….गुजरात नाही तर विर्लेपार्ले हि हिंदुत्वाची पहिली प्रयोगशाळा
हिंदुत्व हा ना भाजपचा अजेंडा होता ना शिवसेनेचा. पण या निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे शिवसेनेला मिळालेलं यश भाजपचे प्रमोद महाजन यांनी हेरलं अन भाजपने पहिला मुद्दा हाती घेतला तो म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराचा.
संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठी राज्य मिळाले तरी मराठी माणूस मागे पडत चालला. मग तो नोक-यांमध्ये मागे पडला असेल, उद्योगांमध्ये असेल, व्यापारामध्ये असेल, सामाजिक प्रतिष्ठेत असेल किंवा राजकारणात असेल किंवा दिल्लीच्या परिघात असेल. मराठी माणसाचे हे उणेपण हेरले बाळासाहेबांनी आणि मग त्याला प्रतिसाद दिला तो महाराष्ट्रातील तरुणांनी. सुरुवातीची शिवसेनेची भूमिका, मराठी तरुणांच्या हितापुरती, ‘मराठी माणसाला नोकरी’ एवढय़ा परिघात शिवसेना फिरत होती.
१९६० साली बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून देशातील बाहेरुन आलेल्या लोकांना लक्ष्य करायला सुरुवात केली. राज्यातील मराठी लोकांच्या न्याय हक्कासाठी १९ जून १९६६ साली शिवसेना पक्षाची स्थापना केली. स्वातंत्र्याच्या दोन दशकानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा उदय झाला. १९६६ साली राष्ट्रवादी आंदोलनाची तीव्रता कमी झाली होती. तर नोकऱ्या कशा मिळतील यासाठी तरुण वर्ग चिंताग्रस्त होता. बाळासाहेबांनी ही नस बरोबर पकडली. त्यांच्या आक्रमक भाषणामुळे तरुण वर्ग त्यांच्याकडे खेचला गेला आणि बाळासाहेबांचा राजकारणात उदय झाला.
क्षेत्रवादापासून सुरू झालेले राजकारण हिंदुत्वाच्या दिशेने पोहोचले. सुरुवातीला दाक्षिणात्य लोकांना हटवण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. ‘बजाव पुंगी, भगाओ लुगी’ अशी घोषणा त्यावेळी देण्यात आली होती. देशात आणीबाणी लागू केल्यानंतर विरोधकांकडून पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर चौफेर टीका होत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र आणीबाणीचे समर्थन करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
हिंदुत्व आणि बाळासाहेब
१९८४ मध्ये युके मध्ये काश्मीरच्या मुस्लिम संघटनेने एका मराठी अधिकाऱ्याची अपहरण करून हत्या केली. यातूनच ठाकरेंना हिंदुत्वाचा मुद्दा मिळाला. १९८८ मध्ये सामनाची निर्मिती झाली अन त्यात बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका मांडायला सुरवात केली. १९८८९ ला विर्लेपार्लेत विधानसभेची पोट निवडणूक झाली अन या निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार मांडला. या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली. धर्माच्या नावावर प्रचार केलेली हि पहिली निवडणूक. या निवडणुकीत वादग्रस्त प्रचार केल्यापरकरणी बाळासाहेबांचा ६ वर्षासाठी मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता.
हि निवडणूक होईपर्यंत हिंदुत्व हा ना भाजपचा अजेंडा होता ना शिवसेनेचा. पण या निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे शिवसेनेला मिळालेलं यश भाजपचे प्रमोद महाजन यांनी हेरलं अन भाजपने पहिला मुद्दा हाती घेतला तो म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराचा. पण स्थानिक पातळीला पोहचायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना सोबत घ्यावे लागेल हा मुद्दा प्रमोद महाजनांनी वरिष्ठाना पटवून दिला. हिंदुत्वासाठी वेगवेगळं लढण्यापेक्षा युतीतुन यश मिळेल हे दोन्ही पक्षांनी हेरलं अन युती झाली. १९९० ची विधानसभा निवडणूक युतीने लढवली पराभव झाला मात्र यातून नवे हिंदुत्ववादी बाळासाहेब लोकांना भावले. दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात रथयात्रा पूर्ण भारत भर निघाली अन इथून पुढे भारतीय राजकारणाला वेगळे वळण मिळाले.