संपुर्ण जगाला हेवा वाटावा असे छत्रपती शिवरायांचे आरमारी सामर्थ्य.
१. किल्ले विजयदुर्ग
मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा ‘घेरिया’ म्हणजेच ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला, यालाच कोकण किनारपट्टीवरील शान! असेही म्हणतात. बलाढय़ किल्ले विजयदुर्ग मराठा आरमार मध्ये इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे. म्हणूनच इंग्रजांनी अतिशय गुप्तपणे काळोख्या रात्री ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ मोहीम आखली आणि तोंडावर पडले. किल्ला मराठा आरामारामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवरायांनी चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली होती. याच अदृश्य अश्या तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि बुडाल्या.
किल्याचे बांधकाम इ.स. ११९५ ते १२०५ या कालावधीत राजा भोज याने केले. किल्ल्याने देवगिरीची यादवसत्ता, विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरची आदिलशहि पहिली. १६५३ मध्ये विजय संवत्सर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला आणि घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला. मराठा साम्राज्यात दाखल झाल्यानंतर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी, २७ भक्कम बुरूज बांधून डागडुजी करण्यात आली.
किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे केवळ गनिमी काव्याने मराठय़ांनी भल्या भल्या शत्रुंना जेरीस आणले. पण फितुरीमुळे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. आजही १७५६ पर्यंतचा इतिहास जाणून घेतला तर मराठय़ांच्या पराक्रमाने अंगावर रोमांच उभे राहतात
२. किल्ले पद्मदुर्ग
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेल्या या मध्ययुगीन जलदुर्गाला पद्मदुर्ग किंवा कासा या नावाने ओळखतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आजही सुस्थितीत उभा आहे. जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाले होते आणि त्यामुळेच किनारपट्टीवर सिध्दीने दरारा निर्माण केला होता. शिवाजी महाराजांनी मुरूडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधून जंजिर्याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद घातला.
मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट असे किल्ल्याचे दोन भाग आहेत. पडकोट नामशेष झाल्यात जमा आहे पण किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही डौलाने उभी आहे. किल्ल्याच्या मुख्य दारासमोर मोठा बुरुज आहे ज्याचा वरचा भाग कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहे म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले असे बोलले जाते. किल्ल्याच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून वापरलेला चुना एवढा जबरदस्त आहे कि ३५० वर्षांनंतरही सागराच्या लाटांच्या तडाख्याने तटबंदीचा दगड खणखणीत आहे.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा पद्मदुर्ग स्वराज्यातच होता. तसेच शंभूराजेंच्या मृत्यूनंतरही किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर मात्र पद्मदुर्ग सिद्धीच्या ताब्यात गेला आणि मराठयांनी पुन्हा पेशवे काळात परत पद्मदुर्ग जिंकून घेतल्याची नोंद आहे.
३. किल्ले खांदेरी
खांदेरीची बेटे मोक्याची असल्यामुळे अतिशय महत्त्वाची होती, म्हणूनच हि बेटे ताब्यात घेवून जलदुर्ग बांधून इंग्रज आणि जंजिच्या सिद्यीमध्ये चांगलीच पाचर मारता येईल या उद्देशाने ऑगस्ट महिन्याच्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडार्याला पाठवून बेटावर किल्ला बांधण्याचे आदेश दिले. पण महाराजांच्या या बेताचा सुगावा लागताच इंग्रजांनी खांदेरी बेटावर आपला हक्क सांगण्यास सुरवात केली.
किल्ल्याचे महत्व लक्षात घेऊन शिवरायांनी खांदेरी बांधण्याची महत्त्वाची जोखीम मायनाक भंडारीवर सोपवली, आणि मायनाक चार तोफांसहीत एकशे पन्नास सहकारी घेऊन बेटावर दाखल झाले. अधून मधून इंग्रज हल्ला करण्याचा प्रयत्न करत पण जिगरबाज मायनाक यांनी इंग्रजांचा विरोध मोडून काढत खांदेरी उभा करुन स्वराज्यातील जलदुर्गांची मजबूती फळी उभी केली.
४. किल्ले सुवर्णदुर्ग
भारत सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या सुवर्णदुर्ग किल्ला इ.स. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाही कडून जिंकून घेतला असल्याच्या नोंदी आहेत. त्यानंतर किल्ल्याच्या डागडुजीसाठी दहा हजार दोन रुपये खर्च महाराजांनी केला आणि याचवेळी दुर्गाचे प्रवेशद्वार हे प्रशस्त प्रवेशद्वार बांधून घेतले.
सुवर्णदुर्ग जलदुर्गामुळेच हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. किल्ल्याच्या रक्षणासाठी सागरी किनाऱ्यावर कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड या तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे.
५. किल्ले सिंधुदुर्ग
सागरीमार्गा वरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीनेच जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली त्यापैकीच एक “किल्ले सिंधुदुर्ग” होय. महाराजांच्या हस्ते पायाभरणी झालेला दगड आजही मोरयाचा दगड या नावाने प्रसिद्ध आहे. इतिहासातील नोंदीनुसार किल्ला उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी तर तब्बल एक कोटी होन खर्ची पडले.
ऐतिहासिक सौंदर्य आणि महत्व लाभलेला सिंधुदुर्ग कुरटे खडकावर उभा आहे. किल्ल्यावर ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. किल्य्यावर श्री शिवराजेश्वरांचे देवालय आणि अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी महाराजांची बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते. मराठ्यांच्या इतिहासात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीला अन्यनसाधारण महत्व आहे. नंतरच्या काळात किल्याची पडझड झाली होती, १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी किल्याचे महत्व लक्षात घेऊन त्वरित तटाची दुरुस्ती केली.
६. किल्ले कुलाबा
कुलाबा जलदुर्गाच्या इतिहासात डोकावून पहिले तर ‘किल्ले कुलाबा” आजही मराठेकालीन बांधकामाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. कुलाबा खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आला सरखेल कान्होजी आंग्रेच्या काळात ज्यांना इंग्रज ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत. छत्रपती शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा’ प्रथम शिवशाही आणि नंतर पेशवाई मग सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले आहेत.
७. किल्ले रत्नदुर्ग
फार पूर्वी बहमनी काळात बांधणी झालेल्या “किल्ले रत्नदुर्ग”ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली अदिलशहा कडून जिंकून घेतला. आणि मग किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणत स्वराज्यात सामील केला. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून रत्नागिरीच्या जवळच एका डोग्रावर किल्ला आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे किल्ला अधिकच आकर्षित जाणवतो.
८. किल्ले देवगड
समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला “देवगडचा किल्ला” कोणी व कधी बांधला याची माहिती उपलब्ध नाही पण किल्ला शिवकाळात स्वराज्यात सामील झालेल्या नोंदी नक्कीच उपलब्ध आहेत. गडाला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. टेकडीवरील बालेकिल्ला व समुद्राजवळील भाग अश्या दोन विभागात किल्ला आहे पण अनेक लोकांना माहित नसल्याने पर्यटक फक्त बालेकिल्लाच पाहून परतात.
बालेकिल्ल्याकडे किल्ल्यावर २ सुटे बुरुज आहेत, ज्यांना टेहळणी बुरुज असेही बोलले जाते, या टेहळणी बुरुजाचा उपयोग समुद्रावर, बंदरावर व आजूबाजूच्या परीसरावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. किल्ल्यावर पूरातन गणेश मंदिर आहे पण त्याबाबतही अधिक माहिती उपलब्ध नाही.
९. किल्ले कोरलाई
तीन बाजूंनी समुद्र असलेल्या टेकाडावर किल्ला बांधला असून त्याची रचना अगदीच वैशिष्ठ्यपूर्ण आहे. संपुर्ण किल्ला तब्बल आठ भागात विभागला आहे. कोरलाई किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना पोर्तुगिजांनी केली आहे. किल्ल्यामुळे सागर आणि कुंडलिका नदीची संपूर्ण खाडी परिसरावर ताबा ठेवणे सोपे होते. पोर्तुगीजांना ३०० पर्शियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात किल्ला बांधण्याची परवानगी दिल्याच्या नोंदी आहेत. पोर्तुगिजांच्या गव्हर्नरने हे बांधकाम निजामशाहीच्या काळात केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ला स्वराज्यात दाखल झाला.
कोरलाईची अगदीच वैशिष्ठ्यपूर्ण रचना, तटबंदी, त्याचे आठ-दहा दरवाजे, बालेकिल्ला आणि आजही जागोजागच्या बुरुजांवरुन रोखलेल्या तोफा, सागराचे विशाल दर्शन आपल्याला मोहवून टाकते.
१०. किल्ले उंदेरी
खांदेरी युद्धात मराठे सैन्य जुमानत नाही हे पाहून संतापलेल्या सिद्दीने उंदेरीवर किल्ल्याचे बांधकाम सुरु केले. उंदेरीवर किल्ला बांधायचा आणि खांदेरीवरील बांधकामाला अडसर करायचा असा दुहेरी कार्यक्रम सिद्दीने राबवला. पण नंतर इंग्रजांना सिद्धीचा डाव लक्षात आला आणि त्यांनी सिद्दी हा शिवाजी महाराजांपेक्षा वरचढ ठरेल या भीतीने खांदेरी मोहिमेचा जोरच कमी केला. बरीच वर्षे मराठे आणि सिद्दी यांच्या मध्ये खांदेरी – उंदेरीठी युद्ध सुरु राहिले. नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराजात दाखल झाल्याच्या नोंदी आहेत.
खांदेरीप्रमाणे उंदेरीवर पण दोन कमी उंचीच्या टेकड्या आहेत. किल्ल्याकडे जात असतांना किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि बुरुज आपले लक्ष नक्कीच वेधून घेतात. महत्वाचे म्हणजे उंदेरी किल्ल्यावर भरती ओहटीची वेळ पाळूनच जावे लागते. उंदेरीवर एकूण दहा बुरुज असुन बहुतेक सर्व बुरुज चांगल्या स्थितीत आहेत.