राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशासाठी केलेली सर्वात मोठी योगदानं जी तुम्हाला माहित देखील नसतील.
जातीयवादी, धर्मांध, संविधानविरोधी असे नानाप्रकारचे आरोप होणाऱ्या Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला ९० वर्षांहून अधिक काळ झाला. सात्यत्याने होणारी टिका, विरोधकांकडून केले जाणारे आरोप, संघटनेच्या कार्यकाळात आलेले चढउतार या साऱ्यांचा सामना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली व्याप्ती वाढवली आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून ते आजवर या संघटनेचे देशासाठी काय योगदान काय राहिलं आहे. हे आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
१) १९४७ साली ज्यावेळी देशाचे विभाजन झाले त्यावेळी देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दंगे उसळले. अशावेळी पाकिस्तानमधून भारतात आलेले शरणार्थी उघड्यावर पडू नये, त्यांना दंगलीची झळ बसू नये म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शरणार्थींसाठी ३ हजार शिबीरे सुरु केली जेणेकरून त्यांना आसरा मिळावा.
२) १९६२ साली भारत चीन युद्धाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सैनिकांची ये जा होणाऱ्या मार्गांची चौकशी, प्रशासनाची मदत, रसद आणि पुरवठा या कामांमध्ये भारतीय सैन्याची मदत केली. ज्यामुळे माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला २६ जानेवारीला होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. नेहरूंच्या या निमंत्रण देण्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात झाली टिका झाली. तेव्हा या टिकांना प्रतिउत्तर देताना नेहरू म्हणाले “लाठीच्या जोरावर सुद्धा चिनी बॉम्ब आणि सशस्त्र दलांशी यशस्वीपणे लढले जाऊ शकते हे दाखवण्यासाठी २६ जानेवारीच्या परेडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अचानकपणे आमंत्रित केले गेले”.
३) स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकीकडे काश्मीरचे विलीनीकरण भारतात करायचे का याबद्दल महाराजा हरिसिंग निर्णय घेऊ शकत नव्हते तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य कबालींच्या वेशात सीमेमध्ये घुसतच चालले होते. अशा परिस्थितीत करायचे काय म्हणून तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे काश्मीर प्रकरणात मदत मागितली. संघाचे त्यावेळचे शीर्ष नेतृत्व असलेल्या माधव सदाशिवराव गोळवलकर यांनी श्रीनगर येथे जाऊन राजा हरिसिंगांची भेट घेतली आणि त्यांनतर राजा हरिसिगांनी काश्मीरचे विलीनीकरण भारतात करण्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला.
४) काश्मीरप्रमाणेच दादरा, नगर हवेली आणि गोव्याच्या विलीनीकरणाच्या वेळी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महत्वाची भूमिका निभावली. २१ जुलै १९५४ साली दादरा पोर्तुगीजांपासून मुक्त केला गेला. १९५५ च्या गोवा मुक्ति संग्रामात सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रभावीपणे सामील झाले होते. गोव्यामध्ये सशस्त्र हस्तक्षेप करण्याला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना नकार दिल्यावर जग्गनाथ राव यांच्या नेतृत्वात संघ स्वयंसेवकांनी गोव्यात आंदोलन सुरु केले. परिणामस्वरूप जगन्नाथ राव व संघ स्वयंसेवकांना दहा वर्षांची शिक्षा मिळाली. नंतरच्या काळात परिस्थिती फारच बिघडल्यावर शेवटी भारताला सशस्त्र हस्तक्षेप करावाच लागला आणि १९६१ साली गोवा मुक्त झाला.
५) १९७५ च्या आणीबाणी विरोधातील आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. त्यामुळे संघाच्या कार्यकर्त्यांनी भूमिगत राहून आणीबाणी विरोधी आंदोलन सुरु ठेवले. जेव्हा देशातील जवळपास सगळेच नेते जेलमध्ये बंद होते तेव्हा विविध पक्षांचे विलीनीकरण करून जनता पक्षाचे गठण करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महत्वाची भूमिका बजावली.
६) १९५५ साली बनलेला भारतीय मजदूर संघ कदाचित जगातील असे पहिलेच कामगार आंदोलन होते जे विध्वंसापेक्षा निर्माणाच्या धारणेवर चालायचे. कारखान्यांमध्ये विश्वकर्मा जयंती साजरी करण्याची प्रथा सुद्धा याच मजदूर संघाने सुरु केली. आज भारतीय मजदूर संघ जगातील सर्वात मोठी, शांत आणि रचनात्मक अशी कामगारांची संघटना आहे.
७) देश कार्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय विद्यार्थी परिषद, शिक्षाभारती, एकल विद्यालय, स्वदेशी जागरण मंच, विद्याभारती, वनवासी कल्याण आश्रम यांसारख्या अनेक संस्था-संघटनांची निर्मिती केली. या संस्थांमार्फत संघ अनेक समाजाभिमुख कार्य करतो. उदाहरण द्यायचे झाल्यास संघाची विद्याभारती ही संघटना २० हजारांहून अधिक शाळा, २ डझन शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये, दीड डझन महाविद्यालये, १० पेक्षा जास्त रोजगार आणि प्रशिक्षण संस्था चालवते. केंद्र आणि राज्य सरकार मान्यताप्राप्त या सरस्वती शिशु मंदिरांमध्ये जवळपास ३० लाख विद्यार्थी शिक्षण घेतात तर १ लाखांहून अधिक शिक्षक शिकवण्याचे कार्य करतात.
८) १९७१ मध्ये ओडिसात आलेल्या चक्रीवादळापासून ते भोपाळ गॅस दुर्घटनेपर्यंत, १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीपासून ते अगदी गुजरात भूकंप, उत्तराखंडमध्ये आलेला पुरापर्यंत अशा जवळपास सर्वच मोठ्या दुर्घटनांच्या मदतकार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी प्रत्येकवेळी हिरीरीने सहभाग घेतला. एवढंच नाही तर देशाच्या बाहेर नेपाळ, श्रीलंका आणि सुमात्रामधील मदतकार्यात सुद्धा संघाने आपले योगदान दिलेले आहे.