेळी चीन इथे भारतात सुद्धा खेळतोय आणि त्याचाच परिणामस्वरूप चीनी वस्तूला व उत्पादनाला भारतीय वस्तूंपेक्षा जास्त मागणी आहे. इथे वस्तूची किमंत हा मुद्दा लक्षात घ्या. संशोधन व विकास हा मुद्दा लक्षात घ्या. तुम्हाला लगेच ध्यानात येईल चीनी वस्तु स्वस्त असण्याचे आणि चीनी वस्तूच्या विक्रीमागचे रहस्य.
एका ओळीत सांगायचे झाल्यास.
स्वस्त उत्पादन/वस्तु = कमी उत्पादन खर्च व भरपूर उत्पादन
उत्पादन जितके जास्त तितका उत्पादन खर्च कमी. म्हणूनच मित्रांनो, स्वस्त/कमी विक्री किंमत = जास्त विक्री.
तर असं आहे प्रकरण स्वस्त चिनी मालाचं आणि चिनी उत्पादने भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचं. मित्रांनो, चिनी बनावटीच्या मालाला आणि एकूणच चीनच्या आर्थिक वर्चस्वाला शह देण्यासाठी काही उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर हा चिनी ड्रॅगन आपल्या भारतीय बाजारपेठेला पुर्णपणे कब्जात घेईल.
खाली दिलेल्या फोटो मध्ये भारत आणि चीन यांच्यात असणाऱ्या व्यापरविषयक धोरणाबाबत बाबी तुम्हाला समाजतील. हा फोटो नीट वाचल्यास तुम्हाला स्पष्टपणे कळेल कि व्यापारयुद्धात चीन सरस का आहे.
चला तर मग आम्हाला सुचलेल्या काही उपाय योजना अशा आहेत.
१. किचकट व अडचणीचे वाटणारे नियम बदलणे व आवश्यकता असल्यास ते रद्द करून सुलभ व सुटसुटीत नियम तयार करणे.
२. व्यापार व उद्योग सुलभ करणे जसे की नविन उद्योगास प्रोत्साहन व परवाने सहज उपलब्ध व्हावेत अशी व्यवस्था करणे.
३. कुठल्याही देशाचा आणि विशेषतः भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया असणारे शेती व उत्पादन या क्षेत्रात सुधारणा करणे अत्यावश्यक. भारत हा कृषिप्रधान देश होता आणि आजही आहे. तसेच कुठल्याही देशाचा आर्थिक कणा तेंव्हाच मजबूत होतो जेंव्हा देशाचे उत्पादन क्षेत्र मजबूत असते.
४. नुसती मनुष्यबळ निर्मिती करून उपयोग नाही तर कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही प्रमुख गरज आहे आणि आपण चीनची बलस्थाने पाहताना हा मुद्दा प्रकर्षाने मांडलेला आहे.
५. भारतीय वस्तु व उत्पादने यांची निर्यात वाढावी अशी आर्थिक धोरणे आखणे हे ही आवश्यक.
६. सर्वात महत्वाचे अस्त्र आणि ते म्हणजे स्वदेशीचा पुरस्कार. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या अनेक क्रांतिकारी वीरांनी जे अस्त्र अवलंबिले होते तेच अस्त्र आपल्याला आता वापरावे लागेल असे दिसते.
७. जर तुम्ही भारतीय उत्पादनांशिवाय अन्य देशातील उत्पादने खरेदीच केली नाहीत तर साहजिकच त्या संबंधित देशाला नुकसान सोसावे लागेल. मित्रांनो भारत सरकार एखाद्या देशातील उत्पादनांवर ठोस कारणाशिवाय बंदी लादू शकत नाही.
पण तुम्ही मात्र स्वदेशी उत्पादनाचा पुरस्कार करून भारतीय अर्थव्यवस्था व पर्यायाने भारतीय उत्पादन क्षेत्राला बळकट करण्यास जरूर हातभार लाऊ शकता
आम्ही या लेखामध्ये मांडलेल्या मुद्द्यांचा जरूर विचार करा मित्रांनो…