टाटा उद्योगसमूहाचं साम्राज्य १४ वरून ९५ कंपन्यांवर नेण्याची किमया करणारे टाटा
Tata Motors, TCS, Tata Chemicals, Titan यासारख्या कित्येक कंपन्यांची सुरवात त्यांच्यामुळे झाली.
भारतातील सर्वात यशस्वी टाटा उद्योग समुहाचा पाया जमशेदजी टाटांनी रचला आणि ह्या टाटांच्या साम्राज्याचा यशस्वी विस्तार जे. आर. डी. टाटा (JRD TATA) म्हणजेच जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (Jehangir Ratanji Dadabhoy Tata) यांनी केला.
त्यांचा जन्म २९ जुलै १९०४ साली पॅरिस, फ्रान्स येथे झाला. वडिलांचे नाव रतन जमशेदजी टाटा व आईचे नाव सुझॅन असे होते. JRD Tata हे त्यांचे दुसरे अपत्य. आई मुळची फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बहुतांशी बालपण हे फ्रान्स मध्येच गेले. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनन स्कूल मध्ये त्याचं शिक्षण झालं. पुढे उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. JRD एक फ्रेंच नागरिक होते आणि त्या देशातील नियमानुसार तरुण मुलांना १ वर्ष फ्रान्सच्या सैन्यात घालवावे लागे. नियमानुसार JRD फ्रान्सच्या सैन्यात दाखल झाले. काही काळानंतर ते भारतात परतले आणि वडलांच्या कंपनीतच काम करू लागले. त्यांनी फ्रान्सचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले. JRD Tata यांचा विवाह थेलमा (Thelma Vicaji) यांच्याशी झाला.
जे.आर.डी टाटा यांना सुरुवातीपासूनच विमानांमध्ये रुची होती. १९२९ साली वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी त्यांना वैमानिकाचा कायदेशीर परवाना म्हणजेच Licence मिळवले. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले होते. त्यांना भारतात स्वतः ची विमानसेवा चालू करायची होती, अनेक प्रयत्न केल्यानंतर सन १९३२ साली एअर मेल सर्विसेस नावाने त्यांनी विमानसेवा चालू केली जी नंतर Tata Airlines म्हणून नावारूपाला आली.
१९४६ नंतर भारत सरकारने त्यात ४९% भागीदारी घेतल्यानंतर पुढे स्वातंत्र्यानंतर १००% हक्क स्वतःकडे घेऊन ती विमानसेवा राष्ट्रीयीकृत केली व आज ती विमानसेवा Air India या नावाने ओळखली जाते. म्हणूनच JRD Tata यांना भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक (Father of Indian Aviation) म्हणून ओळखले जाते.
१९३४ साली वयाच्या ३४ व्या वर्षी Tata Sons उद्योग समूहाच्या चेअरमन पदी त्यांची निवड झाली. Tata Sons चा कारभार १४ कंपन्यांवरून ९५ कंपन्यांवर नेण्याची किमया त्यांनी केली. हॉटेल, तंत्रज्ञान, माहिती, रसायनं, चहा, वाहने या सर्व क्षेत्रात समूहाचा विस्तार त्यांनी यशस्वीरित्या केला. १९३८ साली जगातील पाहिले Iodine युक्त मीठ बनवण्याचा मान टाटा समूहाला मिळाला. याच दरम्यान टाटा केमिकल्स अस्तित्वात आले.
गुजरातमध्ये सौराष्ट्रात ओखामंडल येथे त्यांनी ओखा मीठ कारखान्याचा विकास व विस्तार केला. या कारखान्यात सोडा ॲशचे उत्पादन होणार होते ज्याचा उपयोग काच, कापड, सिरॅमिक निर्मितीसाठी होणार होता. त्या काळात भारत ह्या सर्व गोष्टी आयात करत होता. जमशेदजी टाटा यांनी जसे स्टील आणि विद्युत उर्जा बनवण्याची देशातच सुरुवात केली तसेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जे.आर.डी टाटा यांनी Tata Chemicals ची सुरुवात केली. जी पुढे जाऊन खूप नावारूपाला आली. मिठापुर येथे सुरू केलेली टाटा केमिकल्सची संकल्पना व निर्मिती ही जमशेदपूर येथील टाटा स्टील सारखीच होती.
१९४५ साली TELCO या कंपनीची सुरुवात त्यांनी केली जी पुढे Tata Motors म्हणून नावारूपाला आली. सुरुवातीला टेलको फक्त भारतीय रेल्वेसाठी काम करत होती, पण १९५४ ला Diamler Benz या जर्मनीच्या नावाजलेल्या कंपनीला त्यांच्या देशाबाहेर काम करायची इच्छा होती, तेव्हा त्यांनी टेलको समोर प्रस्ताव ठेवला आणि टाटांनी या संधीचे सोने केले. त्याकाळात टाटांनी पहिल्यांदा भारतात ट्रक बनवायला सुरुवात केली. पुढे अनेक छोट्या मोठ्या गाड्याचे उत्पादन सुरू झाले आणि तीच टेलको कंपनी टाटा मोटर्स म्हणून नावारूपाला आली.
१९४५ साली टाटांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेची तसेच भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना केली, त्यानुसार भारतातल्या पहिल्या संगणकाची आणि आण्विक कार्यक्रमाची सुरुवात या केंद्राच्या मदतीने झाली. टाटांनी या संस्थांना केवळ आर्थिक मदत न करता स्वतःही आपला अमूल्य वेळ त्यांना दिला.
१९५४ ते १९८० च्या दरम्यान Tata Voltas, Tata Tea, Titan, TCS या कंपन्या नावारूपाला आल्या. १९५४ ला व्हॉकार्ड ब्रदर या कंपनीशी करार करून टाटांनी एअर कंडिशनरची निर्मिती सुरू केली तीच पुढे टाटा व्होल्टास म्हणून ओळखली जाऊ लागली. तसेच १९६२ साली Tata Global Beverages कंपनीची सुरुवात होऊन काळा चहा, कॉफी याचे उत्पादन चालू झाले. १९६८ साली टाटा समूहाने सॉफ्टवेअर क्षेत्रात Tata Consultancy Services या नावाने पदार्पण केले आणि १९८० साली Titan Watch नावाने घड्याळाच्या कारखान्याची स्थापना केली.
जे.आर.डी यांना उद्योगासोबतच सामाजिक जाणिव देखील होती. १९५६ साली त्यांनी कामगार कल्याण योजना सुरू केली तसेच कामगारांना अपघात विमा, मोफत आरोग्यसेवा, दिवसातील ८ तास काम यांसारख्या अनेक योजना राबविल्या. १९४१ साली आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय त्यांनी मुंबई येथे सुरू केले. १९५७ साली त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण तसेच १९९२ साली “भारतरत्न” या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले. १५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या टाटा उद्योगसमूहाच्या यशात मोलाचा सहभाग असलेल्या JRD Tata यांचे नोव्हेंबर २९, १९९३ साली वयाच्या ८९ व्या वर्षी स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे वृद्धापकाळाने निधन झाले.