नागालँडमध्ये १४ ऑगस्टला स्वतंत्र दिवस साजरा करण्यामागचं सत्य काय ?
१४ ऑगस्टला स्वतंत्र दिवस साजरा करण्याबरोबरच आपला वेगळा झेंडाही फडकावण्याची गोष्ट सध्या व्हायरल होत आहे.
आर्टिकल ३७० चा अंत झाल्यावर काश्मीरमध्ये फक्त एकच झेंडा म्हणजेच तिरंगा फडकतांना दिसणार ह्यात काही संशय राहिला नाही. आर्टिकल ३७० अस्तित्वात असतांना जम्मू- काश्मीरचा स्वतंत्र झेंडा होता पण तो आता इतिहासजमा झाला आहे. आर्टिकल ३७० संबंधी वेगवेगळ्या बातम्या, अफवा सोशल मीडियावर गाजत होत्या. त्याच दरम्यान अजून एक बातमी सोशल मीडियावर गाजत होती. बातमी होती नागालँडसंबंधी. सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल झाला ज्यात असे म्हटले गेले आहे कि नागालँडने आपला स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्ट रोजी साजरा केला व आपला वेगळा झेंडाही फडकवला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ह्या बातम्या आणि फोटोंबाबत सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे समजले कि नागा स्टुडन्ट फेडरेशन अर्थात Naga Students’ Federation (NSF) ने ७३ वा नागा स्वतंत्रता दिवस साजरा केला. नागा स्वतंत्रता दिवस प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो पण जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर Nagaland independence day नागा स्वतंत्रता दिवस व त्या निमित्ताने फडकवल्या गेलेल्या झेंड्याची जास्त चर्चा होत आहे.
ह्याबद्दल NSA चे अध्यक्ष निनोतो आवोमी ह्यांच्याशी द हिंदू ह्या वृत्तपत्राच्या वार्ताहराने बातचीत केली. ह्यावेळी NSA अध्यक्ष निनोतो आवोमी म्हणाले कि कोहिमा व अन्य नागाबहुल क्षेत्रात साजरा करण्यात आलेल्या नागा स्वतंत्रता दिवसाचा कोणताही राजकीय अर्थ काढण्यात येऊ नये. नागा स्वतंत्रता दिवस व त्याचे आयोजन हे केवळ आमचे वेगळेपण जपण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ह्या सोहळ्याचे आयोजन केले म्हणजे आम्ही भारत विरोधी आहोत असा अर्थ ह्यातून काढण्यात येऊ नये असेही निनोतो आवोमी ह्यावेळी म्हणले.
नागा लोक आपली प्रतीकं आणि आपली संस्कृती ह्याविषयी फारच सजग असतात. ऑगस्ट २०१५ साली भारत सरकार व नागा नॅशनल पोलिटिकल ग्रुप्स ह्यांच्यादरम्यान चर्चा झाली. ह्या चर्चेदरम्यान सर्वकाही सुरळीत पार पडले पण एका बाबतीत मात्र समाधानकारक तोडगा निघू शकला नाही ते म्हणजे नागा प्रतीकं आणि नागा झेंडा. वेगळी प्रतीकं आणि झेंडा ह्याबद्दल केंद्र सरकारचं मत मात्र काहीसं वेगळं आहे.
भारत सरकार नागालँडसाठी वेगळा झेंड्याला मान्यता देण्यास का तयार नाही ? कारण कोणत्याही देशाचा, राज्याचा अथवा कोणताही झेंडा हे कोणत्याही राज्य, देश अथवा संस्थेच्या अस्तित्वाचं एक प्रतीकात्मक रूप असतं, वेगळा झेंडा व वेगळी प्रतीकं हेच नागालँडमध्ये चालत असलेल्या समस्येचं मूळ आहे असं सरकारचं मत आहे. जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल ३७० रद्द केल्यानंतर नागालँडचे राज्यपाल एन आर रवी ह्यांनी नागालँडच्या रहिवाशांना आर्टिकल ३७१ अ संबंधी आश्वस्त केले आहे.
काय आहे आर्टिकल ३७१ अ
सन १९६४ मध्ये नागालँडच्या निर्मितीबरोबरच ह्या राज्यासाठी (Article 371A) आर्टिकल ३७१ अ ची निर्मिती केली गेली. संविधानातील आर्टिकल ३७१ अ नुसार नागालँडमधील धार्मिक, सामाजिक बाबतीत भारतीय संसद आणि सरकार हस्तक्षेप करणार नाही. ह्याशिवाय नागा संप्रदायाचे नियम, कायदे ह्यासंबंधी सरकार हस्तक्षेप करणार नाही, ह्याशिवाय नागालँडमधील जमीन खरेदी, विक्री इत्यादी बाबींमध्येही सरकार व संसद हस्तक्षेप करणार नाही अश्या प्रकारच्या काही बाबींचा आर्टिकल ३७१ अ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.