ग्राहक म्हणून फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाद्वारे अशी मिळावा नुकसान भरपाई

भारतीय ग्राहक मंचाकडे तक्रार केव्हा आणि कशी करायची आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात ?
ग्राहकाचे हित व ग्राहकाचे सुख व ग्राहकास योग्य न्याय आणि तोही सुलभतेने मिळावा म्हणून ग्राहक पंचायत व ग्राहक हक्क चळवळ स्थापना झाली. जाणून घेऊया ग्राहक मंच कायद्याविषयी थोडेसे.
आपल्या देशातील जनता दैनंदिन गरजेच्या वस्तू बाजारातून, मॉलमधून किंवा ऑनलाईन इ-कॉमर्स वेबसाईट वरून खरेदी करत असते. जेव्हा आपण कुठलीही वस्तू खरेदी करतो तेव्हा आपण ग्राहक बनतो. The Consumer Protection Act 1986 नुसार व्यक्तीने एखादी वस्तू किंवा सेवा स्वतःच्या वापरासाठी खरेदी केल्यास त्याला ग्राहक म्हटले जाते आणि या कायद्यानुसार ग्राहक मंच (Consumer Forum) कडे केवळ ग्राहकंच तक्रार दाखल करू शकतो.
एखादी वस्तू खरेदी केल्यास तुम्हाला त्याबाबत तक्रार असेल किंवा तुम्ही निवडलेल्या सेवा पुरवठा करणार्या कंपनीने समाधानकारक सेवा न दिल्यास किंवा तुमची फसवणूक झाल्यास तुम्ही ग्राहक मंच (Consumer Forum) कडे तक्रार दाखल करू शकता. भारतीय ग्राहक मंचाकडे तक्रार केव्हा आणि कशी करायची आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते आपण बघणार आहोत.
ग्राहकाचे हक्क
- सुरक्षिततेचा हक्क
- माहिती मिळवण्याचा हक्क
- निवडीचा हक्क
- तक्रार निवारणाचा हक्क
ग्राहकाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य
- पावतीशिवाय माल खरेदी न करणे
- अनधिकृत खरेदी न करणे
- केवळ प्रमाणित केलेल्या वस्तूंची खरेदी करणे
- किंमत आणि गुणवत्ता तपासूनच खरेदी करणे.
- फसवणूक होऊ नये याची काळजी घेणे.
- वस्तू व सेवेचा खरेदी करताना दर्जा पाहणे.
- वजनमापात होणाऱ्या फसवणुकीची तक्रार नोंदवणे.
असा आहे भारतीय ग्राहक मंच कायद्याचा धाक व त्यातील ग्राहकहिताच्या तरतुदी…
आपण सोशल मीडियावर सक्रिय असाल तर काही दिवसांपूर्वी एका नामांकित ऑनलाईन इ-कॉमर्स वेबसाईटच्या गाजलेल्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. पंजाबमधील एका मुलाने Snapdeal या इ कॉमर्स वेबसाइटवरून केवळ ६८ रुपयांना आयफोन मागवला होता पण Snapdeal ने ती ऑर्डर रद्द केली. त्या ग्राहकाने याविरुद्ध भारतीय ग्राहक मंच (Indian Consumer Forum) कडे तक्रार केली. शेवटी Snapdeal ला ६८ रुपयांना त्या ग्राहकाला आयफोन द्यावा लागला, एवढेच नव्हे तर नुकसान भरपाई म्हणून वर २००० रुपये देखील द्यावे लागले. ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे कंपनीला दंड म्हणून भारतीय ग्राहक मंचाकडे १० हजार रुपये भरावे लागले.
या एका छोट्याशा प्रकरणावरून तुम्हाला ग्राहक मंच कायद्याची व त्याच्या प्रभावाची कल्पना आलीच असेल. ग्राहकमंच अस्तित्वात येण्यापूर्वी ग्राहकाची पिळवणूक करणे सोपे होते पण आता ग्राहक मंच नावाचे प्रभावी शस्त्र ग्राहकाच्या हाती आले आहे.
ग्राहक जर जागरूक असेल तर त्याला फसवण्याचा कुणीच प्रयत्न करू शकत नाही आणि त्यातूनही ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याला न्याय मिळवून द्यायला भारत सरकारने Consumer Protection Act अंतर्गत अनेक तरतुदी केल्या आहेत. परंतु ह्या तरतुदी, कायद्याच्या माहिती अभावी त्या ग्राहकांपर्यंत पोहचू शकत नाहीत. पण तुमची फसवणूक झाल्यास तुम्ही कसा न्याय मिळवू शकता हे या लेखामार्फत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.
कोणाविरुद्ध तक्रार करू शकता ?
- दुकानदार (Shopkeeper)
- कंपनी (Company)
- डीलर (Dealer)
- सेवा प्रदाता (Service Provider)
तक्रार नक्की केंव्हा व कशी करायची ?
असे समजा कि एखाद्या ऑनलाईन इ-कॉमर्स वेबसाईट वरून तुम्ही एक वस्तू मागवली आणि तुम्हाला मागवलेल्या वस्तूऐवजी दुसरेच काहीतरी मिळाले अश्या वेळेस त्या ऑनलाईन इ कॉमर्सच्या वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाईन नंबरला फोन करून किंवा इमेल करून आपली समस्या व्यवस्थितपणे सांगावी आणि काही दिवस त्यांच्या उत्तराची वाट बघावी.
तक्रार केल्यांनतर ८ ते १० दिवसात त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्यास तुम्ही ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकता. तक्रार करण्यापूर्वी तुमच्याकडे तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूचे सगळे पुरावे असल्याची खातरजमा नक्की करून घ्या. जसे की बिल, तक्रार केलेला ईमेल किंवा कंपनी समवेत ईमेलद्वारे तुम्ही केलेलं संभाषण इत्यादी.
तक्रार कुठे आणि कशी करायची ?
ग्राहक मंचाकडे तक्रार करायची असल्यास या तीन ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता. ती तीन ठिकाणे म्हणजेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच आणि राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंच. पण या तीन ठिकाणांपैकी कुठेही तक्रार नोंदवायची असल्यास त्याकरिता काही निकष आहेत. ते निकष खालीलप्रमाणे –
- जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (District Consumer Forum) कडे तुम्ही तक्रार करू शकता जेव्हा तुम्ही केलेल्या दाव्याची किंमत ० ती २० लाख रुपये असेल.
- राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच (State Consumer Forum) कडे तुम्ही तक्रार तेव्हा करू शकता जेव्हा तुम्ही केलेल्या दाव्याची किंमत २० लाख ते १ करोड असेल.
- राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंच (National Consumer Forum) कडे तुम्ही तक्रार तेव्हा करू शकता जेव्हा तुम्ही केलेल्या दाव्याची किंमत १ करोड पेक्षा जास्त असते.

ग्राहक मंचाकडे तक्रार करण्यासाठी तुम्ही सरकारने दिलेल्या हेल्पलाईन नंबरला फोन करून करून तक्रार नोंदवू शकता.
National Helpline No. १८००-११-४०००
Maharashtra Helpline No. १८००-२२-२२६२
याव्यतिरिक्त ऑनलाईन तक्रार करण्यासाठी सरकारने काही वेबसाईट्स सुद्धा जारी केल्या आहेत जिथे तुम्ही केवळ इंटरनेटचा वापर करून ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवू शकता. या वेबसाईट्स खालीलप्रमाणे –
http://nationalconsumerhelpline.in/
https://consumerhelpline.gov.in/
http://mahafood.gov.in/pggrams/
Consumer Protection Act अंतर्गत ग्राहक मंचाकडे तक्रार करण्यासाठी तुम्ही वकिलाची मदत घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः देखील तक्रार करू शकता आणि तुमची केस कोर्टात लढू शकता. तुम्ही केलेल्या दाव्यानुसार तुम्हाला त्याचे शुल्क देखील भरावे लागते. त्याबद्दल अधिक माहिती खालील फोटोत तुम्हाला दिसेलच. वकीलामार्फत कोर्टात केस लढायची असल्यास त्याचे स्वतंत्र शुल्क तुम्हाला भरावे लागेल.
ग्राहक हिताय ग्राहक सुखाय: