हर्षद मेहताचा ‘स्वामी’ जो पंतप्रधानांचाही अध्यात्मिक सल्लागार होता ?
Scam 1992 ह्या वेब सिरीजमध्ये हर्षद मेहताला (Harshad Mehata) मदत करणारा स्वामी (Chandraswami) खऱ्या आयुष्यात कोण होता ? पंतप्रधानांना भेटण्यासाठी त्याला कधीच अपॉइंटमेंट घ्यावी लागली नाही असं ऐकिवात आहे.
भारतीयांमध्ये हुशार, बुद्धिमान लोकांची कमतरता नाही, हे सगळ्यांनाच माहीत आहे. ही हुशार डोकी जर चांगल्या कामात वापरल्या गेली तर ते देशहिताचंच होईल. परंतु जर ही वाईट कामांकडे वळली तर स्वतः बरोबरच देशाचंही अहित करून जातील. दुर्दैवाने अशा वाट चुकलेल्या लोकांची संख्या जास्त आहे…
१९९२ मध्ये भारतातला एक फार मोठा घोटाळा उघडकीस आला… थोडाथोडकं नव्हे तर तब्बल ५ हजार कोटींचं ते स्कॅम होतं !! हर्षद मेहता (Harshad Mehata) नावाचा वल्ली यामागे होता. अत्यंत हुशारीने, अनेकांसोबतच्या ओळखीने हर्षद मेहताने हा घोटाळा केला होता…
एका बँकेकडून फेक बीआर बनवून दुसऱ्या बँकेकडून पैसे घ्यायचे – असं करत शेअर्स मध्ये तो पैसे गुंतवू लागला. त्याची छोटीशी कंपनी लवकरच नावारूपाला आली. इतकंच नव्हे तर, शेअर मार्केटमध्ये तिच्या नावाचा बोलबाला झाला.. मॅगेझिनच्या कव्हर पेजवर, न्यूजमध्ये शेअर मार्केटचा हा ‘बादशहा’ हर्षद मेहता (Harshad Mehta), सर्वांचा हिरो बनला !!
अर्थात त्याचं हे स्कॅम पकडल्या गेल्यावर अनेक नावं पुढे आली.. अगदी त्यावेळचे भारताचे प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिंहराव यांचंही नाव घेतल्या गेलं!
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे “बर्डस ऑफ द सेम फिदर, फ्लॉक टूगेदर”, अर्थात, सारख्या प्रवृत्तीची माणसं एकत्र नांदतात ! हर्षद मेहता सारखा फसवेगिरी करणारा, मधाळ बोलणारा, अत्यंत चलाख…व दुर्दैवाने हुशार असा चंद्रास्वामी नावाचा एक आसामी हर्षद मेहताच्या जवळच्या लोकांमधून एक समजल्या जायचा..
त्याचा तो सल्लागार होता….नव्हे तर त्याच्या आयुष्याचा “स्वामी” झाला
मोठी दाढी ठेवणारा, रुद्राक्षाच्या माळा धारण करणारा, कपाळाच्या मध्यभागी मोठं कुंकुम लावणारा हा तांत्रिक स्वामी केवळ साध्या भोळ्या लोकांना धागे दोरे देऊन लुबाडायचाच नाही तर त्याचे मोठमोठ्या लोकांशी जवळचे संबंध होते…
तत्कालीन प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव यांचा तो “स्पिरिचुअल ऍडव्हायझर” होता !! त्यांना भेटण्यासाठी त्याला कधीच अपॉइंटमेंट घ्यावी लागली नाही असं ऐकिवात आहे.
एवढंच नव्हे, तर हर्षद मेहता जेव्हा एक्सपोज झाला तेव्हा त्याची केस दाबून टाकण्यासाठी या स्वामीचं प्रेशर खुद्द पी. व्ही. नरसिंहराव यांच्यावरही होतं असं म्हणतात.
हा स्वामी केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध होता. त्याला चक्क “गॉडमॅन” म्हणून संबोधण्यात यायचं. बेहरीनचा खलिफा, ब्रूनीचा सुलतान, ऍक्ट्रेस-एलिझाबेथ टेलर, ब्रिटिश प्राईम मिनिस्टर मार्गारेट थेचर … अशा अनेकांचा तो “स्पिरिचुअल ऍडव्हायझर” होता !!
तो एक मोठा तांत्रिक आहे, फार मोठा ज्योतिषी आहे असं त्याच्या भक्तांकडून भासवलं जायचं. परंतु प्रत्यक्षात हा धूर्त माणूस ज्योतिष्य विद्येच्या एका खऱ्याखुऱ्या जाणकाराकडे जाऊन आपल्या कडे असणाऱ्या कुंडल्या त्याला दाखवायचा व त्याने सांगितलेलं भविष्य केवळ आपल्या मुखातून आपल्या भक्तांना ऐकवायचा.
अर्थात ते तंतोतंत खरं उतरायचं ज्यामुळे चंद्रास्वामी सामान्यांपासून अनेक बड्या राजकारण्यांपर्यंत, अगदी देशी-विदेशीही प्रसिद्ध झाला. ब्रिटनच्या त्यावेळच्या राजकारणी मार्गारेट थेचर यांच्यासाठी या माणसाने प्रधानमंत्री होण्याची भविष्यवाणी केली होती जी नंतर खरी झाली.. व थेचरही याच्या सच्च्या भक्त झाल्या !!
किशोरवयात असताना कॉलेजच्या बाहेर हुल्लडबाजी करणारा हा “नेमीचंद” वयाच्या २६ व्या वर्षी स्वयंघोषित “चंद्रास्वामी” (Chandraswami) झाला … ज्याला जोतिष्यशास्त्राचा अभ्यास नाही, तंत्रविद्या माहीत नाही, इंग्रजी भाषेचा गंध नाही.. असा हा स्वामी थोरामोठ्यांच्या गळ्यातला ताईत असावा हे नवलच !
आपल्या वक्तृत्वकलेचा, व्यवहारकुशलतेचा त्याने पुरेपूर फायदा घेत अनेकांना आपल्या जाळ्यात ओढलं. मोठ्या हुद्यावर असणारे, प्रचंड श्रीमंत, सर्वसामान्य, महिला अशा अनेकांची कमजोरी ओळखण्याचं कसब त्याच्याकडे होतं. याचा फायदा त्याने आपल्या लाभासाठी करून घेतला.
राममंदिर निर्माणासाठी मोठा यज्ञ करणारा हा स्वामी हत्यारे पुरवण्याचं काम करणाऱ्या सौदी अरबच्या अदनान खगोशीच्याही जवळचा होता !! भारतात आपले हात पाय पसरवण्याचा अदनानचा मार्ग यानेच खुला करून दिला होता.
त्याने आयोजित केलेल्या राममंदिर निर्माणाच्या यज्ञासाठी जगभरातले हिंदू एकवटले होते !! परंतु रात्रीच्या वेळी याचे देशी विदेशी भक्त व्होडका पिऊन झिंगत होते !! केवढा विरोधाभास हा!
इतक्या मोठ्या लेव्हलवरचा घोटाळा करणारा हर्षद मेहता असो की अगदी विदेशी राजघराण्यांशी मधुर संबंध असणारा चंद्रास्वामी (Chandraswami) असो… यांचे हात जसे कधी काळी आभाळाला टेकले होते, तसे ते दाणकन जमिनीवर आपटलेही.. अत्यंत रॉयल लाईफ उपभोगणाऱ्या यांनी अंतिम वेळही भोगली होती…
या स्वामीचं खरं रूप जेव्हा जगासमोर आलं तेव्हा याची सर्वत्र छीथू झाली. कधीकाळी सुखासीन आयुष्य जगणाऱ्या या बाबाची तिहार जेलमध्ये रवानगी झाली. हळूहळू तो सर्वांपासून अलिप्त होत गेला व दीर्घ आजारामुळे त्याचा अंत झाला.
खरं तर लोकांशी बोलण्याची खुबी ही एक कला आहे, जी प्रत्येकाला अवगत नसते. व्यवहारचातुर्य, वाकपटुता या गोष्टी खरंच सगळ्यांना प्राप्त होत नाही. कमवू म्हटलं तरी बव्हंशी ते शक्य होत नाही. या माणसाला देवाने या दुर्लभ गोष्टी बहाल केल्या होत्या!
सरळमार्गी आयुष्य सोडून ही हुशार माणसं वाममार्गाला का लागत असावीत हा खरंच एक मोठा प्रश्नच आहे. आपल्यातील प्रज्ञेचा लाभ घेत ही माणसं एक अतिशय चांगलं आयुष्य निश्चितच जगू शकतात…मग असं काय होतं की जे यांना अपप्रवृत्तींकडेच खेचतं.. हा गुंता काही सुटत नाही….