Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

ह्या मराठी राजाने इंग्रजांना १ कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं

ह्या राजाने मोठ्या हुशारीने इंग्रजांना भलं मोठं कर्ज दिलं ! तसंच १८५७च्या युद्धात इंग्रजांबरोबर राहून छुप्या पद्धतीने क्रांतीकारकांना मदतही ते करत असत!

भारतावर आत्तापर्यंत अनेक आक्रमणं झाली. डच, पोर्तुगीज, इंग्रज, मुघल इ. काही भारतीय राजांनीही आपला काळ गाजवला. पण आपल्या सत्तेच्या हव्यासापायी, आपापसातल्या द्वेषापायी जनता दुर्बल होत आहे, या सगळ्यात तिचं हकनाक शोषण होत आहे हे या राजे लोकांच्या खिजगणतीतही नसायचं.

त्यावेळी लोकशाही वगैरे नसल्याने कुणाला मत मांडायचा अधिकारच नव्हता. जी व्यक्ती सिंहासनावर आरूढ होई तो राजा… आणि तोच आता आपला पालनकर्ता हे जनतेला स्वीकारावंच लागायचं.

अर्थात अनेक राजे हे अतिशय चांगले, प्रजाहितदक्ष असेही होते. प्रजेला पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारे होते. त्यांच्या हितासाठी कटिबद्ध होते. असाच एक राजा १८व्या शतकात होऊन गेला – राजे तुकोजी होळकर द्वितीय !

पेशवाईमध्ये सरदार, सुभेदार अशा उच्च पदांवर राहिलेले होळकर, त्यांना मिळालेल्या प्रदेशाचे “राजे” म्हणून कारभार बघत. तर अशा या होळकर घराण्याचे वारस अल्पायुषी ठरत गेले. वैद्यकीय क्षेत्राने फार प्रगती केली नसल्याने , कुठल्या रोगाची साथ वगैरे आली की लोक पटापट दगावत.

होळकरांचे वारसदरही अश्याच आजारांचे बळी ठरत गेले. कृष्णाबाई होळकर या धोरणी स्त्रीने भाऊ गंधारे नामक व्यक्तीच्या युकोजी नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. आणि त्याचं नामकरण केलं – तुकोजी होळकर द्वितीय !!

नाशिकच्या निफाड तालुक्यात करंजी खुर्द या गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या छोट्याश्या गावातील दहा वर्षे वयाच्या युकोजीला कुणीतरी दत्तक घेतं काय आणि “अकरावे राजे” म्हणून गादीवर बसवतं काय… सगळं औरच !

होळकर घराण्याच्या या नव्या राजाने वयाच्या १६व्या वर्षांपासून राज्यकारभारात लक्ष घालायला सुरुवात केली आणि २०व्या वर्षी ते खऱ्या अर्थाने ‘राजे’ झाले. आपण कुणाच्या पोटी जन्माला आलो यापेक्षा आपल्यावर संस्कार कसे झाले हे महत्त्वाचं आहे !

अगदी छोट्याशा गावी जन्माला आलेलं ‘युकोजी’ नावाचं पोरगं गावभर उंडारत राहिलं असतं… केवळ योग्य संस्कार, नेमकं शिक्षण यामुळे युकोजीचा केवळ ‘तुकोजी’च झाला नाही तर राज्यकारभारात निपुण असा राजा झाला!

tukoji rao holkar history in marathi, indore, yukoji, राजे तुकोजी होळकर द्वितीय, raje tukoji holkar 2 in marathi, Tukojirao Holkar II, holkar of indore, british, 1 cr loan, ब्रिटिश, इंग्रज, १ करोड कर्ज, इतिहास

तो काळ इंग्रजांचा होता. आपल्या देशातील, आपली म्हणणारी माणसंच इंग्रजांच्या बाजूने होती, हांजी हुजुरी करून स्वार्थ साधणारी होती म्हणून केवळ म्हणून इंग्रज आपल्यावर १५० वर्षे राज्य करू शकले… हे जरी आपलं दुर्दैव असलं तरी कट्टर देशभक्तही अनेक होते.

जीवाची-आयुष्याची होळी करून इंग्रजांना खुलं आव्हान देणारेही अनेक होते ज्यायोगेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे सुदैवही होतं ! परंतु राजे तुकोजी होळकरांनी ना इंग्रजी सत्तेपुढे मान झूकवली, ना त्यांना खुलं आव्हान दिलं…. तर त्यांनी इंग्रजांना चक्क १ करोड रुपयांचं कर्ज दिलं तसंच अनेक एकर जमीन दिली आणि तीही अगदी मोफत…

इंग्रजांना अशा प्रकारे आपलं मिंधं बनवणारा हा एकमेव राजा असावा! समोरची व्यक्ती जेव्हा आपल्यापेक्षा प्रबळ असते ना, तेव्हा युक्तीनेच काम करावं लागतं.

देशावरच्या प्रेमापोटी तुकोजीराजे इंग्रजांचे स्तुतीपाठक होऊ शकत नव्हते आणि राज्याची जबाबदारी असल्याने आवेशाने, त्वेषाने त्यांच्यावर तुटूनही पडू शकत नव्हते.. मग या राजाने मोठ्या हुशारीने निर्णय घेतला…. इंग्रजांना भलं मोठं कर्ज दिलं ! तसंच १८५७च्या युद्धात इंग्रजांबरोबर राहून छुप्या पद्धतीने क्रांतीकारकांना मदतही ते करत असत!

शुद्ध मराठीत याला “शालजोड्यातील देणे” असं म्हणतात !

त्याचं असं झालं कि इंग्रजांना रेल्वे मार्ग बांधायचा होता. आता रेल्वे मार्ग असला की दळणवळण होणार, पर्यायाने भारतीयांचंच भलं होणार. हे ओळखून राजांनी १ करोड रुपयांचं कर्ज इंग्रजांना दिलं – १०१ वर्षांसाठीचं हे कर्ज ४.५ शेकडा प्रति वर्ष या प्रमाणात होतं.

१८६९ मध्ये करार झाला आणि १८७७ मध्ये काम पूर्ण झालं. ज्यायोगे खांडवा-इंदोर, इंदोर-रतलाम-अजमेर, इंदोर-देवास-उज्जैन या प्रदेशांना जोडण्याचं फार मोठं आणि महत्वाचं काम झालं. “खांडवा-इंदोर” हा मार्ग “होळकर स्टेट रेल्वे” च्या नावाने ओळखण्यात येतो.

प्रदेश पहाडी होता, त्याकाळच्या अवजड वस्तूंचे वाहक कोण तर हत्ती. ह्या हत्तींच्या मदतीने टेस्टिंगसाठी आणलेल्या वाफेच्या इंजिनाला ओढून, खेचून रेल्वेच्या रुळावर आणल्या गेलं ! रेल्वे मार्ग असणारं इंदोर हे पहिलं राज्य, तर हे काम ज्या शासकाच्या कारकिर्दीत झालं ते ‘तुकोजी राजे होळकर द्वितीय’ हे पहिले शासक ठरले !

केवळ २०व्या वर्षी हातात आलेल्या सत्तेला राजांनी उत्कृष्ट नेतृत्व दिलं. अनेक लोकोपयोगी कामं केली. कापड गिरण्या, टपालव्यवस्था, आरोग्यकेंद्रे अश्या लोककेंद्रीत सुविधा पुरवणाऱ्या या राजाने आपल्या राज्याच्या परिसरात स्वतंत्र असं राष्ट्रगीतही सुरू केलं होतं.

त्यांची पहिली पत्नी – महाराणी श्रीमंत अखंड सौभाग्यवती म्हाळसा बाईसाहेब यांचा लग्नानंतर केवळ दोनच वर्षात मृत्यू झाला. त्यानंतर राजांनी महाराणी श्रीमंत अखंड सौभाग्यवती भागीरथी बाईसाहेब व राधा बाईसाहेब यांच्याशी लग्ने केली.

होळकर घराण्यात आपल्या कार्याने आणखी एक मानाचा तुरा रोवणाऱ्या या राजाचं नाव दुर्लक्षित राहिलं असलं तरी त्यांचं महत्व कमी होत नाही. १८८६ मध्ये जग सोडून गेलेल्या या राजालाही आयुष्य तसं कमीच लाभलं. परंतु अल्पशा अश्या ह्या आयुष्यात त्यांनी दखल घेण्यासारखी कामं केली.

Leave A Reply

Your email address will not be published.