त्या घटनेनंतर सगळ्या जगाला कळलं भारताकडे ‘रॉ’ नावाचं काहीतरी आहे
१९७१ चा काळ…..भारत आणि पाकिस्तानमधील सबंध कमालीचे ताणले गेले होते. अख्खा बांगलादेश पेटला होता, म्हणजेच तेव्हाचा पूर्व पाकिस्तान. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाकिस्तानची फाळणी करून पूर्व पाकिस्तानला जोखडातून मुक्त करण्याची आयती संधी दिसत होती पण एवढं सोप्प नव्हत ते, कारण त्यावेळी पाक आणि अमेरिका जिगरी दोस्त होते आणि चीन त्या दोस्तीतला त्रिकुट होता. भारताला पावलं जपून टाकायची होती पण…..अशातच एका घटनेनं मोठा धमाका केला.
३० जानेवारी सकाळचे साडे अकरा वाजलेले. गंगा नावाच्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानानं दिल्लीच्या दिशेने उड्डाण घेतले. जम्मूला थांबा होताच प्रवाशांमधले दोन जण उठले आणि एकाने कॉकपीट मध्ये जाऊन वैमानिकावर पिस्तुलीची नळी टेकवली आणि विमान लाहोरला नेण्याची धमकी दिली आणि दोन दिवस चालणाऱ्या अपहरण नाट्याची सुरुवात झाली.
दुपारी १:३० ला विमान लाहोरला पोहोचलं. सुरक्षा रक्षकांनी लगेचं विमानाला घेरलं आणि त्यातून हाशीम कुरेशी खाली उतरला. आता तुम्ही म्हणाल हा हाशीम कुरेशी कोण ? तर विमान अपहरण करणाऱ्या दोन लोकांमधील एकजण हाशीम कुरेशी आणि दुसरा होता अश्रफ कुरेशी, त्याचा चुलत भाऊ आणि मुक्काम पोस्ट कश्मीर. यातील हाशीम हा पाकच्या ISI चा एजंट होता.
बरं आपण होतो लाहोर विमानतळावर, हाशीम खाली उतरला आणि त्याने पाक अधिकाऱ्यांसमोर आपल्या मागण्या ठेवल्या. कायतर – काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी ‘अल-फतह’ नावाची चळवळ सुरु करण्यात आली होती त्याचे ३६ दहशतवादी भारताच्या ताब्यात होते. त्यांची सुटका करावी आणि हाशीमला पाकिस्तानमध्ये आश्रय द्यावा. आता भारत ह्या मागण्या मान्य करणे शक्यच नव्हते. पंतप्रधान इंदिरा गांधींनी AIR वरून भारत झुकणार नसल्याचं खडसावलं. अख्खा देश चिंतेत बुडाला होता.
पाकमध्ये मात्र दिवाळी साजरी केली जात होती. पाकी लईच खुश होते. हाशीमला स्वातंत्र्य सैनिक म्हणून लोक नाचू लागले. त्याला पाहण्यासाठी विमानतळावर पाक नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. लोक भारताच्या विरोधात नारे देऊ लागले, एकमेकांना आलिंगन देऊन आनंद साजरा करत होते. हाशीम भाईचे प्रेसवाले मुलाखत घेत होते, मोठे मोठे पाक अधिकारी त्याला येऊन भेटत होते. हाशीमचा त्या दिवशी एकदम टकटकीत पाहुणचार केला गेला. जसा काय तो त्यांचा जावईच.
दुसऱ्या दिवशी सकाळी हाशीमने सगळ्यात आधी झुल्फिकार अली भुट्टो यांना भेटण्याची मागणी केली. आता भुट्टो त्यावेळी पाकचे परराष्ट्रमंत्री होते. १ फेब्रुवारी ला भुट्टो आपला ताफा घेऊन हाशीमला भेटायला आले. त्यांच्यात बोलणी झाली पण नेमकी काय बोलणी झाली याबाबत काही माहित नाही. त्यानंतर मात्र हाशीमने सर्व भारतीय प्रवाशांची सुटका केली. मात्र विमान अपहरणकर्त्यांकडेच होते.
यावेळी J&K National Liberation Front चा नेता मकबूल बट पेशावरला होता. त्याने विमान तळावर जाऊन मित्राची भेट घेतली.
हाशीम मकबूल बटला म्हणाला “लोक म्हणत आहेत विमानाला आग लावा. बट म्हणाला ‘मूर्खपणाच ठरेल असं काय करू नको” आणि अखेर ISI ने विमानाला आग लावून पेटवून दिले. विमान गेल्याचं दुःख नाही पण सगळ्यात जास्त दुःख भारताचं नाक कापल्याचं होतं.
यानंतर भारताच्या विविध अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायात आपली गाऱ्हाणी मांडली. पाक कसे दहशतवादाला मदत करते हे दाखवून देण्यात आले. त्या नंतर इंदिरा गांधी यांनी पाक विमानांना भारतीय हद्दीत उडण्यास बंदी केली. पण अशा फुसक्या प्रतिसादाला भारतीय जनता मात्र चिडली. नेहमीचे शेपूट घाले धोरण हे ! असे लोक टीका करू लागले. नेहरू-गांधी आणि त्यांचे शांतता धोरण आता बंद करा असे आवाज येत होते पण… पण… पण…
आता खरी गोष्ट चालू होते…. ती अशी की यात भारताचे नाक वैगरे काही कापलेच गेले नाही.
हे गंगा अपहरण प्रकरण म्हणजे ‘रॉ’च्या शिरपेचातला विजयाचा तुरा होय आणि यानंतरच सगळ्या जगाला कळाले कि भारताकड ‘रॉ’ नावाचं कायतरी हाय. मुळात या सगळ्या कथेचा लेखक होती ‘रॉ’ आणि ‘रॉ’ चे तत्कालीन प्रमुख रामेश्वरनाथ काव.
आता त्याचं झालं असं, १९७१ मध्ये हाशीम कुरेशीला भारतामध्ये घुसखोरी करताना आपल्या BSF च्या जवानांनी पकडले. त्याचा थोडा पाहुणचार केल्यावर लक्षात आले कि हा आलाय ISI च्या एका मिशनवर. मिशन काय तर भारताचं एक विमान अपहरण करायचं होत आणि ते पण इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव गांधी वैमानिक असलेलं. याचं कारण असं होतं कि राजीव असल्यामुळे इंदिराजी कोंडीत सापडतील. हा डाव पाडून BSF ने तात्काळ याची माहिती R.N. Kao यांना दिली. या नंतर लगेच RAW च्या अधिकाऱ्यांनी खलबते केले आणि एक प्लॅन तयार केला. पंतप्रधान इंदिरा गांधींची मंजुरी घेऊन उलटा डाव चालू केला.
“रॉ”चे बडे अधिकारी आणि हाशीम यांची भेट झाली यामध्ये ते म्हणले ‘बिन भाड्याच्या खोलीत आयुष्य घालवायचं नसेल तर आम्ही सांगतो ते कर’. हाशीम भाईजान कडे दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे त्याने आपली मान होकारार्थी डुलवली. हाशीमला सांगण्यात आले कि तू विमानाचं अपहरण करायला आला होतास, ते होणारच पण आता RAW सांगेल तसं होणार. त्यानंतर हाशीम भाईजानला विमान कसं पळवायचं, कुठून पळवायचं, मग काय काय करायचं आणि पाकमध्ये गेल्यावर काय काय मागण्या करायच्या, काय बोलायचं, मीडियाच्या लोकांना काय मुलाखती द्यायच्या याचा सगळा गृहपाठ करून घेतला. सगळं Raw ने सांगितल्याप्रमाणे झालं.
हा खटाटोप कशासाठी ?
आता हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेलच कि हा खटाटोप कशाला भाऊ ? तर या मागचे २ हेतू होते. एक पाकिस्तानची नाचक्की करून नाक कापणे आणि दुसरं व सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या युद्ध तयारीत अजून टेन्शन देणे. आता या सगळ्याचा खर्च आला तो म्हणजे एक विमान ते पण सेवेतून बाद करण्यात आलेलं. अपहरणाच्या वेळी ते मुद्दामून पुन्हा सेवेत घेतले. त्यावेळी हि मागील बाजू प्रसारमाध्यमात नक्कीच आली नाही पण जगातील सगळ्या देशांना हादरवून टाकणारी हि घटना आहे आणि यानंतरच सगळ्यांना कळलं भारताकडे R&AW नावाचं काहीतरी आहे.
R&AW भारताची गुप्तहेर संघटना आहे. एवढं सांगायचं तर लोकांना याची फार माहिती नाही. आपण फार अमेरिकरची CIA, रशियाची KGB, इस्रायलची मोसाद या संघटनेचे गुणगान गात असतो. पण त्याचे मूळ कारण आहे त्याच्याबद्दल झालेलं लिखाण. मुळात भारताच्या R&AW बद्दल फारच कमी आणि मुद्देसूत नसलेलं लिखाण झालेलं आहे. त्यामुळे RAW बद्दलची माहिती हि कमी प्रमाणात आहे. पण R&AW वर भारतापेक्षा सगळ्यात जास्त लिखाण झालंय ते पाक मध्ये. तिथल्या पेपर, न्यूज चॅनेल यांचा हा आवडता विषय. अगदी एक काळ असा होता कि तिथच्या पेपर मध्ये R&AW साठी परमनंट जागाच ठेवली जायची.
त्या घटनेनंतर सगळ्या जगाला कळलं भारताकडे ‘रॉ’ नावाचं काहीतरी आहे
Hi purn story aahe ase tumhala vatate ka???? KO ugach jyada click sathicha uthathev aahe???
पोस्टच्या शीर्षकामध्ये त्या घटनेबाबत सस्पेन्स आहे आणि जगाला कोणत्या गोष्टीमुळे भारताकडे ib सोडून अजून एक गुप्तहेर संघटना आहे याच वर्णन आहे. यात उठाठेव कसला ??
क्या बात हैं